आपल्याला हेच दिसलं की माद्री त्या संसारात दबलेली होती. पण नाही हो, कुंतीला माद्रीच्या सौंदर्याचा भयंकर कॉम्प्लेक्स होता. त्यात तिला झालेले जुळे आणि काहीच वेळ, अर्धवट का होईना तिला मिळालेला पतीचा सहवास. कुंतीचा तोल सुटला आणि ती माद्रीला अद्वातद्वा बोलली. तिच्या सौंदर्याला शाप दिले, तिच्यावर पतीहत्त्येचे आरोप लावले. माद्रीने खालमानेने सगळं ऐकलं. तिच्या लक्षात आलं की आता या कुटुंबात आपले निभणार नाही. ती चितेवर चढली, आणि पंडूचं कलेवर मांडीवर घेऊन सती गेली. अक्षरश: माती झाली तिच्या आयुष्याची. चौदाव्या वर्षी लग्न करून वधू झालेली माद्री त्या राजपरिवारात सतत जळत राहिली आणि सव्वीस, सत्ताविसाव्या वर्षी दोन मुलगे सवतीच्या स्वाधीन करून चितेच्या ज्वाळेत विलीन झाली. माहेर पारखं झालेलं, सासरी शून्य किंमत आणि थोरामोठ्या घरची कुंती, सवत म्हणून डोक्यावर बसलेली. माद्रीला कसलेही सुख भरभरून मिळाले नाही. कुंती निदान वैभवशाली राज्याची राजमाता तरी झाली, माद्रीच्या नशिबात तर सगळा रखरखाटच. ती सुटली!