खरं तर ‘हिंदू धर्म’ हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. अनेक लोकांनी या आधी मांडलंय त्याप्रमाणे ‘हिंदूंचे धर्म’ असा तो शब्दप्रयोग पाहिजे. हिंदूंचा एकच एक धर्म नाही, तर अनेक धर्म आहेत. याचे प्रत्यंतर आपल्याला ठायी-ठायी येते. केवळ निरनिराळे उपासना संप्रदाय, पद्धती, दर्शनं त्यात आहेत म्हणून नाही; तर जेवढी म्हणून माणसं आहेत, तेवढ्या प्रकारचे धर्म त्यात असू शकतात. उदाहरणार्थ- आपण बघतो की- एक जण शंकराला भजतो, तर दुसरा विष्णूला. एक जण उभं गंध लावतो, तर दुसरा आडवं. कोणी पूर्णत: शाकाहारी असतो, तर कोणी फक्त श्रावणात शाकाहार करतो. एकाच घरात एक बहीण मंगळवारी उपास करते, तर दुसरी गुरुवारी. माणूस आस्तिक असताना हिंदू असतोच, पण नास्तिक असूनही हिंदू असू शकतो. गणपतीला अमुकच एक नैवेद्य दाखवला पाहिजे, असं काही नाही : केळ्याच्या कापांपासून ते वाटल्या डाळीपर्यंत आणि भिजकट साखरफुटाण्यापर्यंत कोणताही नैवेद्य चालतो. ही फार मोठी मजा आहे आणि फार मोठा आनंद आहे.
हजार-पाचशे वर्षांपूर्वी या बाबतीत काही तरी साध्य झालं असतं; पण आता एकविसाव्या शतकात आधुनिक विज्ञानाचा उदय झाल्यानंतर, व्यक्तिस्वातंत्र्यवादी भांडवलशाही अस्तित्वात आल्यानंतर, जागतिकीकरणाची प्रक्रिया झपाट्याने सुरू असताना, सगळं जग लोकशाही राज्यव्यवस्थेच्या दिशेनं चाललेलं असताना, भारतात महात्मा गांधी नावाचा माणूस निर्माण होऊन गेला असताना आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व न्याय यांचा पुकारा करत लोकशाही प्रजासत्ताकवादी भारतीय राज्यघटना अस्तित्वात असताना प्राचीन, जुनाट धर्माच्या आधारे समाजाचे संघटन व राष्ट्रनिर्मिती करणे कोणालाही शक्य होणार नाही. विशेषत: सगळे जगच मुळी धर्मोत्तर समाजाच्या (पोस्ट-रिलिजिअस सोसायटीच्या) दिशेने चाललेले असताना; व्रत-वैकल्यांच्या खाजणात बुडालेल्या, अतार्किक व अशास्त्रीय कल्पनांवर आधारलेल्या आणि भाकडकथांचे तत्त्वज्ञान बनवणाऱ्या जुनाट धर्माचे पुनरुत्थान कोण सहन करून घेणार आहे?
VIVEKPURNA … BADHIYA UDBODHANPAR LEKH 👈👍