रत्नागिरी असो वा सिुंधुदुर्ग जिल्हा, कोकणात भाताचं पीक अमाप. साहजिकच तांदळापासून विविध पदार्थ बनवण्याची पध्दत इथे आहे आणि त्यासाठी तांदूळ सतत धुवावे लागतात. हे तांदूळ धुण्यासाठी कोकणात खास ‘रवळी’चा वापर केला जातो. रवळी म्हणजे लहान आकाराची उभट टोपली. धुवायचे तांदूळ रवळीत टाकायचे आणि रवळी वाहत्या पाण्याखाली धरायची की, धुतलेले तांदूळ रवळीतच राहतात नि पाणी निमूट खालून झरून जातं. एक कणही खाली न पडता तांदूळ स्वच्छ धुऊन होतात. कोकणात केवळ तांदूळ धुण्यासाठीच टोपल्या वापरल्या जातात असं नाही, आमसुलं (कोकम) आणि उसरी (वर्षभराच्या वापरासाठी मीठ लावून ठेवायची हिरव्या कैऱ्यांची कापं) धुण्यासाठीही टोपल्या वापरल्या जातात. मात्र त्या रवळीपेक्षा मोठ्या असतात. गंमत म्हणजे संसारात हरघडी उपयोगात येणाऱ्या टोपल्या सारवल्याशिवाय वापरात आणत नाहीत. अगदी धान्य पाखडण्यासाठी वापरायचं सूपही सारवूनच घेतलं जातं. त्यातून धान्यधुन्य काहीही खाली पडू नये म्हणून. पण तरी प्रत्येक घरात एक बिनसारवलेली रवळी आणि टोपली असणारच. तांदूळ-सोलं-उसरी धुण्यासाठी. या दोन्ही सारवल्या जात नाहीत, त्यातून पाणी झरावं म्हणून.
या गाण्यात बेलाची पानं ठेवण्यासाठी ‘दुरडी’चा वापर केला आहे. अशी ही मराठवाड्यातली दुरडी. निरगुडी, पऱ्हाट्या-तुऱ्हाट्यांपासून केलेली. दुरडीपेक्षा मोठ्या आाकाराच्या टोपलीला मात्र मराठवाड्यात नांदेडकडे ‘डाल’ असा शब्द योजला जातो आणि त्याचा वापर जड सामान वाहून नेण्यासाठीच केला जातो. मराठवाड्यात टोपली म्हणजेच दुरडी लिंपण्याची पध्दत नाही. पण धान्य साठवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणारं डाल लिंपलं जातं आणि तेही नहमीसारखं शेणा-मातीने नाही, तर बहुतांशी मेणाने. बिब्ब्याच्या तेलापासून काढलेल्या मेणापासून डाल मेणवण्याची पध्दत तिथे आहे. यामुळे डाल आणि त्यातलं धान्य दोघांनाही कीडा-मुंगी लागत नाही. त्यातलं धान्य सुरक्षित राहतं.