– वीणा डोंगरवार, नागपूर
सोमवारी जन्माष्टमीनिमित्त घरी कृष्णदेवाचे सपत्निक आगमन झाले. इकडे पूर्व विदर्भात आणि विशेषतः भंडारा, गोंदिया, गडचिरोली याआमच्या शेतीप्रधान भागात गणपतीपेक्षा कृष्ण लोकांना जास्त जवळचा वाटतो. इकडे घरोघरी कृष्णमूर्तीची स्थापना केली जाते. यात बहुजन समाजाचा सहभाग अधिक प्रमाणात आहे. (कृष्णाचे बालपण सर्वसामान्य लोकांमध्ये गेले. त्यामुळे बहुजन समाजात तो जास्त लोकप्रिय असावा. ) कृष्णाला आवडणाऱ्या धानाच्या लाह्या आणि दूध, दही वगैरे पदार्थ इकडे भरपूर उपलब्ध आहेत. त्यामुळे मूर्तीचे विसर्जन स्थापनेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी (घरी जशी परंपरा असेल त्यानुसार) केले जाते. त्यानुसार त्याला ‘दीड किंवा अडीच दिवसांचा कान्होबा’ असे म्हटले जाते. (होय. विठ्ठलाला प्रेमभावाने जसे ‘विठोबा’ म्हणतात, तसे इकडे कृष्णाला ‘कान्होबा’ म्हणतात.) सोबत राही (राधा) आणि रुख्माई असतात. (काहींच्या मते त्यापैकी एक राधा नव्हे,तर सत्यभामा आहे.)
कृष्णाच्या आगमनाची तयारी साधारणतः आठवडाभराआधी सुरू होते. यात घरातले आबालवृद्ध उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होतात. मूर्तीच्या दोन्ही बाजूला ठेवण्यासाठी छोट्या टोपल्यांमध्ये गहू पेरले जातात. त्यांना ‘गौर’ असे म्हणतात. कृष्णासाठी छायाचित्रात दिसतो आहे तसा खाऊ तयार केला जातो. त्याला इकडे ‘फुलोरा’ असे म्हणतात. यात करंज्या, अनारसे, डाळीचे वडे, पुऱ्या, कणिक किंवा मैद्यापासून तयार केलेल्या वेण्या- फण्या, शेव इ. पदार्थांचा समावेश असतो. यासाठी अनारशाचे तांदूळ २-३ दिवस भिजत घालणे, तांदूळ कुटून साखर किंवा गूळ मिसळून त्याची उंडी तयार करणे, करंजीचे सारण करण्यासाठी गव्हाची पिठी दळून आणणे,आदी कामे उरकली जातात. जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी घरातील गृहिणी हे पदार्थ तयार करते. या कामी शेजारणी देखील उत्साहाने सहकार्य करतात. यावेळी घरातील लहान मुले देखील जमेल तशी मदत करतात. मूर्तिस्थापनेनंतर हे सर्व पदार्थ मूर्तीच्या डोक्यावर लटकवले जातात. त्यासाठी आकडे (हुक्स) असलेली एक विशिष्ट थाळी बाजारात मिळते. पण थोड्या वेळाने नरम पडून एकेक पदार्थ खाली गळू लागतो; म्हणून काही जण ते देवाजवळ एका थाळीत ठेवतात.
ज्यांच्याकडे परंपरेने फुलोरा तयार करण्याची पद्धत आहे किंवा ज्यांनी देवाला तसे कबूल केले आहे किंवा नवस बोलला आहे, केवळ तेच लोक फुलोरा तयार करतात. अन्यथा त्याशिवायही कृष्णमूर्तीची स्थापना केली जाते. मूर्तीची स्थापना करण्यासाठी योग्य जागा आधीच निश्चित केली जाते. त्यानुसार तिची स्वच्छता आणि सजावट केली जाते. विजेच्या माळा लावल्या जातात. साधारणतः आदल्या दिवशी बाजारातून किंवा आपल्या ठराविक कुंभाराच्या घरून मूर्तीची खरेदी केली जाते. त्यासाठी काही लोक आगावू नोंदणी देखील करतात. मूर्ती घरी आणताना तिला नव्या वस्त्राने झाकले जाते. हे आवरण स्थापनेच्या वेळीच काढले जाते. घरी आणल्यावर मूर्तीची आणि मूर्ती आणणाऱ्याचीही घराच्या प्रवेशद्वारावरच आरती ओवाळली जाते. यासाठी निरांजन,अक्षता, हळद-कुंकू इ.ने तबक सज्ज ठेवले जाते. घरातली ज्येष्ठ सुवासिनी मूर्ती आणणाऱ्याच्या पायावर तांब्यातले पाणी ओतून त्याचे पाय धुते. मूर्तीसोबतमूर्ती आणणाऱ्याचेही हळद- कुंकू, अक्षता लावून मूर्तीचे स्वागत केले जाते . तबक हाती धरून दोघांनाही ओवाळले जाते . नंतर मूर्ती घरात आणली जाऊन एका सुरक्षित ठिकाणी स्थानापन्न केली जाते.

भगवान कृष्णासंदर्भात आकाशवाणीच्या वृत्तनिवेदिका वीणा डोंगरवार यांचा “कान्होबा “हा नितांत सुंदर लेख वाचला,आपला महाराष्ट्र अशा विविध संस्कृतीने नटलेला आहे,विदर्भातील या कान्होबाची माहिती प्रथमच वाचावयास मिळाली,त्याबद्दल आणि चांगली माहिती दिल्याबद्दल श्रीमती डोंगरवार यांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवादही !
……..
कैलास ढोले,
ज्येष्ठ पत्रकार,
अहमदनगर.
वीणा डोंगरवार, नागपूर यांचा ” कान्होबा ” वाचला. खुप छान वर्णन… बालपण आठवले.