ग्रेससारखे कवी हे केवळ तास-दोन तास वाचून ठेवून देण्यासारखे नाहीत, तर ते आयुष्यभर हळूहळू समजत जाणारे कवी असतात. जसं जसं आपलं अनुभवविश्व समृद्ध होत जातं, त्या अनुभवांच्या अंतर्गत विश्लेषणाने आपलं चिंतन प्रगल्भ होत जातं, ‘इनसाइट्स’ नि स्पष्टता वाढत जाते तसे तसे हे कवी वा त्या त्या कविता आपल्याला अधिकाधिक समजत जातात. दोन-चार ओळी समजून आपल्याला ती कविता आवडलेली असते, मधल्या न समजलेल्या ओळी आपण तशाच दुर्लक्ष करून सोडून देत असतो. मग पुढे दोन-चार वर्षांनी आपला तेवढा प्रवास झाल्यावर मधल्या त्या ओळींचा अर्थ लागून ती कविता आपण समजत होतो त्याहीपेक्षा किती तरी अधिक प्रगल्भ आहे, हे आपल्या लक्षात येत असतं. आत्मोन्नतीच्या त्या त्या टप्प्यावर आपण येऊन पोचलो की मग ती ती कविता आपल्याला तेव्हा तेव्हा समजायला लागते. कविता लिहिणाऱ्या प्रतिभावंताच्या प्रतिभेने तो प्रवास आधीच पार केलेला असतो.
आपल्या स्वत:च्याच मनाचा तरी आपल्याला कुठे थांगपत्ता लागत असतो? आपल्या ‘सबकॉन्शस’पासूनच या दुर्बोधतेला सुरुवात होते आणि ‘अन्कॉन्शस’ तर आपल्याला पूर्णपणेच दुर्बोध असतं. अतर्क्य स्वप्नांमधून, प्रतीकांमधून व्यक्त होतं ते आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतं. आपली स्वत:चीच सगळी स्वप्नं तरी कुठे आपल्याला सुबोध असतात? सगळ्याच जीवमात्रांचं ‘अनकॉन्शस मन’ हे ‘ओव्हरलॅपींग’ असून आपणा सर्वांचा मिळून एक ‘collective unconscious’ किंवा ‘वैश्विक मन’ आहे अशीही एक ‘थिअरी’ आहे.
दुर्बोधतेच्या खालोखाल हा लोकांच्या टीकेचं लक्ष्य व्हायचा तो त्याच्या एककल्ली, ‘एक्सेंट्रिक’, आत्मकेंद्रित आणि थोडंसं विक्षिप्तच म्हणता येईल असं वागण्या-बोलण्यामुळे. पण खरं तर कलावंताची “एक्सेंट्रिसिटी’ ही पण एक स्थलकालाबाधित गोष्ट आहे असं आपल्याला दिसून येतं. अगदी मागच्या तीनशे वर्षांचा विचार केला तरी कुठल्याही काळातल्या, कुठल्याही देशातल्या, कुठल्याही भाषेतल्या, प्रतिभावंत, कलावंत, विचारवंत, तत्त्वचिंतक, वैज्ञानिक अशा असामान्य माणसांच्या वागणुकीमध्ये अशी ‘एक्सेंट्रिसिटी’ हे एक साम्यस्थळ आपल्याला दिसून येतं. रोमन, ग्रीक, इंग्लिश, फ्रेंच अशा कुठल्याही त्या त्या काळच्या प्रगत संस्कृतींचा विचार केला तरी त्या त्या काळच्या अशा असामान्य लोकांमधे अशी वागणूक, हे साम्यस्थळ दिसून येतंच. मायकेल अँजेलो, पाब्लो पिकासो, व्हॅन गॉग किंवा प्राचीन ग्रीक तत्त्वचिंतक, वैज्ञानिक यांच्यामधे विचारांची, भूमिकेची, अभिव्यक्तीची कितीही विविधता दिसून येत असली तरी त्यांच्या सामान्य वागणुकीत हे साम्य आपल्याला सापडतंच. मग अशा वेळी या असामान्यांची अशी वागणूक आपण अपसामान्य ठरवणं कितपत योग्य आहे?
उच्च प्रतिभेबरोबर बाकी ‘माणूस’ म्हणूनही व्यक्तिमत्त्वाचा विकास होणं शक्य नाही, असं माझं म्हणणं नाही. पण ती ‘प्रतिभे’च्या पुढची पायरी असावी. तो ‘प्रज्ञे’चा प्रांत आहे. प्रतिभावंत, प्रज्ञावंत व मग संत, असा हा ‘उत्क्रांतिक्रम’ असावा असं मला वाटतं. म्हणूनच कुठल्याही काळातल्या संतामधे प्रतिभेच्या खुणाही आढळतातच-मग तो तीनशे वर्षांपूर्वीचा सेंट ऑगस्टिन असो किंवा मीरा, कबीर, तुलसीदास हे विभिन्न काळांतले भारतीय संत असोत अथवा महाराष्ट्रातली थोर संतपरंपरा असो.
‘छंद’ आणि ‘सत्यकथा’मधे त्याच्या कविता येऊ लागल्यावर मग त्याचं थोडं नाव होऊ लागलं. ‘तरुण भारता’त ‘करुण रसा’वरचा त्याचा एक लेखही त्या वेळी गाजला आणि ग.त्र्यं. देशपांड्यांनी घरी बोलावून त्यासाठी त्याचं कौतुकही केलं होतं. नंतरच्या काळात तो एकदा दीर्घकाळासाठी आजारी पडला. त्यामुळे रजा बिनपगारी होऊन खाण्याची व औषधांच्या पैशाचीही मारामार झाली. पु.शि.रेगे आणि त्याचा पत्रसंवाद त्या काळात जरा गाजला होता. पु.शि.रेग्यांच्या ‘छंद’मध्ये तेव्हा हा नियमित लिहायला लागला होता. पु.शि.रेग्यांनी ‘ग्रेस’ म्हणजे कुणी स्त्री असावी अशा समजुतीने लिहिलेली ती पत्रं होती. ‘हा पत्रव्यवहार आम्हांला दे, आम्ही तुझ्या आजारपणाचा पूर्ण खर्च करतो,’ अशी ‘ऑफर’ही त्या वेळी त्याला आली होती. पण त्या वेळी याने पुन्हा आपल्या मानी स्वभावाचा परिचय देत कणखरपणे, “ही पत्रं म्हणजेही एक कलाविष्कार आहे. ती विकून मी त्या कलावंताशी बेइमानी करणार नाही. मला तुमचे पैसे तर नकोतच, पण आजपासून तुमची नोकरीही सोडली!” असं सांगून ती पत्रं देण्यास नकार दिला होता.
त्याचं एरवीचं बोलणंही असंच धबधब्यासारखं ‘मोनोलॉग’च असे. प्रत्येक दोनचार वाक्यांमागे एखादं वाक्य किंवा एखादा शब्द अत्यंत उंचीचा असे. त्याच्याकडून उठून आलं की हे सगळं डायरीत लिहून ठेवायला पाहिजे, याचं सगळंच बोलणं ‘टेप’ करून ठेवायला पाहिजे, असं मला नेहमी वाटायचं. पण ते करणं काही माझ्याकडून झालं नाही. ही ‘वैखरी’ अशी ओसंडून वाया गेली! परवा राघव मला त्याचा तळपाय दाखवून म्हणाला, “आम्हां सगळ्या भावंडांचा हा ‘मार्क’ आहे!” आपल्या तळपायाला मागे शेवटी थोडं वळण असतं. ते त्याच्या पायाला नाहीच. त्याचं कारण त्याने सांगितलं की, वडील त्यांना शाळेत पोहोचवायला न्यायचे. लेडीज सायकल असल्यामुळे समोर दांडा नसायचा. मागे कॅरिअरवर बसलेल्या मुलांचा पाय स्पोकमधे जायचा आणि वडील तंद्रीत सायकल रेटत असायचे. मग जखम, दोन-तीन टाके. हे प्रत्येकच मुलांच्या बाबतीत दोनतीनदा झालं असल्यामुळे माधवी आणि मिथिलाचेही पाय असेच आहेत. मिथिला सांगते की, आजकाल आता पालक मुलांच्या परीक्षांच्या वेळी सुट्ट्या घेतात; दादा त्या काळात आमच्या परीक्षांसाठी महिना-दीड महिना सुट्टी घ्यायचे. माधवी परीक्षेच्या दिवशी आंघोळीला जायची तेव्हा बाथरूमबाहेर उभे राहून वडिलांना पुस्तक वाचायला लावायची आणि तिची आंघोळ होईपर्यंत ग्रेस ते मेडिकलचं जाडजूड पुस्तक तिच्यासाठी मोठ्याने वाचत असायचे.
व्यसनांच्या बाबतीतही टोकाचा विरोधाभास मला त्याच्यात दिसतो. व्यसन करायचा तेव्हा त्यांच्या पूर्ण आहारी जायचा, पण सोडलं तेव्हा प्रचंड आत्मसंयमाचा दाखलाही त्याने दिला. प्यायचा तेव्हा प्यायला लागला की हा खूप पीत असे. कॉलेजमधून पाच वाजता परतताना ‘पंचशील चौकात’ल्या बारसमोर त्याची स्कूटर उभी राहत असे. तिथे ‘काउंटर’वरच उभा राहून ग्लास हातात घेऊन तो त्यात एक, दोन, तीन असे तीन पेग एकदम टाकायला लावायचा. मग ती ग्लास भरून दारू कोरीच एका दमात रिती करायचा. नंतर दोनतीन ग्लास थंड सोडा हळू हळू पीत बसायचा. यावर त्याचं स्पष्टीकरण असं की, विषच प्यायचं तर शंकरासारखं गटागट पिऊन टाकायचं, मग डोकं थंड करायला त्याने डोक्यावर गंगा धरली तसा थंड सोडा हळूहळू प्यायचा. हे पिऊन झालं की घरी येऊन तो स्वयंपाक करायचा आणि तिन्ही लेकरांना जेवू घालायचा. स्वयंपाकही तो अतिशय सुरेख करत असे. जास्ती तिखट, तेल, मसाले नसलेले सात्त्विक जेवण अशीच त्याची आवड होती. स्वत: स्वयंपाकही तो तसाच करत असे. त्याच्या हातची पीठ लावून केलेली मेथीची सुकी भाजी तर अप्रतिम असायची.
ग्रेस याचं संपादक म्हणून कार्य फारसं उल्लेखलं गेलेलं नाही, पण तो उत्तम संपादकही होता. ‘युगवाणी’चं संपादन करताना त्याचा नेहमीचा ताठा सोडून, स्वत: एवढा मोठा लेखक असतानाही नमतं घेऊन त्याने अनेक नवोदितांना लिहितं केल्याच्या आठवणी अनेक लोक सांगतात.
दुसऱ्या दिवशीचे पेपर याच्या फोटोंनीच भरलेले होते, ते पाहून त्या चौकातला पान-टपरीवाला म्हणाला, “अरे ये बावाजी तो यहीसे जाना आना करता था. इतना बड़ा आदमी था क्या…?”
प्रत्यक्ष ग्रेस माझ्या समोर उभा केलात. सर