माझी शाळा कंची?

– अमर हबीब

माझे आईवडील उर्दू भाषा बोलायचे. आम्ही भाऊबहिणीही एकमेकांशी उर्दूतच बोलत असू. माझे लग्न झाले. माझी पत्नी मराठी भाषा बोलणारी. तिच्या कुटुंबाची भाषा मराठी. आम्ही घरात मराठी बोलतो. आम्हाला मुलगी झाली. शाळेत घालायची वेळ आली. लोक म्हणाले, ‘उर्दूच्या शाळेत घाला.’ मी म्हणालो, ‘तिच्या आईची भाषा मराठी असल्याने मराठीच बरे पडेल.’ आम्ही आमच्या मुलीला प्रवेश घ्यायला शाळेत नेले. मुख्याध्यापकांच्या खोलीत सरस्वतीची प्रतिमा दिसली. मी विचारले, ‘ही प्रतिमा कशासाठी?’ मुख्याध्यापक म्हणाले, ‘आम्ही दररोज सरस्वती वंदना घेतो. त्या वेळेस या प्रतिमेची पूजा केली जाते.’ मला माझी मुलगी अशा शाळेत घालायची होती, जेथे कोणत्याच धर्माचे संस्कार केले जाणार नाहीत.

मी उठलो. दुसर्‍या शाळेत गेलो. तेथेही तेच. मुख्याध्यापक म्हणाले, ‘आमच्या शाळेत खूप चांगले संस्कार केले जातात. मुलांकडून ‘मनाचे ोक’ पाठ करून घेतले जातात.’ आणखी एका शाळेत गेलो तेव्हा पाहिले की, मुलं चक्क रामरक्षा म्हणत आहेत. मला हवी असलेली शाळा कोठेच सापडेना. शेवटी माझा नाइलाज झाला. अखेर घरापासून जवळ असलेल्या मराठी शाळेत तिचे नाव घातले. एके दिवशी तिने मला तोंडपाठ केलेला गायत्री मंत्र म्हणून दाखविला. तेव्हा माझ्या मनात चर्र झाले. हे लोक लहान लेकरांना माणसासारखे का जगू देत नसतील? हा प्रश्न मला सतत अस्वस्थ करीत राहिला.

दरम्यान खूप मोठा काळ गेला. माझ्या मुलाचे लग्न झाले. त्याची बायको उर्दू भाषक. मी माझ्या मुलाला सांगितले की, ‘आपण आपल्या घरात मराठी बोलतो; कारण आपल्या घरातील आई मराठी आहे. आता तुझ्या घरात उर्दू भाषा बोलली गेली पाहिजे. कारण तुझ्या घरातील आई उर्दू भाषा बोलणारी आहे. जसा मी मराठी शिकलो तसे तुला उर्दू शिकावे लागेल.’ माझ्या मुलाला माझे म्हणणे पटले. त्यांना मुलगा झाला. आम्ही त्याच्यासाठी चांगली शाळा शोधू लागलो. मुलीच्या वेळेसचा अनुभव माझ्या गाठीशी होता. तरी मला वाटले की, मोठा काळ लोटून गेला आहे, परिस्थिती बदलली असेल. त्या काळात कॉम्प्युटर नव्हता, टीव्हीचा एवढा प्रचार झालेला नव्हता, मोबाईलचा पत्ताच नव्हता. आमच्या गावात इंटरनेट आलेले नव्हते. आता जग आधुनिक झालेले आहे. माझ्या मुलीला मिळाली नसली तरी नातवाला ‘माणसांची शाळा’ नक्की मिळेल.

उर्दू माध्यमातून इंग्रजी शिकविणार्‍या शाळेत गेलो. त्यांच्या फलकावरच ‘इस्लामी शाळा’ असे लिहिलेले. दुसर्‍या शाळेचा प्रॉस्पेक्टस पाहिला. त्यात धार्मिक शिक्षणाची खास सोय असल्याचे आवर्जून नमूद केलेले होते. तिसर्‍या एका शाळेत पोचलो तर तेथील मॅडम बुरखा घालून रिक्षातून उतरताना दिसल्या. म्हटलं आपल्याला हवी असलेली ‘माणसांची शाळा’ या माध्यमात देखील मिळणार नाही. ज्या अगतिकतेने मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घालावे लागले होते, सुमारे २५-३0 वर्षांनंतर नेमक्या त्याच अगतिकतेने मला माझ्या नातवाला उर्दू माध्यमाच्या शाळेत दाखल करावे लागले.

एके दिवशी माझा मित्र त्याच्या शाळेत गेला. संस्थाचालकाने म्हणे माझ्या नातवाला बोलवून घेतले. उणे-पुरे चार वर्षांचा नातू. गोड आणि चुणचुणीत आहे. येताच त्याने सगळ्यांना सलाम केला. संस्थाचालक म्हणाला, ‘कलमा याद है?’ ‘जी हां’ म्हणून लगेच त्याने अख्खा कलमा तोंडपाठ म्हणून दाखविला. माझा मित्र त्याचे कौतुक करून हे सांगत होता. पण माझ्या मनात पुन्हा तसेच चर्र झाले. जसे मुलीकडून गायत्री मंत्र ऐकताना काही वर्षांपूर्वी झाले होते. हे लोक लेकरांना माणसासारखे का जगू देत नसतील? हा प्रश्न मला पुन्हा अस्वस्थ करू लागला.

मी वेगवेगळ्या धर्ममार्तंडांना विचारले, ‘लहान मूल वारले तर ते स्वर्गात जाते की नरकात?’ सगळ्या धर्माच्या मार्तंडांनीे एका सुरात सांगितले की, ‘ते थेट स्वर्गात जाते; कारण ते निरागस असते.’ मी म्हणालो, ‘असे असेल तर लहान मुलांच्या शाळांत धार्मिक संस्कार का केले जातात?’ शाळेतील धर्मसंस्कार ही बालकांची गरज नसून ती वडीलधार्‍यांची गरज आहे. थोरांच्या गरजेसाठी मुलांवर ओझे लादले जाते.

बागेत उमललेली सुंदर फुले आपल्या टेबलावरील फ्लॉवरपॉटमधे शोभून दिसेल, म्हणून निर्दयीपणे खुडली जातात. प्रत्येक धर्माच्या टेबलांवर अशा निर्जीव फुलांची सजावट मांडली जाते. या फुलांचा वास येत राहावा म्हणून हे लोक त्यावर आपल्या संस्कारांच्या अत्तराच्या बाटल्या ओतीत राहतात. मुलांचे भावविश्‍व कलुषित करणारे धार्मिक संस्कार लहान मुलांच्या शाळांमधून कधी हद्दपार होतील कोणास ठाऊक?

निदा फाजली म्हणतात,
हिंदू भी मजे में है, मुसलमान भी मजे में
इन्सान परेशां है, यहां भी और वहां भी..

मला अजूनही ‘माणसांची शाळा’ सापडली नाही.

(लेखक नामवंत सामाजिक कार्यकर्ते आहेत)

8411909909

Previous articleपंढरीची वारी : अवैष्णवांची मांदियाळी!
Next articleपोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.