बीबीसी वृत्त वाहिनीच्या संकेतस्थळानं दिलेल्या वृत्तानुसार , याच दरम्यान करण्यात आलेल्या जनमताच्या दोन चाचण्यात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेली आहे . एप्रिल महिन्यात या पाहण्या करण्यात आल्या . अमेरिकेतील डेटा इंटिलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टंट ही कंपनी जगातल्या विविध देशातील , विशेषत: राजकीय नेत्यांच्या विषयी जनमनात असलेल्या मताचा अंदाज घेण्याचं काम करते . कोरोनाची दुसरी महाभयंकर लाट आणि त्यामुळे भारतात मृत्यूचं तांडव सुरु होण्याआधी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून लोकप्रियता ६३ टक्के होती . त्यात २२ टक्क्यांनी घट झालेली आहे . भारतातील निवडणूक निकालांचे अंदाज व्यक्त करण्यात आघाडीवर असलेल्या ‘सी-वोटर’ या संस्थेच्या पाहणी अहवालात नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ६५ वरुन ३७ टक्के इतकी घसरली आहे . विशेषत: कोरोनाची दुसरी लाट हाताळण्याच्या शैलीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघही मोदी यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या झळकल्या आहेत . या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींना पर्याय कोण ? अशीही चर्चा सुरु झाली आहे आणि त्यात काहीही गैर नाही . देवभोळे लोकही देवाला पर्याय शोधतच असतात आणि त्यासाठी ९६ कोटी देवांचा पर्याय उपलब्ध असतो . महात्मा गांधींना पर्याय कोण , अशी चर्चा महात्मा गांधी हयात असताना एकेकाळी भारतात रंगली होती . महात्मा गांधी ते नरेंद्र मोदी अशी या पर्यायी चर्चेची व्याप्ती आहे . या पर्यायाच्या चर्चांनी महात्मा गांधी , जवाहरलाल नेहरु , इंदिरा गांधी , लाल बहादूर शास्त्री , अटलबिहारी वाजपेयी यांना कधी विचलित केले नाही . नरेंद्र मोदी आणि त्यांचे समर्थक मात्र नुसत्या चर्चेनी जणू काही आभाळ कोसळल्यासारखे सैरभैर झालेले दिसत आहेत .
या देशात भाजपाला पर्याय कोण ? हा या संदर्भातील चर्चेचा दुसरा भाग आहे आणि त्या विषयावर प्रस्तुत भाष्यकारानं अनेकदा या स्तंभातून मतप्रदर्शन केलेलं आहे . ममता बनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला विधानसभा निवडणुकीत नुकतीच धूळ चारल्यावर ममता बॅनर्जी नरेंद्र मोदी यांना पर्याय ठरु शकतात अशी चर्चा सुरु झाली तेव्हा ममता बॅनर्जी आणि कोणताही प्रादेशिक पक्ष भाजपला पर्याय होऊ शकत नाही , या प्रस्तुत भाष्यकारानं मांडलेल्या मुद्दयावर अतिशय गंभीरपणे चर्चा झाली . पत्रकारितेतले माझे जुने स्नेही , नागपूरचे श्याम पांढरीपांडे हे एक संवेदनशील स्वभावाचे व्यक्तिमत्त्व आहे . त्यांनी अतिशय गंभीरपणे पत्रकारिता केली आहे . भाजपला अराजकीय पर्याय उभा करावा अशी सूचना श्याम पांढरीपांडे यांनी केली आहे ते म्हणतात , “पर्याय सामाजिक आंदोलनातून उभा राहू शकतो . अनेक अस्वस्थ गट मंथन करीत आहेत . त्यांचा समायोजित कार्यक्रम तयार करता येईल . विभिन्न राज्यातून आलेल्या युवा व मध्यमवयीनांचा एक गट सध्या नागपूरच्या सीमेवर पडाव टाकून आहे ! अशा बिगर राजकीय पर्यायाच्या लाटेवर विरोधी पक्ष आरूढ होऊ शकतात पण , आधी अशी लाट निर्माण व्हायला हवी आणि ती होईल !
निवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि समविचारी मित्रवर्य प्रकाश परांजपे यांच्या मताशी सहमत होत पुन्हा एकदा सांगतो , काँग्रेसच्या नेतृत्वाखालील प्रादेशिक पक्षाची आघाडी हाच एकमेव राजकीय पर्याय भाजपला आहे . नरेंद्र मोदी यांचा उदय झाल्यावर म्हणजे केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर पर्याय म्हणून काँग्रेस उभा पक्ष राहू शकलेला नाही , हे खरं आहे . तरी सतत होणाऱ्या पराभवाच्या मानसिकतेतून हा पक्ष सावरला गेला ( ही शक्यता आजच्या घटकेला तरी क्षीणच दिसत आहे ! ) आणि या पक्षाला सक्षम नेतृत्व मिळालं तरच भाजपला राजकीय पर्याय उभा राहू शकतो . पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक कोरोनाच्या नावाखाली पुढे ढकलून श्रीमती सोनिया गांधी यांनी पक्षाचं नेतृत्व गांधी घराण्याकडेच राहील , असे संकेत दिले आहेत . काँग्रेसमधील असंतुष्ट ‘जी-२३’ गटाची समजून घालण्यात प्रियंका गांधी यांना यश आल्याच्या बातम्या झळकल्या आहेत . हे दोन्ही एका अर्थाने चांगले संकेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे .
बहुसंख्य नागरिक भा ज पा विरोधात मत व्यक्त करताना दिसत असले तरी शेवटी पर्याय कोणता असा प्रश्न उपस्थित करीत आहे. आणि ते बऱ्याच अंशी खरेही आहे. भाजप आणि मीडिया ने राहुल गांधी यांची प्रतिमा पप्पू करून टाकली वास्तविक राहुल गांधी यांची प्रतिमा ही आभासी आहे. तथापि गोदी मीडिया राहुल गांधी किवा काँग्रेस ला पाहिजे तशी प्रसिद्धी देत नाही, त्यामुळे लोकांमध्ये काँग्रेस आणि राहुल यांच्या विषयी नकारात्मक भाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. भाजप ला हेच पाहिजे आहे.
त्या मुळे लोकांमध्ये भाजप ला पर्याय सध्या तरी दिसून येत नाही, किंबहुना भाजप ची ही खेळी आहे
काँग्रेस वर नेहमी घराणेशाही चा आरोप होतो तो सुद्धा खरा नाही. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी आणि त्यांची दोन लेकरे खरे तर राजकारणापासून अलिप्त होते. अर्थात इंदिरा गांधी आणि राजीव या दोघांच्या हत्येनंतर सोनिया यांना आपल्या अपत्यांची चिंता होती. काँग्रेस ची राजकीय मंडळी काँग्रेस ला ताकद मिळावी म्हणून सोनिया गांधींची मनधरणी करून त्यांना आणि पुढे राजीव आणि प्रियंका यांच्या गळ्यात माळ घातली हा इतिहास आहे.
दुसरीकडे या प्रकारातून विरोधकांना घराणेशाहीचा आरोप करण्यास वाव मिळाला.
खरे तर आता सोनिया, राहुल आणि प्रियंका यांनी अध्यक्ष पदाची लालसा खंबीरपणे सोडणे, त्यांच्या वरील घराणेशाहीचा आरोप खोडून काढण्यासाठी आवश्यक आहे. मात्र काँग्रेस अंतर्गत गटबाजी मूळे काँग्रेस ची शकले होण्याची त्यांना भीती असावी. मात्र ही भीती सोडून जे होईल ते पाहता येईल असे गृहीत धरून अध्यक्ष पदाचा वाद एकवेळ सोडविणे गरजेचे आहे.
काँग्रेस मध्ये राहुल पेक्षा जेष्ठ, श्रेष्ठ आणि अभ्यासू नेते मंडळी आहेत. त्यांना जर समोर केले, तर काँग्रेस ला उर्जवस्था प्राप्त होईल, भाजप ला पर्याय यातून निर्माण होऊ शकतो.