हे खरेतर पचायलाच नव्हे तर वाचायलाही अवघड आहे. तर्क, विचार व वैज्ञानिक मानसिकता असणाऱ्या व्यक्तींना ते सोपे जाणार आहे. ज्यांच्या श्रद्धा जडमूळ आहेत, ज्यांची ईश्वरनिष्ठा बावनकशी आणि संतश्रेष्ठांवरची भक्ती गडद आहे त्यांच्यासाठी असे प्रश्न हा निंदेचा विषय आहे… मात्र बदलत्या काळासोबत हे सारेच विचारले जाणार आहे व त्याला उत्तरेही द्यावी लागणार आहेत. हनुमंताची उड्डाणे आजच्या शाळकरी मुलांनाही खरी वाटत नाहीत. महाभारतात अण्वस्त्रे होती व रामाचे विमान चक्क आकाशात उडत होते ही गोष्ट आता कोणीही खरी मानत नाहीत. खीर खाल्ल्याने मुले होतात वा घाम प्राशन केल्याने गर्भधारणा होते यावर आज कोणाचा विश्वास बसत नाही.