करा गर्जना, बाळासाहेबांची शिवसेना

-ज्ञानेश महाराव

(संपादक, साप्ताहिक चित्रलेखा)

————————–———————

‘शिवसेना’ बाळासाहेब ठाकरे यांची आणि शिवसेना बाळासाहेबांच्या नावाची; यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. कारण बाळासाहेबांनी शून्यातून निर्माण केलेल्या शिवसेनेत ; बाळासाहेब हा ‘एक’च आकडा होता आणि बाकी सारी शून्येच होती. शून्यांमुळे आकडा वाढतो; पण आकडा असतो म्हणूनच शून्यांना किंमत येते! शून्ये आकड्यांची जागा घेऊ शकत नाहीत. परंतु, ही जागा मिळावी, यासाठीचा डाव शिवसेनेतल्या शून्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच मांडला होता. शिवसेना स्थापनेनंतर चारच वर्षांची, म्हणजे १९७० ची गोष्ट आहे.

व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून महागाई वाढवली होती. या विरोधात शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी मुंबईल्या डंकन रोडवरची मोठमोठाली गोदामे फोडून जनसामान्यांना स्वस्त दरात कांदे-बटाटे, तेल, मसाले आणि अन्नधान्य उपलब्ध करून दिले होते. ह्या कामात लालबाग-परळ भागातील ज्येष्ठ शिवसैनिकांबरोबरच बंडू शिंगरे हेही आघाडीवर होते. परंतु, शिंगरे यांच्यावर ह्या प्रकरणात आर्थिक हातसफाईचे आरोप झाल्याने त्यांना पक्षाच्या एका बैठकीतून खुद्द बाळासाहेबांनी बाहेर जाण्यास सांगितले. हा भरसभेतला अपमान असह्य झाल्याने शिंगरे थेट बाळासाहेबांना आव्हान देणारी भाषा बोलू लागले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत; तर त्यांनी ‘प्रतिशिवसेना’ स्थापन करून स्वतःला ‘प्रतिशिवसेनाप्रमुख’ म्हणवून घेऊ लागले. पण हा प्रकार फार काळ चालला नाही. तो बाळासाहेबांच्या शब्दांत सांगायचं तर ‘याडचॅप’पणात संपला.

ह्यानंतर ’शिवसेना’ स्थापनेची पंचविशी पूर्ण झाल्यावर जून १९९२ मध्ये एक प्रकार घडला. ‘शिवसेना’ स्थापनेच्या वेळी बाळासाहेबांचे सहकारी असलेल्या आणि लवकरच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या ॲड. माधव देशपांडे यांनी ‘शिवसेना भवन’पासून चालत पाच मिनिटांवर असलेल्या ‘वनमाळी हॉल’मध्ये शिवसेनाप्रेमींची सभा घेतली. त्यात त्यांनी ‘शिवसेनेत सामूहिक नेतृत्व निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे,’ असे बोलून दाखवले. परंतु, प्रत्यक्षात ती बाळासाहेब ठाकरेंना ‘शिवसेनाप्रमुख’ पदावरून बाजूला करून शिवसेना ताब्यात आणण्याची धूर्त खेळी होती. ती छगन भुजबळ यांना शिवसेनेत राहाणे ज्यांनी अशक्य केले होते; त्या मंडळींनीच माधव देशपांडे यांना पुढे करून खेळली होती. त्या सभेची दखल तेव्हाच्या वृत्तपत्रांनी घेतली नव्हती.

सभेला हजर राहिलेल्या काहींनी बाळासाहेबांपुढे शरणागती पत्करून शिवसेनेत पुन्हा प्रवेश मिळवला होता. प्रकरण मिटले असताना, माधव देशपांडेंनी ’पत्रकार परिषद’ घेतली आणि वृत्तपत्रांनीही त्यांच्या मागणीला जोरदार प्रसिद्धी दिली. त्यात योजकता होती. ती बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळीच लक्षात आली. राज व उद्धव ठाकरे यांनी तेव्हा ’शिवसेना’च्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. त्यांना शिवसैनिक प्रत्यक्ष भेटून आपल्या अडचणी, प्रश्न सांगू लागले होते. ठाकरे कुटुंबातील हे दोन जवान बाळासाहेबांचे जय-विजय झाले तर आमचे काय, हा घोर ज्यांना लागला त्यांनी देशपांडेच्या नथीतून बाळासाहेबांवर सामूहिक नेतृत्वाचे शरसंधान सुरू केले होते.

राज व उद्धव ठाकरे यांच्यावर डायरेक्ट मारा करायचा आणि भुजबळांना ‘शिवसेना’ सोडण्यास भाग पाडून जे साधले नाही, ते साधायचे; असा अवघड जागीचे दुखणे ठरावे, असा हा पेच होता. नेहमी घराणेशाहीवर घसरणाऱ्या बाळासाहेबांना उद्धव-राज ठाकरे यांचं समर्थन करता येणार नाही; त्या दोघांना शिवसेनेपासून अलग पाडता येईल आणि घरगुती हात तुटल्याने बाळासाहेब पुन्हा आपल्या कब्जात येतील, अशी शेख महंमदी स्वप्ने माधव देशपांडेचे ’बोलवते धनी’ पाहात होते. पण घडले त्याच्या विपरीत !

बाळासाहेबांनी माधव देशपांडे यांच्या मागचे धूर्त कोण ते ओळखले. त्यांच्याशी प्रतिवाद केल्याने ’शिवसेना’ अधिक दुबळी होणार, हेही त्यांनी ओळखलं. त्यांनी या धूर्तांनी विचारही केला नव्हता; असा प्रतिडाव मांडला. ‘शिवसेना’ हा बाळासाहेबांचा श्वास. शिवसैनिक म्हणजे त्यांच्या धमन्यांतून वाहणारे रक्त. ह्या श्वासाचे आणि रक्ताचे एकमेकांशी असलेले नाते बाळासाहेबांशिवाय दुसरे कोण अधिक जाणणार ? शिवसेनेत राहून ’शिवसेनाप्रमुखां’ना पेचात आणू बघणाऱ्यांना शिवसेनेतच ठेवून, त्यांना शिवसैनिकांकडूनच सरळ करायचे, असा बाळासाहेबांचा प्रतिडाव होता. तो प्रभावीही ठरला. काय केले त्यांनी ?

‘दैनिक सामना’तून ’शिवसेनाप्रमुखांचा ‘अखेरचा जय महाराष्ट्र’ अशा शीर्षकाचा अग्रलेख आणि ‘पुत्र आणि पुतण्याच काय, माझ्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंबीय शिवसेनेतून बाहेर पडत आहेत!’ अशी बातमी प्रसिद्ध झाली. ह्या बातमीतल्या बारा शब्दांनी धूर्त सिंडिकेटचा पार धुव्वा उडाला. हा ‘सामना’ प्रकाशित होताच; आधी हजारो शिवसैनिकांनी ‘मातोश्री’च्या दारावर डोके आपटून घेत आपले दु:ख-संताप व्यक्त केला. त्या नंतर दुपारी तीन-चारच्या सुमारास ‘शिवसेना भवन’ पुढे सभा झाली. त्याला ५०-६० हजाराच्या संख्येने शिवसैनिक जमले होते. ते ‘शिवसेना’ नेत्यांकडे रागाने बघत होते. त्यांचा उद्धार करीत होते. त्यांना मंचावर जाऊ देत नव्हते. जाणाऱ्यांना धक्काबुक्की करीत होते. कारण स्टेजच्या बॅकड्रॉप वर ठळक अक्षरांत लिहिलं होतं- ‘एकच गादी, एकच नेता- बाळासाहेब ठाकरे !’ तशाच प्रखर घोषणा दिल्या जात होत्या. त्या सभेत फक्त बाळासाहेबांचं भाषण झालं. बाळासाहेबांनी सभेला एक सवाल केला – “कुणी आईवरून शिवी दिली, तर तुम्ही चवताळून उठणार का नाही? की तुम्ही आधणाचं पाणी आहात. खालून आग दिल्याशिवाय उकळणारच नाहीत !” शिवसैनिकांनी ‘नाही, नाही’ असा ठणठणीत आवाज दिला.

—————-

अशी होती बाळासाहेबांची शिवसेना

शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे आणि शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रचना मान्य करणाऱ्यांनाच त्यांच्या शिवसेनेत स्थान होते. ते विविध पदांवर निमूटपणे प्यादे म्हणून वावरत होते. तरीही ‘आज ना उद्या आपल्याशिवाय आहेच कोण,’ अशी आशा काहींना होती. ते आपल्या पुढे कुणी घुसू नये; यासाठी घुसण्याची ताकद असणार्यांना विविध मार्गाने हतबल करण्याची वा बाहेर हुसकावण्याची फडणीशी करीत. परंतु, उद्धव आणि राज ठाकरे ही पटावर नव्यानेच अवतरलेली ‘प्यादी’ हत्ती-उंट-घोडा सोडा; वजिराच्या चालीने चालू शकतात, हे जाणवताच फडणीशी चालीच्या नेत्यांची घालमेल झाली. त्यांनीच हस्ते- परहस्ते माधव देशपांडेंना पुढे केले होते. त्यांचा उद्धार सभास्थानी शिवसैनिक करीत होते.

अखेर ’शिवसेना नेते’ म्हणविणाऱ्या या नामधारींची सुटका बाळासाहेबांनीच केली. त्यांनी शिवसैनिकांना बजावलं, “ह्या नेत्यांना मी उभं केलंय. तुमच्या आशीर्वादाने त्यांचीही जडणघडण झालीय. त्यांचा अपमान होता कामा नये !” उद्धव आणि राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेप घेण्याची हिंमत यापुढे एकाही नामधारी नेत्याला होऊ नये, यासाठी एवढा डोस पुरे होता. अशी बाळासाहेबांची ‘शिवसेना’ होती. ती सत्ताप्राप्तीसाठी ‘शिवसेना’ संपवू पाहणाऱ्यांच्या इशाऱ्यावर सुरत- गुवाहाटी- गोवा अशी लपाछपी खेळणार्यांची नव्हती.

एकनाथ शिंदे यांच्या तुलनेत छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे हे तगडे नेते होते. त्यांची कोंडी झाल्याने त्यांनी ‘शिवसेना’ सोडली; फूट पाडली. पण त्यांपैकी कुणीही ‘शिवसेना’ संपवणाऱ्यांस पूरक ठरेल, असा व्यवहार केला नाही. कारण ‘शिवसेना’ टिकवून ठेवण्यातली आवश्यकता त्यांनी ‘शिवसेना’ सोडतानाही मनोमन जपली होती. बाळासाहेबांनी आपल्या हयातीत – २००३ मध्ये ‘शिवसेना कार्यकारी अध्यक्ष’ पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली होती. ही प्रक्रिया त्याआधी १० वर्षे सुरू झाली होती. १९८५ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून उद्धवजींचा संघटनात्मक कामात सहभाग होता. जून १९९२ चा बाळासाहेबांचा ‘अखेरचा जय महाराष्ट्र’चा प्रतिडाव उद्धव ठाकरे यांनी जवळून पाहिला होता.

उद्धव ठाकरे यांच्याही ’वजीर’ चाली बाळासाहेबांनी पाहिल्या होत्या. त्यावर बाळासाहेबांचे लक्ष होतं. उद्धवजींच्या राजकीय चाली आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत; पण ’शिवसेना’ला पोषक आहेत; म्हणूनच बाळासाहेबांनीही त्या खपवून घेतल्या होत्या. प्रत्येक नेता आपल्या स्वभावानुसार पक्ष- संघटनेचा कारभार करतो, निर्णय घेतो. गांधी-नेहरूंची ‘काँग्रेस’ इंदिरा गांधींच्या काळात संपली आणि इंदिरा गांधींची ‘काँग्रेस’ राजीव गांधींच्या काळात संपली. नरसिंह रावांच्या वा मनमोहन सिंह यांच्या पक्षनेतृत्वाची तुलना सोनिया-राहुल गांधी यांच्याशी होऊ शकत नाही. तुलना ही वर्तमानाला खुजं ठरवण्यासाठी होतच असते. तशी तुलना-चर्चा सत्तास्वार्थी व पक्ष विरोधक आवर्जून घडवून आणतात.

तथापि, त्याने वास्तव बदलत नाही. उद्धव ठाकरेंना नावं ठेवणारे ’बाळासाहेबांची शिवसेना आता उरली नाही,’असं म्हणतात. ते खरंच आहे; तसंच शिवसेनेशी प्रतारणा करणाऱ्यांना ते फायद्याचंही ठरलंय. ’बाळासाहेबांची शिवसेना’ असती तर ‘सत्तेसाठी लपाछपी’ करणाऱ्यांचं एव्हाना काय झालं असतं, ते सांगायला पाहिजे का?

बाळासाहेबांसारखाच जून १९९२ चा प्रतिडाव टाकून ’शिंदे गटात’ जाणाऱ्या आमदार-खासदारांना उद्धव ठाकरे यांना रोखता आलं असतं. परंतु, ‘आपण बाळासाहेब नाही,’ ह्याची पूर्णपणे जाणीव असल्याने उद्धवजींनी जाणाऱ्यांना जाऊ दिलं. संघर्ष टाळला आणि शिवसेना सोडणाऱ्यांचा स्वार्थ उघडा पाडला. बाळासाहेबांनी घराणेशाहीचा दोष पत्करून उद्धव ठाकरेंचे नेतृत्व शिवसेनेत रुजवलं- वाढवलं आहे. त्याला फळं चांगलीच आली! म्हणूनच शिवसेनेच्या वाढीसाठी अहोरात्र झटणार्या दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ता नलावडे, मधुकर सरपोतदार, प्रमोद नवलकर आदिंसारखं ’नामधारी नेते’ पद एकनाथ शिंदे आणि कंपनीच्या वाट्याला आलेलं नाही.

शिवसेनेच्या अस्तित्वावर घाव घालणारा दगाफटका करूनही मुख्यमंत्री होण्याचीच नाही; तर ’शिवसेना’वर दावा सांगण्याची, चिन्ह गोठवण्याची मोकळीकही त्यांना मिळाली. ’बाळासाहेबांची शिवसेना’ असती तर ही दगाबाजी आणि दावेबाजी खपवून घेतली नसती. ह्याची जाणीव खुद्द शिंदेंनाही असणार ! तरीही ‘निवडणूक आयोगा’ने दिलेली संधी साधून त्यांनी आपल्या गटास ’बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देणे, हे जागृत देवाला ‘मेलेल्या बोकडाचा बळी’ देण्यासारखं झालंय. माकड जेव्हा आरशात पाहातं तेव्हा त्याला माकडच दिसतं. माणसाचा मात्र प्रॉब्लेम असतो. तो आरशात स्वत:ला कुणीतरी वेगळाच पाहात असतो. त्यातून केल्या जाणाऱ्या माकडचेष्टा जनता बघते. म्हणूनच शिवाजी पार्कच्या ’दसरा मेळाव्याला’ विक्रमी गर्दी उत्स्फूर्तपणे जमते. हे लोकशाही बळकटीचे चिन्ह आहे. ते आगामी निवडणुकीत गद्दारांना गोठविण्याची खात्री देते.

——————

मशालीचे सत्य, गदाचे तथ्य

‘केंद्रीय निवडणूक आयोग’ने ’शिवसेना’चे ’धनुष्य- बाण’ हे चिन्ह व नाव गोठवणे; आणि दोन्ही गटांच्या अस्तित्वाला मान्यता देत, त्यांना पक्ष-संघटनेच्या नव्या नामकरणाच्या पर्यायाची मुभा देणे, हा निर्णय नवा नाही. गेल्या काही वर्षांत अशा प्रकरणात निवडणूक आयोगाने असेच निर्णय दिलेत. सध्याचा निर्णय हंगामी आहे. तथापि, अंतिम निर्णयही यापेक्षा वेगळा असू शकत नाही; हे ओळखून दोन्ही गटांनी पर्यायांची पूर्तता केलीय. त्यानुसार, तूर्तास तरी ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे गटाची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अशी दुफळी निर्माण झालीय.

मुंबईतील अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि मुंबई, ठाणे, पुणे आदि महानगरपालिका निवडणुकांची तातडी पाहता दोन्ही गटांनी ‘निवडणूक आयोगा’ने दिलेल्या निर्णयानुसार पर्यायांची पूर्तता करणे आवश्यक होते. तथापि, अशा प्रकरणात ’केंद्रीय निवडणूक आयोग’ने दिलेला निकाल व पर्याय अंतिम नसतो. त्या विरोधात न्यायालयात जाब मागता येतो. त्यानुसार, हे प्रकरण उद्धव ठाकरे यांच्या ’शिवसेने’ने मुंबई उच्च न्यायालयात नेलंय. तिथून ते सर्वोच्च न्यायालयातही जाईल. हेच शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना निलंबित करण्याचे जे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पडून आहे, त्याबाबतही होईल.

ह्या प्रकरणाच्या निवाड्यासाठी सर्वोच्च न्यायालयने ५ न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन केलेय. आमदार निलंबनाचे प्रकरण विधानसभा (वा विधान परिषद) अध्यक्षांच्या अखत्यारितील आहे. ‘पक्षांतर बंदी’, कायद्यानुसार, १६ आमदारांची फूट ही २/३ सदस्यांची नसल्याने आणि त्यानंतर विधिमंडळात ’नोंदणीकृत’ असलेल्या ‘शिवसेना’ पक्षापासून वेगळा झालेला ४० आमदारांचा ‘शिंदे गट’ हा विधिमंडळातील अन्य पक्षात विलीन (मर्जर) न झाल्यामुळे त्यांनी केलेली सत्ता स्थापनाही बेकायदेशीर ठरते. हेच मुद्दे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात उपस्थितीत केलेत.

या दोन्ही मुद्यांवर विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेतल्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या ‘शिवसेना’ प्रतोदाला नोटिसा पाठवल्यात. त्यामुळे घटनापीठापुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू होईल आणि राज्य विधानसभा अध्यक्षांचे या प्रकरणातील मत-अहवाल मागवला जाईल; तेव्हा प्रकरणाची चौकशी-सुनावणी सुरू आहे, असे सांगितले जाईल. ही चौकशी- सुनावणी विधानसभा अध्यक्ष आणि संबंधित आमदारांच्या सोयी-गैरसोयीच्या कारणास्तव ‘तारीख पे तारीख’ करीत कितीही दिवस लांबवता येण्यासारखी आहे. ही चौकशी-सुनावणी त्वरित पूर्ण करावी, याबाबत उद्धव ठाकरे यांची ‘शिवसेना’ फारशी आग्रही दिसत नाही. परंतु, ’शिवसेना’ नेत्यांच्या ‘ईडी’ चौकश्या थांबलेल्या आणि आर्थिक घोटाळ्यांची रोज नवी प्रकरणे बाहेर काढणारे किरीट सोमय्या शांत झालेले दिसतात.

सत्तासुख भोगायचं तर विरोधकांच्या दुखऱ्या बाजूकडे दुर्लक्ष करावं लागतं. मिळेल ते चिन्ह- नाव घेऊन सत्ता टिकवण्या- मिरवण्यासाठी पुन्हा सज्ज व्हावं लागतं. हे सत्य लक्षात घेऊन जनतेनी आणखी कितीदा आपल्या आयुष्याच्या मशाली पेटवाव्यात आणि गद्दारांची गदा माथ्यावर आदळून घ्यावी? ह्या प्रश्नातील तथ्य लक्षात घेऊनच ‘निवडणूक आयोग’ने शिंदे गटाने मागितलेले ‘गदा’ हे निवडणूक चिन्ह देण्याचे नाकारले असावे.

—————–

शिंदेशाही, इतिहास आणि वर्तमान

शिंदे गटाचा ’दसरा मेळावा’ मुंबई- बीकेसी येथे झाला. त्याला बाळासाहेबांचे द्वितीय पुत्र जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना जयदेव ठाकरे म्हणाले, ”मी इथे आलो ते एकनाथ शिंदे यांच्या प्रेमापोटी. मी गोटात आलेलो नाही. ठाकरे कुणाच्या गोठ्यात बांधले जात नाहीत !’’ शब्दाचे खेळ करण्यात सगळेच ठाकरे वस्ताद आहेत. त्या जोरावर ते ’गुंतुनी गुंत्यात सारा, पाय माझा मोकळा’ हे कविवर्य सुरेश भट यांचे शब्द खरे करीत असतात. ते असेही म्हणाले, ”हा सारा सत्तेचा गोंधळ संपवा. निवडणुका घ्या आणि सरळ शिंदेशाही आणा!” हाही शब्दांचाच खेळ. कारण इतिहासात गाजलेल्या ‘शिंदेशाही’ची गादी ग्वाल्हेरात आहे. त्यांचा आणि एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाचा दुरान्वयेही संबंध नाही. असलाच तर तो शिंदेशाहीच्या तिरीमिरीशी आहे.

आपण कुणासाठी आणि कशासाठी लढतो, ह्याचा अंदाज ’बचेंगे तो और भी लढेंगे’ असं म्हणत अखेरच्या क्षणापर्यंत रणमैदान गाजवणाऱ्या दत्ताजी शिंदे (जन्म : १७२३; मृत्यू : १० जानेवारी १७६०) यांना समजलं नव्हतं. ते पेशव्यांचे एकनिष्ठ सरदार होते. लढवय्ये सेनापती होते. ’रोहिल्याला खतम करायचे आहे, लगोलाग निघून या,’ हा पेशव्यांचा आदेश मिळताच दत्ताजी शिंदे तातडीने निघाले. वाटेत इंदूरच्या मल्हारराव होळकर यांना भेटले. दत्ताजींची धावपळ बघून मुत्सद्दी मल्हाररावांनी त्यांना सुनावले, ”शिंदे, जोवर शत्रू जिवंत आहे, तोवर पेशव्यांना तुमची गरज! रोहिले संपले की, पेशवे तुम्हाला भांडी घासायला नि धोतर धुवायला ठेवतील!” अशाच प्रकारे ‘शिवसेना’ कमजोर करण्याचे आणि उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व संपवण्याचे काम फत्ते झाले की, ’भाजप’कडून एकनाथ शिंदे यांचे अवमूल्यन होणे अटळ आहे. इतिहासातल्या शिंदेंनाही ते टाळता आले नाही.

दिल्लीवर मराठ्यांची जबरदस्त पकड होती. दिल्लीच्या पादशाहीने कुणाला कुठले पद द्यावे, यासाठीही मराठ्यांची संमती-अनुमती घेतली जात होती. दत्ताजी व जनकोजी शिंदे यांनी मन्सूर अली सफदरजंग याचा मुलगा शुजाउद्दौला याला ‘वजिरी’ देण्यासंबंधात नानासाहेब पेशव्यांकडे विचारणा केली होती. त्याला नानासाहेबांनी पेशवे यांनी पाठवलेले उत्तर मोठे लक्षणीय आहे. त्यात ”शुजाउदौला याच्याकडून पन्नास लाख रुपये आणि काशी-प्रयाग घ्यावे, तरच वजिरी द्यावी,” असे नानासाहेबांनी शिंदेंना बजावले होते. यातून हिंदूंची पवित्र तीर्थस्थळे मोगली वर्चस्वाखालून मुक्त व्हावीत, यासाठी पेशवे हरप्रकारे प्रयत्न करीत होते, हे स्पष्ट होते. याच पत्रात नजीबखान रोहिल्याबद्दल नानासाहेबांनी जे लिहिलंय, ते लक्षात घेऊन जनकोजी- दत्ताजींनी नजीबखानला वेळीच ठेचला असता, तर पुढचे ‘पानिपत’ टळले असते.

नानासाहेब लिहितात, ”नजीबखानास बक्षगिरी दिल्ह्यास तीस लक्ष रुपये देतो म्हणोन लिहिले. ऐशियास नजीबखान पुरा हरामखोर बाट आहे. गुदस्तां चिरंजीव दादाशी त्यांशी काही मजा राहिली नाही. तो दिल्लीत प्रविष्ट जालिया अब्दालीचेच दिल्लीत ठाणे बसलेसें जाणावें. बेमान हरामखोर आहे. त्यास वाढवणे सर्पास दूध पाजण्याप्रमाणे आहे. फावले मानी त्याचे पारपत्यच करावे!” पण मराठ्यांचे दुर्दैव! नजीबखानाला दूध पाजण्याचा प्रकार झाला. त्याने केलेल्या विश्वासघाताने पानपताच्या लढाईत दत्ताजी शिंदेंचा जीव घेतला. हा इतिहास ठाऊक असूनही अनेक सर्पांना दूध पाजून दिल्लीत फूत्कारायची मोकळीक आपण अजून देत आहोत. दिल्लीश्वर कुणीही असो; महाराष्ट्र आणि मराठी माणूस कायम त्यांच्या दु:स्वासाचाच धनी राहिला आहे आणि त्यासाठी मराठी लोकांचा वापर केला गेला आहे. एवढं तरी ‘महाराष्ट्रात शिंदेशाही’ अवतरण्याची अपेक्षा करणाऱ्या जयदेव ठाकरे यांना ठाऊक हवं.

शिंदे आणि त्यांच्या गटातले आमदार-खासदार आपल्या बंडाच्या समर्थनार्थ ‘हिंदुत्वाची साक्ष’ काढतात. त्यांना ‘छत्रपती थोरले राजाराम महाराज’ यांच्या चरित्रातील पुढील गंमत वाचून फेफरं आल्यास आश्चर्य वाटू नये. संभाजीपुत्र ‘शाहू’ औरंगजेबच्या कैदेत होता. त्याची सुटका व्हावी म्हणून औरंगजेबच्या मुलीने-जुबेदाने वडिलांना विनवण्या केल्या. औरंगजेब तेव्हा मृत्युशय्येवर होता. त्याने मुलीला सांगितले, ”शिवाजी व आम्ही बदरिकाश्रमी राज्य इच्छा धरून तप केले. आमची तपश्चर्या अति उग्र, तामसी त्यायोगे म्लेंच्छ (मुसलमान) जालो. ह्या धर्माची (म्लेंच्छ) स्थापना करावी, हा आमचा नियम ! शिवाजीची तपश्चर्या सात्त्विक म्हणून त्याचा हिंदू धर्मात जन्म होऊन हिंदू धर्माची स्थापना करावी, हा त्याचा नेम ! आयुर्दाय (आयुष्य) कमी होऊन तोच शिवाजी हा तुझा पुत्र जन्मला (शाहू म्हणून). त्याचा झेंडा दिल्लीस लागेल!”

हिंदू-मुस्लीम द्वेष वाढवणाऱ्या राजकीय हिंदुत्वाला एकाच वेळी ‘दफन-दहन’ करणारा हा इतिहास आहे. तो सत्तेसाठी उपयुक्त नाही, पण सत्य सांगणारा आहे. तो समजून घेतला की, महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी या भूमीत पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज जन्मायला हवेत, असे तुम्हालाही वाटणार!

(लेखन काळ : ११ ऑक्टोबर २०२२)