जिंदगी जीने का नाम है!

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येने अनेकांना मानसिक धक्का बसला आहे.    केवळ ३४ वर्षांच्या या देखण्या अभिनेत्याला असं कुठलं दु:ख कुरतडत होतं की ज्यामुळे त्याने आपलं बहुमोल आयुष्य एकाएकी संपवून टाकलं, याबाबत सर्व स्तरांमध्ये चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तीन नामंकित संपादक संजय आवटे, शैलेश पांडे व विजय चोरमारे यांचे हे लेख वाचायलाच हवेत.

………………………………….

-संजय आवटे, संपादक, ‘दिव्य मराठी’

जगू या, जिंकू या!

सलमान खान हा काही विचारवंत वगैरे अभिनेता नव्हे. पण, त्याच्या एका मुलाखतीनं मला पार हादरवून टाकलं.
त्याला विचारलं गेलं होतंः “तुझं दुःख तू कोणाशी शेअर करतोस?”
तोवर पोरकट हसत जोक्स मारणारा सलमान एकदम थबकला. गंभीर झाला.

म्हणाला, “कोणाशीच नाही! कारण समजा मी माझ्या सहका-यांसोबत दुःख शेअर केलं, तर ते मला समजावतील. पण, खासगीत हसतील. माझा रडका चेहरा बघून खुश होतील.”

“माझ्या काही मित्रांशी मी ते शेअर करू शकतो. पण, मला भीती आहे की, त्यांना याचाच आनंद होईल की साक्षात सलमान आपल्याशी एवढं पर्सनल काही शेअर करतोय!”

“माझ्या खांद्यावर हात ठेऊन, मला समजावताना काही लोकांचा इगो सुखावेल.”

“आईसारखे काही खूप जवळचे लोक आहेत, ज्यांच्याशी मी हे शेअर करू शकतो. पण चिंता अशी आहे की, हे लोक त्यामुळे स्वतःच एवढे निराश होतील, की मला भीती वाटते.”

“त्यामुळे अद्याप तरी मला असं कोणी मिळालेलं नाही की ज्यांच्याशी मी माझं दुःख शेअर करू शकेन!”
***

मनातला हा अंधार खरंच कोणासोबत शेअर करायचा?

आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात अंधार आहे. पण, हा अंधार दाखवणारी कोणती ‘इमोजी’ नाही. तो व्यक्त करण्याची कोणाची तयारी नाही. तुझ्या अंधाराशी मी काही नातं सांगत नाही. आणि, माझ्या अंधाराशी तुझा जैव संबंध नाही!
आपल्याही नकळत या अंधाराचं मोठं साम्राज्य तयार झालं आहे, हे आपल्या गावीही नाही.

काही लोक निराश आहेत, खोल डिप्रेशनमध्ये आहेत, हे आपल्याला समजत नाही, असं नाही. पण, उलटपक्षी अनेकदा त्याचं ‘गॉसिप’ होतं, थट्टा होते आणि ‘बरं झालं, आपल्या रस्त्यातला एक स्पर्धक दूर झाला’, असंही लोकांना वाटतं.

तुम्हाला गंमत माहीत आहे? तुम्ही एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये निराश दिसलात, थकलेले जाणवलात तर लोकांना काळजीच वाटेल, असं नाही. ‘त्याला प्रमोशन नाही मिळत बरं का, बघितलंस ना चेहरा कसा रडवेला दिसत होता त्याचा’, असं गॉसिप होणारच नाही, असं नाही.

कला ही आनंदाची सर्जक शक्यता. पण, आनंदाचे झरे फुलवणा-या या क्षेत्रातले लोक तर एकमेकांचं जगणं संपवून टाकण्यासाठी कसे आणि किती टपलेले असतात, हे तुम्हाला अगदी सामान्य तबलावादकांपासून ते साहित्यापर्यंत आणि गायकांपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वदूर दिसेल. कुठलंच क्षेत्र इथं अपवाद नाही.

हा मानवी स्वभाव कसा आहे, तेच समजत नाही.

आपल्यासमोर आपला एखादा मित्र चालता चालता घसरून पडला, तरी ‘रिफ्लेक्स ॲक्शन’सारखे आपल्याला आधी हसू फुटते. मग आपण त्याला उठवण्यासाठी हात देतो!

मला आठवतं, लहानपणी आम्ही सगळेच मित्र सायकल शिकायचो. एखाद्यानं जरा भारीतली सायकल आणली असेल आणि थोडं स्टाइलमध्ये सायकल चालवत गावभर फिरत असेल तर “असा बाराच्या भावात पडावा लागतो ना…” अशी शुभेच्छा असायची!

माणसं दिसतात सोबत, पण किती जखमी करत असतात एकमेकांना! बोचकारत असतात. ओरबाडत असतात. घर नावाचं भारतीय प्रारूप हे तर ऊब कमी देतं आणि ऊर्जा अधिक शोषतं. नस्ते गुंते तयार करतं. सोपं जगणं क्लिष्ट करून टाकतं. कोणीच कोणाशी बोलत नाही. ‘डिप्लोमसी’ सुरू असते सगळी. जिथं ‘प्रेमात पडले’, हे पोरगी आईला सांगू शकत नाही, तिथं आणखी काय संवाद होणार? “माझ्याशी भांडायला, खुन्नस द्यायला मी काय भावकी आहे का त्याची?”, असं गावात सहजपणे बोललं जातं. अशा नात्यांचं काय करायचं?

आपल्यासारख्या आध्यात्मिक देशात तर हा भोंदूपणा भयंकर आहे. भौतिक गोष्टींचे आकर्षण नाही, असे म्हणायचे आणि प्रत्यक्षात मात्र त्यासाठी एकमेकांचा जीव घ्यायला सज्ज व्हायचे! प्रतिभा, प्रयत्न, प्राक्तन याच्या आधारावर प्रगती करण्याची आकांक्षा बाळगण्यात गैर काही नाहीच. पण, त्यासाठी माणसं खोडण्याची, भिंती बांधण्याची ही कसली विखारी विकृती?

अशा वेळी कोण कोणाशी बोलेल? संवाद कसा होईल?

जगणं हे मूलभूत आहे. प्रसिद्धी, पैसा, यश अशी आकांक्षा असू शकतेच, पण ते काही जगण्याचे प्रयोजन नाही. जगणे हेच जगण्याचे प्रयोजन आहे.

तुम्ही कलेक्टर आहात, स्टार आहात, मंत्री आहात, शिपाई आहात, उद्योजक आहात की शेतकरी आहात, यामुळे त्यात काही फरक पडत नाही.

मी बी.एस्सी (ॲग्री) केलं. आमच्याकडं सगळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे. माझ्या एकट्या बॅचचे पन्नासेक जण तरी आयआरएस, आयपीएससह क्लास वन ऑफिसर वगैरे असतील. काही ग्रामसेवक, काही कृषी पर्यवेक्षक, व्यावसायिक, एलआयसीत ऑफिसर, काही शेतकरीही. आमच्या बॅचचं ‘गेट टुगेदर’ दरवर्षी करायचं, अशी कल्पना दहा वर्षांपूर्वी पुढे आली. सुरूवातीच्या ‘गेट टुगेदर’मध्ये ‘वर्गवाद’ असायचा. डेप्युटी कलेक्टरला आपण ग्रामसेवकापेक्षा थोर असे वाटायचे. किंवा, त्याला नाही वाटले, तरी ग्रामसेवकाला न्यूनगंड असायचा. मग डीवायएसपी मोठा, सुपरवायझर बारका असे सगळे पोटभेद होते. गेल्या दहा वर्षांत सगळ्यांच्या लक्षात आलंय की यामुळं काही फरक पडत नाही, यार. तुझ्याकडे इनोव्हा असेल, माझ्याकडं बाइक असेल, पण त्यामुळं काय फरक पडतो? जगण्यातली धमाल महत्त्वाची. जगण्यावर हक्क प्रत्येकाचा आहे. टेरेस कोणाच्या मालकीचं असलं, म्हणून त्यावरून दिसणारं आकाश त्याच्या मालकीचं थोडंच आहे! आता अशी अवस्था आहे की आम्ही दोन वर्षांपूर्वी गोव्यात आणि गेल्या वर्षी दुबईत ‘गेट टुगेदर’ केलं, तेव्हा हे सगळे भेद मुळासकट उपटले गेले होते. ग्रामसेवक कमिशनरला ×××वर लाथ घालून बेडवरून उठवत होता!

आमचा एक मित्र कॉलेजात टॉपर होता. तो पुढं सायंटिस्ट वा आयएएस होणार, अशी आम्हाला खात्री होती. पुढं अगदी सामान्य मार्कांची पोरं एसपी, कमिशनर वगैरे झाली. हा मात्र गायक झाला. आर्थिक आघाडीवर यथातथाच राहिला. पण, तहानभूक हरपून गाताना तो केवढा देखणा दिसतो! पहिल्या भेटीत सगळ्यांनाच त्याच्या नव्या रुपाचा धक्का बसला. आता मात्र आमच्या ‘गेट टुगेदर’चा खरा ‘हीरो’ तो असतो! टॉपर असताना या ‘चष्मेबद्दू’ला कधीच हा सन्मान मिळाला नाही, जो त्याला आज मिळतो.
कोणाला काही त्रास होण्याचा, मदत हवी असण्याचा अवकाश, आमची सगळी फौज कोणत्याही मित्राला मदत करायला उभी असते. मैत्र हे असतं.

केशवसुत म्हणाले तेच खरं.
‘जग केवढं, ज्याच्या- त्याच्या डोक्याएवढं’

त्याचा पदाशी वा पगाराशी काही संबंध नाही. हे डोक रूंदावणं, मन विशाल करणं हेच गुपित आहे, तुमचं जग व्यापक करण्याचं. मग कळतं, जगण्यात मौज आहे. मुक्कामात नाही, प्रवासात गंमत आहे.

त्यासाठी आपलं जग तर बदलावं लागेलच, पण ‘माणूस’ म्हणून हा भवतालही बदलावा लागेल. आपली जगण्याची गोष्ट आहे, तशी प्रत्येकाच्या जगण्याची गोष्ट आहे. ती समजून घ्यावी लागेल. त्यासाठी कोणाच्या पश्चात नाही. त्याच्याशी थेट बोलावं लागेल. कोणाच्या शेतातला बांध जेसीबीनं उद्ध्वस्त करण्यापेक्षा या सीमा प्रश्नावर एकमेकांशी बोलावं लागेल.

“गैरों से कहा तुमने,
गैरों से सुना तुमने!
कभी हम से कहां होता,
कभी हम से सुना होता!”

हीच तर सल आहे.

तेव्हा, बोलू एकमेकांशी आणि मुख्य म्हणजे, एकमेकांशी बोलण्याचा अवकाश जिवंत ठेऊ. नाहीतर, सुशांतसारखे काही आत्महत्या करतील, उरलेले रोज मरत-मरत दिवस काढतील.

हे जग सुंदर करायचं असेल आणि ‘जगणेबल’ करायचं असेल, तर आधी छान निखळ माणूस व्हावं लागेल. माणसांची निरपेक्ष सोबत करावी लागेल. तुम्ही कोणावर प्रेम करता, तेव्हा तुम्ही स्वतःवरही प्रेम करायला शिकता. तुम्ही कोणावर विश्वास ठेवता, तेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास अढळ होत जातो. तुम्ही कोणाशी बोलता, तेव्हा स्वतःशीच बोलत असता! आपल्यामुळं कुणाचा गेम झाला, यापेक्षा आपल्यामुळं कोणाच्या चेह-यावर हसू फुललं, याचा आनंद किती थोर असतो! हेच तर जिंकणं आहे!

मी आहे यार, कारण तू आहेस. आपण आहोत.

सोबत राहू, असेच.
जगू या, जिंकू या!
Love u All

……………………………………………………………

-शैलेश पांडे, संपादक , ‘सकाळ’, विदर्भ आवृत्ती

सुशांतचं जाणं…

चिल्लर असतात हो प्रॉब्लेम्स! जगणं कितीही challanging असलं तरी समस्या/ अडचणी आपण त्यांच्यासमोर वाकावं/संपावं एवढया मोठया नसतातच। काय शाश्वत आहे आपलं? … फक्त अस्थिरता तेवढी स्थिर आणि बाकी सगळं फिरतंय. फिरावं आपणही.मजा घ्यावी. एका समस्येशी खेळण्याने मन भरलं तर दुसरी हाताळावी.अनेक समस्या तर त्यांना हात न लावता सुध्दा संपतात. जिवाभावाची माणसं मरतात. बाकीचे जगतातच ना! काही लोक आपल्याला सोडून जातात/ त्याग करतात

… दुसरं काही तरी धरतात। त्यांना जाऊ द्यावं.👍💐 शुभेच्छा द्याव्यात आणि आपण आपला मार्ग धरावा। या मार्गात आपलं वाटेल असं कुणी भेटलं तर ठीक/ otherwise मस्त मगन मौला कलंदर बनावं/ आपल्या style ने जगावे. ओशो म्हणतात: ”स्वतःच्या सोबत राहायला शिका. दुसऱ्या कोणत्याही व्यक्ती वा वस्तुतून तुम्हाला पूर्णत्व किंवा आनंद मिळत नाही…” प्रपंच करावा नेटका. आपल्या माणसांची खूप काळजी घ्यावी. आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना हजार पट परतावा द्यावा. पण गुंतू नये कशातच.समस्या असोत की माणसे, कुणाचाच पाठलाग करू नये. चालत राहावं.सोबत असेल तो आपला… माणूस असेल किंवा प्रॉब्लेम😊! प्रॉब्लेम्स न बोलावता येतात. त्यांच्याबद्दल आपुलकी वाटावी.त्यांचं तरी कोण असतं बरं? आपण माणसंच ना!…
माणसं नसतील तर depression/ निद्रानाश वगैरे बैलांच्या वाट्याला येतील का? हे सगळं माणसांचंच आहे। जगण्याचं जे package असतं ना, त्यातच असतं सगळं.

थोडा-थोडा सब taste तो करना पडेगा ना यार? शेवटी काही तरी उष्टे सोडावेच लागते हे खरे. पण ठरवलं तर बहुतेक गोष्टी taste होऊ शकतात. स्वीट शेवटी खाण्याची मजा हवी असेल तर दन्न सावजी, सन्न रस्सा या मंडळींना डोळ्यात पाणी आणण्यासाठी सोबत घ्या. मग स्वीट खा. काहींना सगळ्यांच्या प्लेटमधलं स्वीट-स्वीट तेवढं हवं असतं. त्यांचं तोंड गोड असेल, पण जीवन एकदम पांचट. आपल्या होकार-नकारांचे पण एक समीकरण तयार होत असते जगताना. म्हणून होकार विचारपूर्वक आणि नकार निर्धारपूर्वक द्यायचे असतात.यात चुकलो तर त्याचीही टेस्ट घ्यावी सहज. सगळ्या गोष्टी चाखण्याची तयारी ठेवली तर मजा म्हणजे मजा येतेच। जगण्याचं हे पॅकेज तुकड्याने मिळत नाही। ते अख्खे स्वीकारावे लागते. life is like this only. Very cruel, yet worth living. त्यावर स्वार व्हायचे असते.पडलो तरी उठून पुन्हा स्वार व्हावे आणि रपेट मारावी. स्वतःवर आणि भवतालावर प्रसन्न हसत राहावं.

आमचा एक मित्र म्हणतो- नॉनसेन्स एन्जॉय करायला शिकलं की जीवनात लई मज्जा येते! दुसरा म्हणतो- reactच व्हायचं नाही, गम्मत पाहायची… आपोआप results येतात…जो साथ आ रहा है, वो अपना; चाहे प्रॉब्लेम क्यु न हो/… आणि जो जातोय म्हणतो, त्याला रोखू नये। मग ते काहीही-कुणीही असू दे! यातला कोणताच thumb rule नाही। पण असे चक्रम फंडे वापरले तरच मस्तीत जगता येतं। मित्रांचा ‘निर्मोही’ आखाडा ही नॉनसेन्स एन्जॉय करण्याची आणि प्रॉब्लेमला गुदगुल्या करण्याची जागा असते। अशा जागा निर्माण कराव्यात आणि त्या जिकिरीने टिकवाव्यात.त्यासाठी त्याग करावा.भांडण करावं.पैसा खर्च करावा. पण ते टिकवावं.कामधंदा/प्रपंच करतानाही ‘मैफिल’ आणि ‘माहोल’ जगता येण्यासारखं भाग्य नसतं यार हो…

Sushant, it’s too early…

(ता. क.: या मजकुराचा कोणत्याही शास्त्राशी संबंध नाही। सुशांतच्या मृत्यूचे हे analysis नाही। ती घटना underestimate करण्यासारखी नाहीच। दुःखदच आहे। त्या घटनेला वैयक्तिक तर्कट लावणे योग्य नाही ही समज आहे मला। कोणत्याही एका माणसाचे जीवन दुसऱ्या कुणासारखे नसते हेही मान्य आहे। तरीही जगण्याचा एक approach असतो आपापला। हा मजकूर त्या अर्थाने घ्यावा। it’s an approach of a lesser being like me.
त्या घटनेनंतर मनातली जी काही स्पंदनं आहेत, ती आपल्या सोबतच्या माणसांना कळावीत म्हणून लिहिलंय। काही लोकांनी फार गंभीरपणे मला फोन केला हे वाचून… म्हणून हा खुलासा)

……………………………………

-विजय चोरमारे, वरिष्ठ सहायक संपादक, महाराष्ट्र टाइम्स

आभासी जगण्यात वास्तवातले गुंते

`जिंदगी में अगर कुछ सबसे ज्यादा इंपोर्टेंट है तो वो है खुद की जिंदगी`

आज दुपारपासून या डॉयलॉगची चर्चा सुरू आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनं सगळ्यांनाच चटका लावला. इरफान खानचं जाणंही असंच चटका लावणारं होतं. अशी एखादी घटना घडते तेव्हा सोशल मीडियावर भावनेचा पूर येतो. लोक भरभरून व्यक्त व्हायला लागतात. खरंतर सुशांतसिंह हा काही सलमान, आमीर, शाहरूख, अक्षयकुमार, अजय देवगण, रणबीर कपूर, रणवीर सिंग नव्हे. म्हणजे कालपर्यंत तुमचा आवडता हिरो कोणता असा प्रश्न शंभर लोकांना विचारला असता तर कदाचित शंभरातल्या एकाही माणसानं सुशांतसिंह राजपूतचं नाव घेतलं नसतं. तरीसुद्धा सुशांतसिंह अनेकांना आवडत होता. त्याचं व्यक्तिमत्त्व भुरळ पाडणारं होतं. त्यानं आपल्या वाट्याला आलेली जी काही कामं केली ती त्याला ओळख मिळवून देणारी होती. कुणाला कमी मिळालं किंवा जास्ती मिळालं याचं मोजमाप करता येत नाही. परंतु टीव्हीच्या पडद्यामार्गे मोठ्या पडद्यावर येऊन इथं यश मिळवणा-या भाग्यवानांपैकी सुशांतसिंह राजपूत होता. त्याच्या आधी शाहरूख खाननं ते मिळवून दाखवलं होतं. सुशांतसिंह शाहरूखएवढा मोठा सुपरस्टार बनू शकला नाही तरी बॉलीवूडमध्ये त्यानं आपली ओळख निर्माण केली होती.

मुद्दा आहे सुशांतसिंहच्या जाण्यानंतर जो शोकाचा पूर आला त्याचा. कोणत्याही धक्कादायक घटनेनंतरचं व्यक्त होणं असंच असतं. आजच्या काळात जिथं एखाद्या विषयावर कुणाशी बोलायचं असा प्रश्न असतो तेव्हा अनेकांना सोशल मीडियाचा आधार वाटतो. सोशल मीडियाचं जग आभासी असलं तरी तिथं प्रत्येकाला त्याची स्पेस मिळत असते. जे मनात आलं ते पट्कन बोलून टाकल्यासारखं व्यक्त होऊन मोकळं होता येतं. आज सुशांतसिंहच्या निमित्तानं जे व्यक्त झालेत त्यातील अनेकांचं एका मुद्याबाबत एकमत होतं, ते म्हणजे माणसाचं एकटेपण. व्यक्त होण्यासाठी कुणी जवळचं नसणं वगैरे. व्यक्त होणा-या सगळ्यांच्या भावनांचा आदर राखून एक प्रश्न सगळ्यांसाठी विचारावासा वाटतो, तो म्हणजे आपण कुणाला किती स्पेस देतो? सोशल मीडियावरच्या पोस्ट लाइक करणं म्हणजे संपर्कात राहणं नव्हे. पुन्हा हे आभासी जग आभासीच असतं. तिथं मुखवट्याशिवाय वावरणारी आणि आभासी जगाच्या पलीकडं माणूस म्हणून वागणारी-बोलणारी माणसं खूप कमी असतात. इतर कुणासंदर्भात न बोलता स्वतःपासून तपासणी सुरू केली तर काय दिसतं बघा.

फार लांब नाही, आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह असलेले नंबर बघा. आपण कधीच फोन केला नाही, असे किती लोक आहेत किंवा आपल्याला ज्यांनी कधी फोन केला नाही असे किती लोक आहेत? परवा एका मित्रानं एका नामवंत साहित्यिकाचा नंबर माझ्याकडं मागितला. माझ्याकडं नसल्यामुळं मी रामदास फुटाणेनानांच्याकडं विचारणा केली. तर ते म्हणाले, गेल्याच आठवड्यात मी त्याचा नंबर डिलीट केला. आपण वेगवेगळ्या निमित्तांनी काहीवेळा फोन केला असतानाही ज्यांनी तीन वर्षांत एकदाही फोन केला नाही असे नंबर डिलीट करून टाकल्याचे त्यांनी सांगितले. रामदास फुटाणे हे सातत्यानं लोकांशी बोलणारे, संपर्कातल्या लोकांना फोन करणा-या व्यक्तिंपैकी आहेत. तसे आणखीही बरेच लोक आहेत, मुद्दाम फोन करणारे, बोलणारे. पण अनेकजण असे असतात की कारणाशिवाय कधी कुणाला फोन करत नाहीत. त्यांची प्रत्येक कृती हेतूपूर्ण आणि राजकीय असते. आपण कारणाशिवाय कधी कुणाला फोन केला होता का, याची सहज स्वतःपुरती उलटतपासणी घेतली तरी स्वतःची नव्यानं ओळख होऊ शकेल.

आणखी एक स्वतःची उलटतपासणी घेता येऊ शकेल. जवळपास तीन महिने अनेकजण घरातून काम करताहेत. किंवा कामधंदे बंद असल्यामळे घरात बसून आहेत. आपल्या कार्यालयातील सहका-यांशी किंवा नेहमीच्या संपर्कातील लोकांशी आपण कारणाशिवाय कधी बोललो का? अनेकांच्या नोक-या गेल्यात त्यांच्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न केला का? प्रत्येकवेळी मदत करण्याची आवश्यकता नसते, किंबहुना कुणाला मदतीची अपेक्षाही नसते, परंतु मी आहे… एवढा दिलासा समोरच्याला देण्याची आवश्यकता असते. तसा प्रयत्न आपण कधी केला का?

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. बराच काळ एका नातेवाईकांच्याकडं गेलो नव्हतो. मुद्दाम वेळ काढून त्यांच्याकडं गेलो. त्यांना आनंद झाला. पण मी कोणत्याही कारणाशिवाय आलोय हे त्यांना काही पटेना. बराच वेळ थांबून निघाल्यानंतरही सोडायला आल्यावर ते पुन्हा पुन्हा विचारत होते, काही काम नव्हतं ना? दुस-या दिवशी त्यांनी फोन करून विचारलं, की खरंच काही काम नव्हतं ना ? कदाचित त्यांना वाटलं असेल की पैसे उसने मागायला वगैरे आलो असणार आणि ऐनवेळी बेत बदलला असणार. मुद्दा असा आहे की, सख्खे नातेवाईकसुद्धा एकमेकांकडं कारणाशिवाय जात नाहीत. लॉकडाऊनचा काळ सोडून द्या. त्याआधीची परिस्थिती वेगळी नव्हती. आणि लॉक डाऊन उठल्यानंतरही परिस्थिती फारशी वेगळी असेल असं नाही. सोशल मीडियाच्या आभासी जगात जगायला हरकत नाही, परंतु वास्तव जगातल्या माणसांपासून तुटत जाणं धोकादायक ठरू शकतं. आभासी जगण्यातून वास्तवातल्या गुंत्यांची उत्तरं मिळत नाहीत.

वीसेक वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या एका नामवंत कवीचा मृत्यू झाला. ती आत्महत्या असावी. त्याचं मित्रवर्तुळ खूप मोठं होतं. शहरातली नाटक, कवितेच्या क्षेत्रातली उच्च मध्यमवर्गीय म्हणता येईल अशी मंडळी त्यात होती. त्या कवीच्या शोकसभेत सगळ्यांचा एकच सूर होता तो म्हणजे, आपण त्याला समजून घेऊ शकलो नाही. खरंतर तो जिवंत होता तेव्हा यातले बहुतेकजण तो कसा वाया गेला आहे, तो कसा विक्षिप्तासारखा वागतोय याचे किस्से एकमेकांना सांगत होते. आणि मेल्यावर आपण त्याला समजून घेण्यात कमी पडल्याचा पश्चात्ताप! याला पश्चात्तापाची कबुली नव्हे तर दांभिकपणा म्हणतात. आजकाल हा दांभिकपणा समाजाचा स्थायीभाव बनलाय.

आजकाल मुखवटे घालून वावरण्याचं प्रमाण वाढलंय. ते खूप धोकादायक आहे. हे मुखवटेच माणसाचा घात करतात. माणूस म्हणून नीट जगायचं असेल तर मुखवटे फेकून देऊन जगाला फाट्यावर मारून जगायला शिकलं पाहिजे. कुणीतरी जवळचं असायला पाहिजे वगैरे ठीक. ते असायलाच पाहिजे. परंतु आपलं कुणीतरी जवळचं असायला पाहिजे असं म्हणताना आपल्याला कुणी जवळचं मानतं का, ते मानावं असा आपला वर्तनव्यवहार असतो का याचाही विचार करायला पाहिजे. बाकी नटनट्यांना, झगमगाटी क्षेत्रातल्या लोकांना नैराश्यानं, अस्थिरतेनं, भविष्याच्या चिंतेनं ग्रासलंय आणि दरमहा महिनाअखेर साजरी करणारी,पगारकपात झाल्यानंतर हप्ते भरताना ओढाताण होणारी कनिष्ठ मध्यमवर्गीय नोकरदार मंडळी आनंदात जगताहेत अशातला भाग नाही. दुःख छोटं किंवा मोठं नसतं. ज्याचं दुःख असतं त्यालाच ते छोटं की मोठं कळत असतं. प्रत्येक माणसाची ते सहन करण्याची क्षमता वेगळी असते.

करोडो रुपयांना चुना लावून नीरव मोदीपासून विजय मल्ल्यापर्यंतचे लोक विदेशात जाऊन ऐशोरामी जगतात. आणि बँकेचा हजारपाचशेचा हप्ता थकलेला शेतकरी एंड्रीन पिऊन आत्महत्या करतो. संवेदनशीलतेत असासुद्धा फरक असतो. दुःख, विवंचना सगळ्यांनाच असतात. पण माणूस आतून तुटत जाणं डेंजर असतं. परस्परांना समजून घ्यायला पाहिजे. संवाद वाढवायला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे. स्वतःचं जगणं महत्त्वाचं असतंच, परंतु ते जर इतरांसाठी महत्त्वाचं बनलं तर त्याला अर्थ प्राप्त होईल!

हे गाणं नक्की ऐका – जिंदगी जीने का नाम है!https://bit.ly/2N38C7P

Previous articleदेवेंद्रच्या वाटेवर उद्धवची पाऊले
Next articleइतिहास मोदींना कठोरपणे पारखून घेईल…!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. अप्रतिम आणि मर्मस्पर्शी मनोगत, तिन्ही मान्यवरांचे. परंतु लोकं फक्त वाचतात, तेवढ्या पुरते शोक व्यक्त करतात व वेळ गेली की पुन्हा जैसे थेच राहतात. म्हणून आपण आपल्या पद्धतीनेच, आनंदाने, मनमोकळेपणाने जीवन जगावे, बाकी चिंता करु नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here