त्यामुळे, नेहरूंच्या “आयडिया ऑफ इंडिया”कडून मोदींच्या ‘नव्या भारता’कडे लोक का वळत आहेत याचा विचार होणे आवश्यक होऊन बसते. हा अभ्यास करताना मोदींच्या राजकीय आणि वैचारिक विरोधकांचा किंवा मोदींच्या धोरणामुळे ज्यांच्या हितसंबंधांना बाधा आली आहे त्यांचा विचार आपण येथे करणार नाही. हिदुत्ववाद्यांचाही विचार येथे प्रस्तुत नाही. सर्वसामान्य भारतीय, जो मुळचा हिदुत्ववादी नाही, पण आज घटकेला मोदींच्या भाजपबरोबर जायला जो तयार आहे, त्याच्या मनोभूमिकेत गेल्या सत्तरवर्षात का फरक पडत गेला आणि या फरकाचे स्वरूप काय आहे हे पाहण्याचा येथे प्रयत्न आहे. यापैकी लोकशाही आणि समाजवाद या दोन मुद्द्यांचा विचार आपण करणार नाही, कारण, मोदी लोकशाही नष्ट करायला निघाले आहेत असे सामान्य माणसांना वाटत नाही. आणि समाजवादाची तर जागतिक मंचावरतीच पीछेहाट झाली आहे. यासाठी या दोन मुद्द्यांवरील चर्चा टाळून आपण सेक्युलॅरिसम आणि उदारमतवाद या मुद्द्यांकडे वळूया.
पण, मोदींचा भारत नेहरूंच्या भारतापेक्षा आणखी एका बाबतीत वेगळा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकोणीसशे पन्नासच्या दशकात गुन्नर मिर्दाल या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थशास्त्रज्ञाने लिहिलेल्या “एशियन ड्रामा” या त्रिखंडात्मक ग्रंथात भारत हे ‘सॉफ्ट स्टेट’ असेल – ‘एक मवाळ देश’ असेल, असे भविष्य वर्तवले होते. ‘चलता है’-‘जाने दो’-संस्कृती हीच भारताची ओळख ठरण्याची शक्यता त्याने वर्तवली होती. आर्थिक भ्रष्टाचाराला गांभीर्याने न घेणे, वैचारिक भोंगळपणा, अकार्यक्षमता आणि प्रश्नाला सामोरे जाण्यापेक्षा त्याला टाळण्याची वृत्ती हीच आमची व्यवच्छेदक लक्षणे ठरतील असे त्याचे भाकीत होते. त्या काळातील परिस्थिती पाहता मिर्दालचे निरीक्षण योग्यच होते. अंतर्गत प्रशासन, देशाचे संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार यात सर्वसामान्यपणे टोकाची भूमिका नेहरूंनी टाळली होती. पण, आज साठपासष्ट वर्षांनी मिर्दालचे भाकित मोदी खोटे ठरवतील असे वाटते. ‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ अशी प्रतिज्ञा करून काही *’हार्ड डिसिजन’ त्यांनी घेतले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी ते करून घेत आहेत. ‘यहाँ कुछ होने-जानेवाला नही है.’ही भावना दूर करण्यात मोदी बऱ्याच प्रमाणात यशस्वी होत आहेत असे वाटते.’
बासष्टच्या चीनबरोबरच्या युद्धात भारताने हवाईदलाच्या वापर केला असता तर, बहुदा, युद्धाचा निकाल वेगळा लागला असता असे म्हटले जाते. कारण, त्यावेळी, आमचे हवाईदल चीनच्या हवाईदलापेक्षा चांगले होते. पण युद्धाची व्याप्ती वाढेल या भीतीने आम्ही हवाईदल वापरले नाही. कारगिल युद्धात, सर्व जम्मू-काश्मीर राज्य आमचे आहे असा आमचा दावा असतानाही, काश्मीरची युद्धबंदी-रेषा आम्ही ओलांडली नाही. त्यापायी आम्ही मनुष्यहानीही पत्करली. आमच्या आणखी एका पंतप्रधानांनी चीनला आश्वासन दिले होते की, चीनच्या हिताच्या आड येणारी कोणतीही गोष्ट आम्ही करणार नाही. त्यावेळी, चीन मात्र आमच्या हिताच्या आड येणाऱ्या गोष्टी करतच होता. मोदी या तीनही पंतप्रधानापेक्षा वेगळे ठरतात. ते अशाच एका प्रसंगी म्हणाले होते की, ‘मैं न ऑंख उठाके बात करुंगा, न ऑंख झुकाके बात करुंगा, मैं ऑंख मिलाके बात करुंगा’ आणि काही गोष्टीत त्यांनी तसे करूनही दाखवल आहे. अजून देशांतर्गतही असे अनेक प्रश्न आहेत की, *जे ‘हार्ड डिसिजन’ घेतल्याशिवाय सुटणार नाहीत.*
एकांगी लिहिलेला लेख