विज्ञानाच्या मते विश्वाच्या उत्पत्तीचे कारण व स्थिती अजूनही संशोधनाच्या क्षेत्रात आहे. त्यांच्या बिग बँगचा याबाबतचा प्रयोग फसला. तरीही फ्रान्समध्ये, इटलीत व स्वित्झर्लंडमध्ये जमिनीच्या खोलवर सव्वीस मैल लांबीची गोलाकार वेधशाळा बांधून तेथील हजारो वैज्ञानिकांनी त्यांचे संशोधन चालू ठेवले आहे. अंतिम सत्याचा दावा ते करत नाहीत. धर्मग्रंथ मात्र अंतिम सत्याखेरीज दुसरे काही सांगत नाहीत.
ही बाजू चार्वाकांची आहे व ती दिवसेंदिवस बळकट होत जाणारी असे. आजच्या जगात ख्रिश्चन धर्म सर्वात मोठा (अडीच कोटी लोकांचा) आहे. त्याखालोखाल इस्लामचा स्वीकार दीड कोटी लोकांनी केलेला आहे. त्यानंतरचा क्रमांक सेक्युलरांचा आहे. त्यांची संख्या एक कोटी पंधरा लाखांहून अधिक आहे. ती हिंदूंच्या व बौद्धांच्या अनुयायांहून मोठी आहे. जगाच्या वाटचालीची दिशा दाखवणारे हे आकडे आहेत. सबब नाकारता येतात, वास्तव नाकारता येत नाही. ते नाकारण्याचा प्रयत्न करणारे असत्याग्रहीच केवळ असू शकतील.
तशीही महायुद्धे आता इतिहासजमा झाली आहेत. धर्मांची युद्धे संपली आहेत. सत्तेच्या लढाया निवडणुकांत परिवर्तीत झाल्या आहेत. जातिधर्मांचे वेगळेपण कायम असले तरी त्यांच्यातील तेढ कमी होऊन ती सौम्य झाली आहे. जग लहान झाले ते गतिमान साधनांच्या साहाय्याने झाले असे म्हणतात… मात्र जग लहान होण्याचे वा होत जाण्याचे खरे कारण माणूस मोठा होत जाणे हे आहे. हे बदल माणसांना परस्परांच्या जवळ आणणारेही असतील. धर्म, जात व वेगळे ईश्वर यांतून निर्माण होणारे दुरावे, अविश्वास व वैर या गोष्टी त्यात संपल्या असतील. माणसांतील तेढ लढाया घडवत नाही. फार तर ती भांडणापर्यंत जाईल.