(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)
-मिथिला सुभाष
*****
कालच्या तीन तारखेला नर्गिसची पुण्यतिथी होती. काही माणसं आपल्या झळाळत्या भूतकाळात, अनेक वर्ष काहीही न करता राहतात. पण मागचा झगमगाट मागच्या पांथस्थांसाठी ठेऊन, स्वत: पुढची वाट उजळायला निघतात ती खरी माणसं! अशी माणसं आपल्या हयातीतच ‘किंवदंती’ बनतात, इतिहास घडवतात. नर्गिस त्यातलीच एक!
खरं तर नर्गिसचा प्रवेश राजच्या जीवनात झाला तेव्हा राज विवाहित होता. हेमावती नावाच्या एका सुमार नटीशी त्याचं प्रकरण सुरु होतं.. म्हणून पापाजींनी त्याचं लग्न लावलं. (या हेमावतीशी नंतर सप्रूने लग्न केलं.) पण लग्नानंतरही राजच्या सवयी बदलल्या नाहीत. क्रिएटिव्ह माणसाच्या लैंगिक भावना तेजाळ असतात असं न.चिं.केळकर एकदा म्हणाले होते. राज तर टोकाचा क्रिएटिव्ह होता! नर्गिस-राज प्रकरण जेव्हा फार पुढे गेलं तेव्हा कपूर कुटुंबातल्या ज्येष्ठ मंडळींची एक बैठक बोलावली गेली. यात अर्थातच राज, त्याची पत्नी कृष्णा आणि नर्गिस होते. त्या काळात पापा पृथ्वीराज यांचं नाव पृथ्वी थिएटरमधल्या एका अभिनेत्रीशी जोडलं गेलं होतं. (हिची मुलगी अंजू महेंद्रू!) सदर बैठकीत पापाजींनी असा तोडगा दिला की राजने पंधरा दिवस कृष्णाकडे आणि पंधरा दिवस नर्गिसकडे राहावं. सासऱ्यासमोर कधीही तोंड उघडून न बोलणारी कृष्णा म्हणाली, “यही पापाजी भी करें, अगर मम्मीजी को ये मंजूर होगा तो मुझे भी मंजूर है!” बैठक बरखास्त झाली. त्यानंतरही दोघांनी लग्न करायचंच असं ठरवलं. पण ‘द्विभार्याप्रतिबंधक’ कायदा आड आला. त्या काळात नर्गिसने मुंबई स्टेटचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची भेट घेऊन, ‘आम्हाला या कायद्यातून सवलत द्या,’ अशी विनंती केली होती. अर्थात ती नाही मिळाली.
त्याच सुमारास तिला दिवस गेले. ती बाळंतपणासाठी परदेशात गेली. झालेली मुलगी आपल्या ‘बेट्टी कपाडिया’ या मैत्रिणीकडे सांभाळायला दिली आणि परत आली. (मुलीच्या बाबतीतला तुमचा अंदाज शंभर टक्के बरोबर आहे!) तोपर्यंत नर्गिसला आरके’मधलं तिचं दिखाऊ, बेगडी रूप जाणवायला लागलं होतं. काळ जाता-जाता तिला शहाणं करत होता.. तिच्या कानावर अनेकदा आलं होतं की, “तवायफों की लडकियों से शादी नहीं की जाती,” असं राज म्हणतो. त्यातच मुगले-आझमच्या यशाने तिच्या जखमेवर मीठ चोळलं.. परदेशातून परत आल्यावर नर्गिसने राजकडे हा विषय काढला. दोघांत जे काही वाद, चर्चा, भांडण झालं असेल ते झालं आणि नर्गिसने तुकडा पाडला! ती आरके’मधून बाहेर पडली.
नर्गिस मधुबालासारखी अप्रतिम देखणी किंवा मीनाकुमारीसारखी भावप्रवण अभिनेत्री नव्हती. पण तिच्यात ऋजुता होती, ग्रेस होती, ती शिक्षित होती, ती सफाई तिच्या वागण्यात होती, तिचं ‘लीपिंग’ इतकं देखणं होतं की त्यानंतर तसं ‘बोलणारी’ अभिनेत्री हिंदी पडद्याला मिळाली नाही. ती अत्यंत साधी होती. चारचौघींसारखं लग्न करून संसार थाटावा हे तिचं स्वप्न होतं. म्हणूनच तिचं राज कपूरशी लग्न व्हावं म्हणून तिनं जंग-जंग पछाडलं.. पण तो तिच्यामागे तिला ‘तवायफ की बेटी’ म्हणत राहिला. अशा मुलींशी लग्न करायचं नसतं, त्यांना ‘पदरी बाळगायचं असतं’ असं म्हणत राहिला. त्याला सोडून जाण्याचा निर्णय घेतल्यावर ‘मदर इंडिया’ आला.. तो तिचा शेवटचा चित्रपट ठरला. (‘रात और दिन’चा करार त्यापूर्वीच झाला होता.) मदर इंडियाच्या चित्रिकरणादरम्यान लागलेल्या आगीतून दत्त साहेबांनी तिला वाचवलं आणि तिनं त्यांच्याशी लग्न केलं. “उस आग में पुरानी नर्गिस जल गई. दत्त साहेबने जिसे बचाया वो नर्गिस दत्त है” असं ती म्हणायची. चित्रपट कारकीर्दीनंतर नर्गिसने महबूब नसरुल्ला आणि जोहरा अलीयावरजंग या दोन बिनीच्या महिला समाजसेविकांसोबत समाजसेवेचं काम सुरु केलं. ती काही वर्षं ‘इम्पा’ची अध्यक्षा होती. भारत सरकारने तिला ‘पद्मश्री’ दिली, राज्य सभेचं सन्माननीय सदस्यत्व बहाल केलं. ती उत्तम वक्ता होती. राज्यसभेतली तिची काही भाषणं गाजली. सत्यजित रे आपल्या सिनेमांतून भारतातल्या दारिद्रयाचं प्रदर्शन करतात म्हणून तिनं त्यांच्यावर घणाघाती टीका केली होती.
नर्गिस आपल्या जीवनात बऱ्याच कारणांसाठी गाजली. आरके’मधे कोणतीच नायिका इतकी वर्षं टिकली नाही. तिशीच्या आसपास, रूप आणि कलात्मक परिपक्वतेच्या शिखरावर असतांना चित्रपटसृष्टी सोडणारी आणि पुन्हा तिथे वळूनही न पाहणारी नर्गिस ही पहिली अभिनेत्री. नर्गिसनंतर आरके’त आलेल्या प्रत्येक नायिकेसोबत राज कपूरने प्रेम प्रकरण केलं. ते पुन्हा कधीतरी. (खरं तर ते कधीच नाही. मी राज कपूरबद्दल लिहिणं शक्यच नाही!) नर्गिस मात्र दत्त साहेबांचा संसार करत राहिली. तिच्या शेवटच्या आजारात सुनील दत्तने आपल्या मिळकतीतली शेवटची पै देखील खर्च केली. पण नर्गिस गेली! मे महिना सुरु झाला की तिची आठवण येते. प्रियकरावरून जीव ओवाळून टाकण्याचा तिचा गुण राज कपूरने इस्तेमाल केला.. दत्त साहेबांनी तो गुण कलेजे से लावला.. त्याआधीच हा विलक्षण गुण देवाच्या दरबारी रुजू झाला होता, म्हणूनच तर तिच्या आजारपणात हॉस्पिटलला मंदिर समजून त्याभोवती रात्रभर प्रदक्षिणा करणारा नवरा तिला लाभला! हे स्त्री म्हणून तिला मिळालेलं यश! ही घटना ऐकली तेव्हा मला अल्लामा इक़्बाल यांचा तो प्रसिद्ध शे’र आठवला-
आज काही गोष्टी कळून गेल्या.. एक रोमँटिक जोडी म्हणून राज नर्गिस ला स्थान आहेच.. नर्गिस बद्दल असलेली आवड आदरात परिवर्तीत करण्याचे काम मिथिला सुभाष च्या या लेखाने केलेले आहे.. कारण सत्याचा आधार घेऊनच त्या लिहितात यावर माझा विश्वास आहे 🙏 खूप छान लेख 🌹❤️🌹