शरद पवार यांनी एकूण तीन वेळा काँग्रेस पक्ष आजवर सोडला आणि पुन्हा ते सत्तेसाठी काँग्रेसच्याच छत्राखाली गेले . १९७८ साली म्हणजे खंजीर प्रयोगानंतर राजीव गांधी यांच्या उपस्थितीत पवार पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि थोड्याच काळात मुख्यमंत्री झाले . विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करुन त्यांनी श्रीमती सोनिया गांधी यांच्याविरुद्ध बंड केलं पण , १९९९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते लगेच काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झाले . खरं तर , शरद पवार यांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा डावलून श्रीमती सोनिया गांधी परस्पर राष्ट्रपतींना भेटल्या हे शल्य शरद पवार यांना रुतत होतं म्हणूनच त्यांनी सोनिया गांधी यांच्याविरुद्ध बंडखोरी केली असं म्हणण्यास वाव आहे ; नव्हे तेच कारण आहे . १९९५ मध्ये युतीचं सरकार आल्यावर दोन्ही सभागृहाच्या संयुक्त विधिमंडळ पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारुन त्यांनी पक्षावर त्यांचं नियंत्रण कायम ठेवलं ; ती देखील सत्ताकांक्षाच होती .