या सिंधूजनांचा उल्लेखच ऋग्वेदात आर्यशत्रू, दस्यू वा दास असा आला आहे. मॅक्समुल्लरच्या मते आर्यांच्या भारतातील आगमनाचा व वेदांच्या रचनेचा काळ एकच आहे. आता मात्र त्याचे हे मत कुणी मान्य करत नाही. वैदिकांनी सिंधू संस्कृतीचा पाडाव केल्यानंतर व स्वतःला शास्ते म्हणून प्रस्थापित केल्यानंतर, कित्येक (सुमारे 200) वर्षांनी त्यांनी भारताच्या भूमीतच ऋग्वेदाची रचना केली.
साऱ्या महाराष्ट्रात सध्या सत्यनारायण ही साऱ्यांच्या श्रद्धेची देवता आहे. त्याची नुसती पूजाच नाही तर महापूजा होते व तीत सामान्य माणसांसोबत राजकीय नेतेही सहभागी होतात. पंधरावीस वर्षांपूर्वीचा तो उत्सव आता जरा मावळला आहे… पण घरोघरच्या त्याच्या पूजा चालूच राहिल्या आहेत. या सत्तानारायणाचा जन्म अडीच ते पावणेतीनशे वर्षांपूर्वीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी सत्यनारायण केला नाही. त्यांच्या समकालीनांनी वा पूर्वीच्या पिढ्यांनीही त्यांची पूजा केली नाही. मग हे दैवत आले कुठून?
एकदा एकाला दैवत ठरवले गेले की मग त्याच्या पूजा, आरत्या व पोथ्या तयार होतात. लाभापोटी खऱ्याखोट्या कथा रचल्या जातात. गणेशपुराणे अशीच लिहिली आहेत. त्यात या गणपतीच्या जन्माच्या अनेक कथा आहेत. काही चांगल्या तर काही अतिशय वाईट. एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची. मूळ वेदांमध्ये असलेला गणपती मानवदेहधारी आहे. त्याला हत्तीचे तोंड वा सोंड नाही. सोंडेचा गणपती पुढे महाभारतात येतो. गणपतीचे बदलणारे हे रूपही प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारे आहे. गणपतीच्या पोथ्यांमध्ये आलेल्या त्याच्या जन्मकथाही या संदर्भात ज्ञानवर्धक व मनोरंजक आहेत.