बुद्धाच्या जवळ असणाऱ्यांत सम्राट आणि राजे होते. मगधचा सम्राट बिंबिसार हा त्याचा मित्र व शिष्य होता. त्याच्या म्हातारपणी त्याला तुरुंगात टाकून त्याची गादी बळकावणारा त्याचा पुत्र अजातशत्रू हाही बुद्धाचा मित्र होता. बुद्ध त्याला राजकीय सल्लाही देत असे. या अजातशत्रूला कैदेत टाकून त्याची गादी हिसकावून घेणारा त्याचा मुलगा विदूदभा हा कमालीचा आक्रमक, अहंकारी व दुष्ट होता. राज्याचा विस्तार करत असताना त्याने थेट बुद्धाच्या कपिलवस्तू या नगरराज्यावरच हल्ला चढवला व त्याच्या एकजात सर्व मुलामाणसांसोबत स्त्रियांचीही कत्तल केली. बुद्धाला त्यावर काही करता आले नाही.
बुद्धाने घालून दिलेले संघाचे नियम पाळले की भिक्षूंची त्यात सोय व्हायची. आरंभी त्याचे नियम कडक होते. त्यात खानपानावर निर्बंध होते. पशुहत्या होत नव्हती. मद्यपान निषिद्ध होते. स्त्रियांना प्रवेश नसल्याने नीतिमत्ता कायम होती असा समज होता… शिवाय भिक्षू झालेल्यांना सैनिक सेवेतून मुक्तता मिळत असल्याने भिक्षूंचे युद्धातल्या मरणाचे भय संपले होते. हे संघ राजकारणात उघडपणे नसल्याने त्यांना इतरांच्या आक्रमणाची भीती नव्हती.