महात्मा गांधींची अनोखी प्रेमकहाणी

ssssssss.jpg

‘इंडिया टुडे’ या या देशातील लोकप्रिय साप्ताहिकाने आपल्या १९ जूनच्या अंकात महात्मा गांधींसोबत शेवटच्या काळात सावलीसारखी राहणारी त्यांची नात मनूबेनसोबत त्यांनी ब्रह्मचर्याचे प्रयोग कसे केलेत, त्या प्रयोगाचा तिच्या जीवनावर काय परिणाम झाला, याचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. मनुबेन गांधींनी त्या काळात लिहिलेल्या डायरीतील मजकूर त्यांनी जसाच्या तसा प्रकाशित केला आहे. देश जातीय दंगलीत होरपळत असताना आणि स्वातंत्र्य उंबरठय़ावर आलं असतांना गांधीजींच्या त्यावेळच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगामुळे तेव्हा प्रचंड खळबळ उडाली होती. त्यांच्यावर कठोर टीकाही झाली होती. वल्लभभाई पटेल, ठक्कर बापा हे त्यांचे जवळचे सहकारी अतिशय नाराज झाले होते. आजच्या पिढीला याबाबत फार माहिती नाही. मात्र याबाबत देशी-विदेशी लेखकांनी भरपूर लिहून ठेवलं आहे. त्या प्रयोगामुळे तेव्हा गांधीजींचे स्वीय सचिव असलेले आर.पी. परशुराम व निर्मलकुमार बोस त्यांना सोडून गेले होते. बोस यांनी त्यावेळचे अनुभव ‘माय डेज विथ गांधी’ या पुस्तकात लिहून ठेवले आहेत. गांधीजींचे सचिव प्यारेलाल यांच्या ‘लास्ट फेस ऑफ गांधी’ (मराठीत अनुवाद- ‘अखेरचे पर्व’) या पाच भागात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातही त्या प्रयोगामुळे निर्माण झालेल्या वादळाचा सविस्तर उल्लेख आहे. गांधीजींच्या जीवनातील एक असेच औत्सुक्यपूर्ण प्रकरण अलीकडेच उजेडात आले आहे. गांधीजींचा नातू राजमोहन गांधी यांनी Mohandas: The true story of a man, his people, and an Empire या पुस्तकात फारच कमी लोकांना माहित असलेली महात्मा गांधींची प्रेमकहाणी सविस्तरपणे सांगितली आहे. आपल्या विवेकबुद्धीवर कमालीचे नियंत्रण असलेले गांधीजी वयाच्या ५0 व्या वर्षी सरलादेवी चौधरी या अतिशय सुंदर व प्रतिभावंत स्त्रीच्या प्रेमात पडले होते आणि तिच्यासोबत लग्न करायला निघाले होते, हे खळबळजनक सत्य राजमोहन गांधींनी त्या पुस्तकात मांडले आहे.

राजमोहन गांधींनी आपल्या पुस्तकाच्या प्रारंभीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या आजोबांनी आयुष्यभर सत्याची आराधना केली. कुठलीही गोष्ट त्यांनी लपविली नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातला हा अध्याय दडपून ठेवावा असे मला वाटत नाही. ही कहाणी आहे ऑक्टोबर १९१९ ते डिसेंबर १९२0अशा उणापुर्‍या १४ महिन्यांची. ऑक्टोबर १९ मध्ये एका आंदोलनाच्यानिमित्ताने गांधीजी लाहोरमध्ये आले होते. त्यावेळी संपादक रामभुज दत्त चौधरी व सरला चौधरी या जोडप्याच्या घरी त्यांचा मुक्काम होता. आंदोलनात रामभुज चौधरींना तुरुंगात जावे लागले., त्यावेळी फुललेली ही प्रेमकहाणी आहे. या कहाणीतील उत्कटता समजून घेण्याअगोदर गांधीजी जिच्यामुळे प्रचंड प्रभावित होऊन वयाच्या ५0 व्या वर्षी दुसरं लग्न करायला निघाले होते त्या सरलादेवी चौधरींबद्दल माहिती जाणून घेऊया. इंद्रियांवर मात करण्याचा सातत्याने प्रयत्न करणार्‍या गांधीसारख्या मोठय़ा माणसाला जिने मोहित केलं होतं ती अर्थातच सामान्य स्त्री नव्हती. सरलादेवी ही महाकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या मोठय़ा बहिणीची अतिशय देखणी व तेवढीच हुशार मुलगी होती. तिचे वडिल जानकीनाथ घोषाल हे बंगालमधील काँग्रेसचे स्वातंत्र्यलढय़ातील महत्वाचे नेते होते. आई स्वर्णकुमारी १९ व्या शतकातल्या पारंपारिक बंगालमध्ये साहित्यविश्‍वात सक्रिय असं व्यक्तिमत्व होतं. अशा क्रियाशील जोडप्याने आपल्या लेकीला अतिशय उत्तम शिक्षण दिलं होतं. त्या काळात तिला इंग्रजी आणि फ्रेंच शिकायला त्यांनी परदेशात पाठविलं होतं. पर्शियन आणि संस्कृतमध्येही तिने प्रभुत्व मिळविलं होतं. घराण्याचं बाळकडू, उत्तम शिक्षण व देश-विदेशातील प्रतिभावंत व्यक्तिंचा सहवास लाभल्याने सरलादेवींच्या व्यक्तिमत्वात स्वाभाविकच अष्टपैलूत्व आलं होतं. शिक्षण झाल्यानंतर बंगालमधील सशस्त्र राष्ट्रवादी मंडळींसोबत तिचा संपर्क आला. ती लवकरच त्यांच्यासोबत काम करू लागली. या संघटनेसाठी तिने अनेक देशभक्तीपर गीत रचलीत व त्यांना संगीतही दिलं. त्या गीतांचा सतगान नावाचा संग्रहही काढण्यात आला होता. सरलादेवीच्या व्यक्तिमत्वाची मोहिनी तेव्हा भल्याभल्यांवर होती. स्वामी विवेकानंदांनी आपल्या अमेरिका दौर्‍यात तिला सोबत चलण्याची विनंती केली होती. पण घरच्यांनी परवानगी दिली नाही. पुढे लेखक, संपादक रामभुज दत्त चौधरीसोबत लग्न होऊन ती कोलकात्याहून लाहोरला आली. तिथेही ती चांगलीच सक्रिय होती.

लाहोरमध्ये सामाजिक व कौटुंबिक जीवनात ती रमली असताना गांधी नावाचं वादळ तिच्या आयुष्यात आलं आणि तिचं पुढील आयुष्यच बदलून गेलं. राजमोहन गांधींनी आपल्या पुस्तकात महात्मा गांधींनी सरलादेवींबद्दल इतरांना आणि सरलादेवींना लिहिलेल्या ज्या पत्रांचा समावेश केला आहे, त्यातून त्यांच्यात निर्माण झालेल्या नाजूक भावना स्पष्ट होतात. गांधीजींनी २७ ऑक्टोबर १९१९ ला अहमदाबाद आश्रमातील अनुसयाबेनला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, मी येथे मजेत आहे. सरलादेवी माझी अतिशय काळजी घेतात. त्या अतिशय प्रेमळ आहेत. त्यांचा सहवास कोणालाही आवडावा असाच आहे. नंतरच्या काही महिन्यात गांधीजी सरलादेवींच्या व्यक्तिमत्वामुळे अतिशय प्रभावित झाल्याचे दिसते.ते संपादित करत असलेल्या यंग इंडिया या साप्ताहिकाच्या पहिल्या पानावर त्यांनी तिची कविता प्रसिद्ध केली. नवजीवन या दुसर्‍या साप्ताहिकातही तिची एक दुसरी कविता छापून सोबत ती कविता परिपूर्ण असल्याचे सांगत गांधीजींनी तिची प्रशंसा केली. पुढील काळात हे दोघेही एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचे दिसते. २३ जानेवारी १९२0 ला एका मित्राला लिहलेल्या पत्रात त्यांनी ‘ Saraladevi has been showering her love on me in every possible wayया शब्दात सरलादेवी त्यांच्याशी कसं वागतात, हे लिहून ठेवलं आहे. २ मे १९२0 ला लाहोर सोडल्यानंतर सरलादेवींना लिहिलेल्या पत्रात गांधी म्हणतात, ‘अलीकडे तू नियमितपणे माझ्या स्वप्नात येतेस. हे आश्‍चर्य नाही की, पंडितजी (रामभुज दत्त चौधरी) तुला महान शक्ती म्हणतात.’ २३ ऑगस्ट १९२0 च्या पत्रातून त्यांच्या नात्यातील जवळीकतेवर अधिक प्रकाश पडतो. त्या पत्रात गांधी लिहतात ‘you are mine in purest sense. you ask for a reward of your great surrender, well, it is its own reward.’ गांधी आणि सरलादेवींनी एकमेकांना लिहिलेली अशी अनेक पत्र राजगोपाल गांधी यांनी आपल्या पुस्तकात नमूद केली आहेत. ती सारी पत्रं मुळातूनच वाचण्याजोगी आहेत. अतिशय सुंदर इंग्रजीत लिहिलेल्या त्या पत्रात एकमेकांबद्दलची अनिवार ओढ, तडफ, नात्याला नेमकं काय स्वरूप द्यायचं याबद्दलची संदिग्धता दिसून येते. गांधीजींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील मित्र हरमन कॅलीनबाच यांना सरलादेवींसोबतच्या आपल्या संबंधाबाबत १0 ऑगस्ट १९२0 रोजी एक पत्र लिहिले होते. त्यात ते म्हणतात ‘ our relation is beyond definition. I call Saraladevi my spiritual wife. one friend described it as a wedding based on knowledge.’ गांधीजी सरलादेवींना जी पत्रं लिहित त्याचा शेवट कधी ‘–‘ असा, तर ‘with love’ असा करत. कधी ते आपल्या पत्रात भगवत गीतेतील श्लोक नमूद करत तर कधी वैष्णव जन तो… या आवडत्या भजनाचा इंग्लिश अनुवाद टाकत असे.

महात्मा गांधी आणि सरलादेवी यांच्यातील नात्यांचा बारकाईने अभ्यास करणारे लेखक मार्टिन ग्रीन यांच्या मते गांधीजी सरलादेवीसोबत लग्न करण्यास अतिशय उत्सुक होते. त्यांच्यात प्रेम होतं, हे नाकारण्यात अर्थ नाही. सरलादेवीचं व्यक्तिमत्व त्यांना काहीसं देवी दुर्गेसारखं वाटत होतं. त्यामुळे तिच्यासोबतच्या लग्नातून आपलं व्यक्तिमत्व अधिक उन्नत होऊन स्वातंत्र्यांच्या लढाईत अधिक जोरकसपणे आपण आपलं योगदान देऊ शकू असे त्यांना वाटत होते, असे ग्रीन त्यांच्या पुस्तकात नमूद करतात. मात्र भारतात हे एवढं सरळसोपं घडून येणं शक्यच नव्हतं. गांधी आणि सरलादेवीत निर्माण झालेल्या नात्याबद्दल लवकरच कुजबूज सुरू झाली. गांधी दुसरं लग्न करू इच्छित आहे, ही बातमी त्यांच्या जवळच्या मंडळींसाठी अतिशय धक्कादायक होती. गांधीजींच्या घरातील सदस्य तर यामुळे कमालीचे प्रक्षुब्ध झालेत. राजगोपाल गांधी लिहितात, मला अजूनही तेव्हाचं घरातलं तंग वातावरण आठवते. ‘तेव्हा माझे वडिल आणि इतर सदस्य बापूंना हे काय झालं. त्यांना यातून बाहेर काढलं पाहिजे.,’ असे सातत्याने बोलत असे. बापूंची सरलादेवींबद्दलची ओढ कमी होत नाही हे लक्षात येताच त्यांचे चिरंजीव देवदास गांधींनी सी. राजगोपालचारींकडे धाव घेतली. महादेव देसाई आणि मथुरादास यांनाही त्यांनी कल्पना दिली. राजगोपालचारींना प्रकरण माहीत होतचं. त्यांनी गांधीजींना एक अतिशय कठोर पत्र लिहिले. त्यात त्यांनी गांधीजींची निर्भत्सना करताना ‘तुम्ही एक खोटा भ्रम बाळगून निसरड्या वाटेवर चालला आहात. कस्तुरबा आणि सरलादेवी यांच्यात कुठे तुलनाच होऊ शकत नाही. तुम्ही त्या भ्रमातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडणे हिताचं आहे. नाहीतर सार्‍यांचंच आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्याला जबाबदार तुम्ही असाल.’, असा इशारा दिला. देवदास गांधींनीही आपल्या वडिलांना कठोर शब्दात ‘तुम्ही जे करता ते ठीक नाही’, असे सुनावले. या सर्वांचा परिणाम म्हणा वा गांधीच्या आतील आवाजाने त्यांना समज दिली म्हणा, त्यांनी सरलादेवींसोबतचे संबंध तोडण्याचे कबूल केले. काही वर्षानंतर फादर लॅशला याबाबत लिहिलेल्या पत्रात गांधींनी कबूल केलं की, ‘त्यांच्या अतूट प्रेमाने मला अतिशय जोरकसपणे सरलादेवीपासून ओढून आणलं. त्यांनी मला वाचविलं.’

मात्र या घटनाक्रमाचा सरलादेवींवर खूप परिणाम झाला. एव्हाना ती गांधीजींच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. गांधींनी आपल्या नात्याला एक आकार द्यावा, याबाबत ती आग्रही होती. राजगोपालचारी आदी मंडळींनी बापूंना तिच्यापासून दूर केल्यानंतर तिने राजगोपालचारींना लिहिलेल्या पत्रात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणते, ‘एका पारड्यात जगातील सर्व खुषी आणि आनंद असावा आणि दुसर्‍या पारड्यात बापू आणि त्यांचे तत्व, नियम. अशा स्थितीत मी दुसरे पारडे निवडले. मात्र मला माझा मूर्खपणा आता कळतो आहे.’ तिने गांधीजींनाही माघार घेतल्याबद्दल कठोर पत्र लिहिले होते. त्याला गांधीजींनी मोठे तात्विक उत्तर दिले होते. ‘मी तुझ्याबद्दलच्या माझ्या प्रेमाचं विश्लेषण जेव्हा करतो, तेव्हा मी Spiritual marriage या कल्पनेपर्यंत जाऊन पोहोचतो. दोन भिन्नलिंगी व्यक्तितील हे बंध असे असणार आहे की, ज्यात शारीरिक भावनेला काही महत्व असणार नाही. हे असे संबंध भाऊ-बहिण, वडिल-मुलीतही असू शकतील.’ गांधींनी त्या पत्रात आणखीही बरंच काही लिहिलं. मात्र त्याचा सरलादेवींवर काही परिणाम झाला नाही. ती स्वतंत्र विचाराची स्त्री होती. गांधीजीसोबतचा नात्यातलं तिचं नेमकं स्थानं काय आहे, एवढंच ती जाणून घेऊ इच्छित होती. त्यांच्यातील नात्याला कायदेशीर स्वरुप मिळावं असेही तिला वाटत होते. गांधीजींकडून निराशा झाल्यानंतर तिने त्यांच्याकडे कायम पाठ फिरविली. १९२३ मध्ये तिच्या पतीचं निधन झाल्यानंतर ती कोलकात्याला गेली. तिथे तिने आध्यात्मिक साधनेत मन गुंतविण्याचा प्रयत्न केला. इतिहासकार दत्ता म्हणतात, ‘गांधीजींसोबतचं प्रेमप्रकरण ती आयुष्यभर विसरु शकली नाही. एवढय़ा प्रतिभावंत स्त्रीचं पुढील आयुष्य व्यर्थ गेलं, उद्ध्वस्त झालं.’ राजगोपाल गांधी या प्रकरणाबाबत पुस्तकात आपलं मत नोंदवितांना म्हणतात. ‘मागे वळून पाहताना तो माझ्या आजोबाच्या आयुष्यातला एक रोमांचक अध्याय होता, एवढंच म्हणावंस वाटतं. ते आयुष्यभर आपल्या पद्धतीने आयुष्य जगत आले. स्वत:शी झगडत, चुकांपासून शिकत, संघर्ष करत ते रस्ता शोधत असे. मला वाटते, या कथेतून ते आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने कळतील.’

संदर्भ – 1)  Mohandas: The true story of a man, his people, and an Empire
2) Gandhi- Voice of new age revolution- Marteen Green

3) The Tribune

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे
कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

Previous articleकचकड्याच्या दुनियेतील स्वप्नभंगाचे बळी
Next articleसासू-सुनेची तीच कटू कहाणी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.