–रणजित चंदेल, यवतमाळ
आज जिकडे तिकडे दया, धर्म, मानवता यांची वानवा आहे. नितिमत्तेचे अवमूल्यन होत आहे. भाऊ-भाऊ परस्परांचे मुडदे पाडत आहेत, पोटची मुलं वृध्द माता-पित्यांना वृध्दाश्रमाची वाट दाखवित आहेत. एकीकडे मानवी मूल्यांचे पतन इतक्या खालच्या स्तराला गेले असताना पुण्याचे डॉ. अभिजित आणि डॉ. मनिषा हे दाम्पत्य भिकारी, निराधार, अनाथांचे आशेचा किरण बनले आहे. त्यांच्या ह्या कार्यामुळे भिकाऱ्यांचे डॉक्टर अशी त्यांची जगभर ओळख होत आहे.
बाबाजी आणि प्रेरणा : मुळचे सातारा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले डॉ. अभिजित यांनी बीएएमएस केले असून त्यांना एका प्रतिष्ठानात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. ते चांगले स्थिरावले होते. अशात त्यांना एका परोपकारी बाबाजींची आठवण आली. डॉ. अभिजित यांना वरील नोकरी मिळण्याआधी सुरूवातीच्या काळात वैफल्य आले होते. त्यांचा डॉक्टरी व्यवसाय चालेनासा झाला. अत्यंत उव्दिग्न मनस्थितीत ते मंदिरात जाऊन बसले असता तेथे वरील बाबाजी यांनी मोठा दिलासा दिला, हिम्मत हारू नको बाळ म्हणून त्यांच्या भिक्षापात्रात जमा झालेले पैसे देऊनही त्यांनी मदत केली. खडकवासला येथील ही घटना. अशा या प्रेरणादायी बाबाजींना भेटण्यासाठी ते तेथे पोहचले असता त्यांचे निधन झाल्याचे कळाले. डॉ. अभिजित यांना अतिव दु:ख झाले. ज्या बाबाजींनी आपल्या पडतीच्या काळात आपल्याला दिलासा दिला, त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकलो नही. त्यांना शेवटपर्यंत भीक मागून जगावे लागले. ही बाब त्यांच्या मनाला चटका लावून गेली. आता या चुकीचे आपण परिमार्जन करावे असा निश्चय करून आपले उर्वरित आयुष्य अशा भिकारी, दु:खी, कष्टी लोकांना मदत करण्यासाठी, त्यांना माणूस म्हणून उभे करण्यासाठी घालवावे असा निर्धार केला. प्रतिष्ठानच्या नोकरीवर पाणी सोडून ह्या सेवायज्ञात उडी घेतली. पत्नी डॉ. मनीषा हिनेही सक्रीय सहभाग दिला. तिच्या व्यवसायातून तिने प्रपंच चालविला. उर्वरित पैसा पतीच्या कार्यात मदत करण्यासाठी दिला.
डॉ. अभिजित मिळेल त्या भिकाऱ्यांची मदत करू लागले. त्यांच्या दु:खावर फुंकर घालू लागले. मात्र सुरूवातीला भिकारी व्यक्तींचा त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता. हा आपल्या किडन्या तर काढायला आला नसेल ना, असा विचार येऊन ते त्यांच्याकडून उपचार करून घ्यायला घाबरत. मात्र हळुहळु डॉ. अभिजितची सचोटी व सेवा पाहून त्याचे नाते जुळले. डॉ. अभिजित कोणत्या देवाचा कोणता वार आहे हे लक्षात घेऊन त्या-त्या दिवशी मंदिर, मशिद, चर्चच्या ठिकाणी जाऊन तेथे त्या-त्या दिवशी येणाऱ्या भिकाऱ्यांची विचारपूस करू लागले. त्यांचा औषधोपचार करणे, त्यांच्या जखमा पुसून मलमपट्टी करणे, जेथे गरज असेल अशा आजारी भिकाऱ्यांना दवाखान्यात भरती करू लागले. आवश्यक तेथे त्यांच्या शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्थाही जवळच्या पैशातून करू लागले. त्यांना आंघोळी घालणे, त्यांच्या अंगावर कपडे घालणे इ. कामे करू लागले. आता ते त्यांच्या जीवनाचे अभिन्न अंग झाले. पुण्यात एका सर्वेक्षणानुसार सुमारे 3500 भिकारी आहेत. त्यापैकी 1100 भिकाऱ्यांशी ते प्रत्यक्ष जुळले. घरून सकाळीच औषधीच्या बॅगा आपल्या बाईकवर घेऊन ते त्यांच्या वस्तीत जातात. सोबत कटिंग, दाढीचे साहित्य ही ठेवतात, त्यांना औषधोपचार करताना दाढी-कटिंग वाढल्याने विद्रुप दिसणाऱ्या भिकाऱ्यांसाठी प्रसंगी नाव्ह्याचेही काम करण्यासाठी ही तयार असतात. बऱ्याचशा भिकाऱ्यांना अंधत्व आल्याचे आढळल्यावर तपासणी करून त्यांच्या नेत्र शस्त्रक्रिया करविल्या.
कशासाठी हवा भिकाऱ्यांचा डॉक्टर : भिकाऱ्यांचा समाज आणि माणसांचा समाज ह्यात मोठी दरी आहे. भिकाऱ्यांना हेटाळणी, तिरस्कार सहन करावा लागतो. याचे एकमेव कारण भिकारी हा स्वत्व हरवलेला परावलंबी समाज आहे तर दुसरीकडील समाज स्वावलंबी आहे. वास्तविक पाहता ही पण माणसं आणि ती पण माणसं. भिकारी समाजाला यासाठी स्वावलंबी करणे गरजेचे आहे. हे स्वावलंबित्व त्यांना प्राप्त व्हावे, त्यांचे आजार, अपंगत्व घालवून रोजगार उपलब्ध करून दिल्यावर त्यांनाही माणूसपण पुन्हा प्राप्त होईल. त्यांचे भीक मागणे थांबेल यासाठी डॉ. अभिजित यांची सदैव धडपड सुरू असते. या कामासाठी पैसा कमी पडतो म्हणून त्यांनी सोहम ट्रस्टची स्थापना केली. त्याव्दारे लोकांना अपील करूनही मदत गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अशिक्षित, दरिद्री अशा ह्या समाजाला दोन पैसे मिळविता यावे यासाठी ते वेगवेगळे उपाय करीत आहेत. मंदिरातून निर्माल्य गोळा करणे, निर्माल्यापासून पावडर तयार करून त्यापासून औषधोपयोगी द्रव्य तयार करून विकणे, वाया गेलेले कापड मिळवून पिशव्या तयार करणे, लिक्विड वॉश, शोभेच्या वस्तू, बुके इत्यादी तयार करणे, यासह ज्यांच्यात कौशल्य असेल त्यांना कौशल्यानुरूप नाव्ही, सुतार इ. कामे मिळवून देणे. अशाप्रकारे त्यांना उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ह्या करिता एखादी स्वतंत्र जागा हवी होती. ही गरज दानिश शहा या दानशूर व्यक्तीने बिबवेवाडी येथे 2500 चौफूट जागा देऊन पूर्ण केली. सोबत आवश्यक साहित्यही घेऊन दिले.
मध्यरात्रीचा सूर्य : हे प्रशिक्षण केंद्र वरील जागेत सुरू करण्यात आले आहे. हा सूर्य त्यांच्या जीवनातील अंधार दूर करीत आहे. ह्या केंद्रात 50-60 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात भिकारी वेगवेगळे कौशल्य अवगत करीत आहेत. डॉ. अभिजित यांनी त्यांच्या कुटुंबातील 52 मुलेमुली दत्तक घेऊन त्यांना शिक्षित करण्याचे प्रयत्न ते करीत आहेत. त्यापैकी काहींना शासकीय विभागात उत्तम नोकऱ्या पण मिळाल्या आहेत. एक मुलगी तर युपीएससीची तयारी करीत आहे. ह्या कार्यामुळे डॉ. अभिजित आणि डॉ. मनिषा यांचा अनेकदा शासन दरबारी सत्कारही करण्यात आला असून 2500 च्या वर पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. लोकमान्य टिळक, संत गाडगेबाबा, मदर टेरेसा ह्या सारख्या महत्वपूर्ण पुरस्कारांचाही त्यात समावेश आहे.
देव तेथेची जाणावा : डॉ. अभिजित यांची देवाविषयीची संकल्पना देखील यथार्थ आहे. भिक्षूक, दीनदुबळे, निराधार यांची सेवा हीच त्यांची पूजा असून, रंजले-गांजले हेच त्यांचे देव. ते म्हणतात एखाद्या भिकाऱ्याला जेव्हा मी आंघोळ घालतो तेव्हा तो माझ्यासाठी अभिषेक असतो. त्यामुळे मला कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही. वेद जाणण्याऐवजी दु:खीतांच्या वेदना जाणाव्या, असा विचार ते मांडतात. मी कोणीच नाही जे काही आहात ते तुम्ही सगळे आहात. ह्या कार्यात आर्थिक, मानसिक प्रोत्साहन तुम्ही मला देता, त्यामुळे मी हे करू शकतो. तुमच्याबरोबरच पत्नी डॉ. मनिषा हिचा ही तेवढाच महत्त्वाचा वाटा माझ्या यशात आहे. ती नसती तर मी काहीच करू शकलो नसतो, असे डॉ. अभिजित मानतात. ते म्हणतात, “मला कितीही बक्षीसे मिळाली तरी खरे बक्षीस तेव्हाच मिळेल जेव्हा मी भिकाऱ्यांना स्वावलंबी करून प्रतिष्ठा मिळवून देईल. हेच माझे अंतिम स्वप्न आहे. ” आपण सर्व मिळून डॉक्टरांचे स्वप्न साकार करू या, शक्य असल्यास मदतही करू या. मदत करण्यास इच्छुक व्यक्तींना खालील क्रमांकावर संपर्क करून अधिक माहिती मिळविता येईल.
डॉ. अभिजित यांचे कार्य एका दृष्टिक्षेपात :-
- 285 भिकाऱ्यांना स्वतंत्र व्यवसाय टाकून दिला.
- 52 मुलामुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षित करण्यात येत आहे. काहींना चांगल्या नोकऱ्याही मिळाल्या आहेत.
- 2500 नेत्र शस्त्रक्रिया करविल्या, त्यांचे अंधत्व दूर केले.
- 30 व्यक्तींना श्रवणयंत्रे मिळवून दिली.
- 144 व्यक्तींवर मोठ्या शस्त्रक्रिया. (रू. 5 लाखावरील)
- 100 लोकांची चमू तयार करून पुण्यातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात येत आहे. त्या बदल्यात त्यांना वेतन देण्यात येत आहे.
- 2500 पेक्षा अधिक पारितोषिके त्यांना मिळाली आहे. त्यात लोकमान्य टिळक, संत गाडगेबाबा, मदर तेरेसा अवार्ड इत्यादी महत्वपूर्ण पुरस्कारांचाही समावेश आहेत.
(लेखक यवतमाळचे माजी जिल्हा माहिती अधिकारी आहेत)
9422866931









