शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबतच काँग्रेसची दैना उडाली आहे . गेल्या विधानसभा निवडणुकीत असलेल्या ४४ जागांवरुन काँग्रेस पक्ष निम्म्यावर घसरला आहे . मुळात काँग्रेसला राज्यात एकमुखी लोकप्रिय नेतृत्वच नाही . राज्यातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचा वाडी-तांड्यापर्यंत थेट संपर्क नाही . राहुल गांधी नावाच्या वृक्षाखाली वाढ खुंटलेलं बोन्साय म्हणजे राज्यातील काँग्रेसचे बहुसंख्य नेते आहेत . हे ना राज्याचे नेते , ना विभागाचे , ना जिल्ह्याचे . बाळासाहेब थोरात , पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे काही अपवाद वगळता महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते त्या त्या मतदार संघाचे सुभेदार आहेत आणि त्यांची ही सुभेदारी मोडीत निघाल्याचं जमा आहे . त्यातच राज्यातल्या बहुसंख्य काँग्रेस नेत्याला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडलेली आहेत . हे म्हणजे सैन्याशिवाय लढणाऱ्या सरदारासारखा आहे . राहुल गांधींच्या भांडवलावर या नेत्यांनी निवडणुका तर लढवल्या पण , ते भांडवल तुटपुंज आहे हेही या निवडणुकीनं सिद्ध केलं आहे . मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पाहणाऱ्या नाना पटोले यांचा अवघ्या काही शे मतांनी विजय या म्हणण्याला पुष्टी देणारा आहे . म्हणूनच काँग्रेस पक्षाच्या अनेक मातब्बरांना निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं . महायुतीच्या विजयानं काँग्रेस , उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष इतके दिवाळखोरीत निघाले आहेत की स्वबळावर विधानसभेचं विरोधी पक्ष नेते पदही यापैकी एकाही पक्षाच्या वाट्याला येऊ शकत नाही .