चंद्र पाहिलेल्या पहिल्या माणसाच्या अद्भुत कथा

दहा लाख वर्षांच्या मानवी इतिहासात काही क्षण अमर होऊन बसले आहेत. नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवण्याचा क्षण हा असाच कायम प्रत्येक पिढीच्या तोंडपाठ असणार आहे. ‘जब तक सूरज चांद रहेगाँ..’च्या भाषेत सांगायचं झाल्यास जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत आणि समजा, चंद्र नसला तरीही नील आर्मस्ट्राँगचं स्थान अढळ असणार आहे. माणसाला काहीही अशक्य नाही हे सिद्ध करणार्‍या त्या चांद्रमोहिमेत आर्मस्ट्राँगसोबत बझ आल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स हे दोघेसुद्धा होते. आर्मस्ट्राँगप्रमाणे आल्ड्रिनही चंद्रावर उतरला होता. मात्र असंख्य दंतकथेचा विषय असलेल्या चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा आणि चंद्राला ‘याचि देहा याचि डोळा’ पाहणारा पहिला माणूस म्हणून आर्मस्ट्राँगच अजरामर झाला. त्यामुळेच रविवारी त्यांचं निधन झालं तेव्हा जगाच्या कानाकोपर्‍यातील माणसांना एक अनोखी चुटपुट लागली. तमाम मानवजातीसाठी एक नितांतसुंदर स्वप्न असलेल्या चंद्रावर जाऊन आलेल्या आर्मस्ट्राँगबद्दल संपूर्ण जगातच कमालीचं कुतूहल होतं. तो जगात जिथे जाईल तिथे त्याला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी लोटत असे. आर्मस्ट्राँग चंद्रावरून परत येईपर्यंत आपल्या सर्वासाठी चंद्र म्हणजे कथा, कादंबर्‍या आणि गाण्यातलं पात्र होतं. ‘लिंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला गं बाई..’ या गाण्याच्या ओळी ऐकत मागची पिढी मोठी झाली. त्यानंतर प्रेमात पडल्यानंतर प्रेयसीच्या चेहर्‍याला चंद्राची उपमा देताना चंद्र पृथ्वीवरून दिसतो तसा देखणाच आहे अशीच समजूत होती. सार्‍या कथांमध्ये चंद्र हा कायम रोमॅण्टिक राहिला आहे.अगदी ज्योतिषाच्या कुंडलीतही या चंद्राचं स्थान मोठं महत्त्वाचं होतं. प्रत्येक माणसाची राशीच चंद्रावरून ठरते असं मानलं जातं. मात्र खरंच चंद्र नेमका कसा आहे हे पहिल्यांदा आर्मस्ट्राँगने जगाला सांगितले.

आजची पिढी जन्माला यायच्या अगोदर आर्मस्ट्राँग, आल्ड्रिन आणि कॉलिन्स चंद्रावर जाऊन आले होते. ती त्यांची मोहीम कमालीची रोमांचक होती. जुलै 1969 मधील त्या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. त्याअगोदर चांद्रमोहिमा झाल्या; पण यानातून माणसाला चंद्रावर पाठविण्याचा प्रयोग पहिल्यांदाच होत होता. त्यामुळे एकीकडे उत्सुकता असताना दुसरीकडे साशंकताही होती. अंतराळमोहिमा तेव्हा आजच्या इतक्या सुरक्षित नव्हत्या. त्यामुळेच ‘अपोलो-11’ हे यान चंद्राकडे झेपावले तेव्हा आपण पृथ्वीवर सुरक्षित परत येऊ याबाबत यानातील

चमूसोबत नासाचे वैज्ञानिक व तंत्रज्ञांनाही अजिबात शाश्वती नव्हती. खोटं वाटेल, पण आर्मस्ट्राँग आणि त्यांच्या साथीदारांचा त्या मोहिमेदरम्यान कदाचित मृत्यू होऊ शकेल ही शक्यता गृहीत धरून अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी श्रद्धांजलीचे भाषणही तयार ठेवले होते. सोबतच त्यांचे मृतदेह परत आणण्यासाठी नासाने आणखी एक यानही चंद्राकडे पाठविण्यासाठी जय्यत तयारीत ठेवले होते. आज विचित्र वाटेल; पण चंद्रावर नेमकी काय परिस्थिती आहे आणि तेथे नेमकं काय होऊ शकते याची तेव्हा काहीच कल्पना नव्हती. चार दिवसांत अडीच लाख मैलांचं अंतर पार करून आर्मस्ट्राँग, आल्ड्रिन आणि कॉलिन्स चंद्राच्या कक्षेत पोहोचले तेव्हा सर्वप्रथम नील

आर्मस्ट्राँग खाली उतरेल. त्यानंतर सर्व सुरक्षित आहे हे पाहून आल्ड्रिन उतरेल असं ठरलं होतं. मायकेल कॉलिन्स त्यांना परत नेण्यासाठी चंद्राला फेर्‍या मारत राहणार असं नियोजन करण्यात आलं होतं. काही अनपेक्षित प्रकार घडून किंवा प्राणवायू संपल्याने त्या दोघांचा चंद्रावर मृत्यू झाला तर ठरावीक वेळ वाट पाहून पृथ्वीकडे परत निघण्याचे निर्देश कॉलिन्सला देण्यात आले होते.

मात्र काहीही विपरीत घडलं नाही. आर्मस्ट्राँग तब्बल 2 तास 32 मिनिटे चंद्रावर होता. तो चंद्रावर उतरल्यानंतर 20

मिनिटांनी आल्ड्रिन यानातून उतरला. त्या दोघांनी सोबत आणलेला अमेरिकेचा ध्वज चंद्रावर रोवला आणि सलामी दिली. त्यानंतर लगेचच रेडिओ संदेशाद्वारे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी त्यांचे अभिनंदन केले. निक्सन अतिशय उत्तेजित झाले होते. जवळपास एक मिनिट ते भरभरून बोलत होते. या संभाषणाची ध्वनिफीत उपलब्ध आहे. आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिनने अमेरिकेचा जो राष्ट्रध्वज चंद्रावर रोवला त्याची एक गंमत आहे. ही मंडळी जेव्हा पृथ्वीकडे परत निघाली तेव्हा यानाच्या नोझलमधून जो धूर बाहेर पडला त्यामुळे तो ध्वज तिथून उडाला. त्यामुळे आज पहिल्या

चांद्रमोहिमेच्या वेळचा ध्वज चंद्रावर दिसत नाही. उलट त्यानंतरच्या सर्व चांद्रमोहिमांच्या वेळचे ध्वज अजूनही तेथे आहेत. या पहिल्या चांद्रमोहिमेच्या कथा सांगाव्या तेवढय़ा कमी आहेत. ज्या ‘अपोलो-11’ यानाने आर्मस्ट्राँग आणि त्याचे सहकारी चंद्रावर गेले होते ते यान ऑटो मोडवर होते. यान चंद्रावरील विवरात लँड होत आहे हे लक्षात येताच यानाचे कमांडर असलेल्या आर्मस्ट्राँग यांनी लगेच ऑटोमोड बंद करून मॅन्युअल मोडवर ते टाकले आणि चंद्रावरील ‘सी ऑफ ट्रानक्विलिटी’ नावाने ओळखल्या जाणार्‍या सखल भागात ते उतरविले. ज्या वेळी हे यान सुरक्षितपणे लँड झाले तेव्हा यानात फक्त 40 सेकंद पुरेल एवढे इंधन होते. एवढय़ा रोमहर्षक प्रसंगानंतर आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिलं पाऊलं ठेवलं तेव्हा त्याच्या तोंडून ते जगप्रसिद्घ वाक्य निघालं, ङ्गढहरीं ेपश ीारश्रश्र ींश िषेी र ारप, ेपश सळरपीं श्रशर िषेी ारपज्ञळपव.ङ्घ (हे मानवाचे एक छोटे पाऊल आहे; पण मानवतेसाठी मात्र ही एक मोठी झेप आहे.)

नील आर्मस्ट्राँग व त्याचे सहकारी पृथ्वीवर परतल्यानंतर संपूर्ण जगाने त्यांना डोक्यावर घेतले. मात्र चंद्रावरून परत येऊनही त्यांचे पाय मात्र जमिनीवरच होते. ‘तुझी पावलं आता वर्षानुवर्षे चंद्रावरच राहतील. त्याबाबत तुला काय वाटते’, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारल्यावर तो म्हणाला होता, ‘आजच्या काळातच कोणीतरी तिथे जाईल आणि त्या पाऊलखुणा पुसून टाकून नवीन खुणा निर्माण करेल अशी आशा मला वाटते’ ही विनयशीलता हा त्याचा मोठा गुण होता. आयुष्यभर तो लो-प्रोफाईल राहिला. त्यामुळेच चांद्रमोहिमेनंतर दोन वर्षांनी त्याने ‘नासा’तून निवृत्ती घेऊन सिनसिनाटी आणि कॅलिफोर्निया विद्यापीठांत अध्यापनाचे काम सुरू केले. आपल्याजवळचा अनुभव नवीन पिढीला वाटण्यास त्याला आनंद मिळायचा. चांद्रमोहिमेवरून परतल्यानंतर व्यावसायिक कंपन्या आणि इतरांनी त्याची लोकप्रियता ‘कॅश’ करण्याचा अनेकदा प्रयत्न केला; पण त्याने ते सारे प्रयत्न अतिशय निग्रहाने हाणून पाडले. अनेक कंपन्यांनी त्याला आपला प्रवक्ता किंवा ब्रँड अँम्बेसिडर होण्याची गळ घातली. मात्र प्रत्येकाला त्याने नकारच दिला. 1979 मध्ये मात्र तो अभियांत्रिकीच्या क्षेत्रात भरीव काम करणार्‍या ‘क्रिसलर’ या कंपनीच्या जाहिरात कॅम्पेनमध्ये सहभागी झाला होता. मात्र त्या जाहिरातीतून प्राप्त झालेले पैसे त्याने एका समाजसेवी संस्थेला दान करून टाकले. आपल्या सहीचा (ऑटोग्राफ) वापर व्यावसायिक कारणासाठी होतो हे लक्षात आल्यानंतर त्याने चाहत्यांना सह्या देणेही बंद केले होते. ‘हॉलमार्क’ कंपनीने 1994मध्ये त्याचं ‘दॅट्स वन स्माल स्टेप फॉर मॅन..’ हे प्रसिद्ध वाक्य वापरून ग्रिटिंग कार्ड बाजारात आणले तेव्हा त्याने कंपनीला कोर्टात खेचले. कोर्टाने हॉलमार्कला जो दंड सुनावला त्याची रक्कम त्याने तो ज्या विद्यापीठात शिकला त्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या संशोधनकार्यासाठी दान दिली. सात वर्षांपूर्वी आर्मस्ट्राँगबाबत मोठा रोचक प्रसंग घडला. कित्येक वर्षांपासून त्याची कटिंग-दाढी करणार्‍या मार्क्‍स सिझमोर या त्याच्या न्हाव्याने त्याचे कापलेले केस त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या एका चाहत्याला तीन हजार डॉलरला विकले. आर्मस्ट्राँगला हे समजताच तो प्रचंड नाराज झाला. ‘एकतर माझे केस परत कर किंवा त्यापासून मिळालेले पैसे अनाथांच्या संस्थेला दान कर!’ अशी अट त्याने सिझमोरला टाकली. आर्मस्ट्राँगचे केस विकत घेतलेला तो चाहता आपल्याजवळचे आर्मस्ट्राँगचे केस परत करायला तयार नव्हता. त्यामुळे सिझमोरने शेवटी 3 हजार डॉलर आर्मस्ट्राँगने सांगितलेल्या संस्थेस दान केले.

आर्मस्ट्राँगला राजकारणात ओढण्याचेही भरपूर प्रयत्न झाले. मात्र जगाची पोलिसिंग करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न त्याला कधीच न आवडल्याने त्याने सर्वाना विनयाने नकार दिला. असा हा आर्मस्ट्राँग आयुष्यात ‘हॉल ऑफ

फेम’सह शेकडो पुरस्कारांचा मानकरी ठरला. अमेरिकेत अनेक इमारती आणि संग्रहालयांना त्याचं नाव देण्यात आलं आहे. त्याच्यावर बरीच पुस्तकंही लिहिण्यात आली. अलीकडे ङ्गळीीं चरप : ढहश श्रळषश ेष छशळश्र अ.ईींीेपसङ्घ या नावाने जेम्स आर. हॅन्सन यांनी शब्दबद्घ केलेलं त्याचं अधिकृत आत्मचरित्र आलं आहे. 80व्या वर्षातही त्यानं स्वप्न पाहणं सोडलं नव्हतं. ‘मंगळावर जेव्हा पहिलं मानवी यान जाईल तेव्हा त्या यानाचा कमांडर व्हायला मला आवडेल’ हे त्याचं शेवटचं स्वप्न होतं. त्याच्या जाण्यानं मानवी इतिहासातलं एक सुवर्णपान मिटलं गेलं आहे.

(लेखक हे दै.’पुण्यनगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)

भ्रमणध्वनी – 8888744796

Previous articleआमदाराने नाचावं की, नाचू नये?
Next articleजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.