विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल तर बोलावं तितकं कमीच आहे . खरं तर , उद्धव ठाकरे यांनी भाजपशी केलेली निवडणूकपूर्व युती तोडली म्हणून काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेत येता आलं . पण , ही सत्ता घालवण्याचं मुख्य श्रेय नाना पटोले यांचं आहे . त्यांनी तडकाफडकी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं तेही सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेला न सांगता . नंतर भविष्यात काय घडू शकेल यांचा अंदाज न घेता विधानसभा अध्यक्षपदी वेगवेगळ्या कारणांनी सत्ताधारी आघाडीतील कुणाचीच निवड करता आली नाही आणि आधी शिवसेनेत व नंतर राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची कधीच न सुटू शकणारी राजकीय कोंडी झाली ; शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना तर केविलवाण्या पद्धतीनं बॅकफूटवर जावं लागलं आहे . अध्यक्षपद जर रिक्त नसतं तर या राज्यात काँग्रेस , आधी उद्धव ठाकरे आणि नंतर शरद पवार यांना राजकीय अरण्यरुदन करण्याची वेळच आली नसती .