चार्वाक नावाचा चमत्कार!

(टीम ‘मीडिया वॉच’)

हजारो वर्षापूर्वी भारतात  विज्ञान  होते का   ?

उत्तर- होय असे आहे.

पुराणातली विमाने म्हणजे विज्ञान  नाही . विज्ञान ही विचार करायची पद्दत आहे . त्याला बुद्धिवाद  – अथवा –    विज्ञाननिष्ठा असे म्हणतात. चमत्कार म्हणजे अपुरे  ज्ञान .  प्रत्येक घटनेला कार्य कारणभाव असतो . तो शोधता येऊ शकतो . दाखवता येतो . म्हणून प्रत्यक्ष  पुरावा हेच प्रमाण मानले पाहिजे. असा उद्घोष हजार वर्षापूर्वी  दुमदुमत होता .  आपण अतिशय अभिमानाने जगातल्या पहिल्या बुद्धीवाद्याचे कौतुक केले पाहिजे .

चार्वाक हा प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी विचार येथे होता. हजारो वर्षापूर्वी –  भारतात .

वेदप्रामाण्य धिक्कारामुळे  वैदिक धर्माने त्यांना नास्तिक ठरवले   तर ऐहिक सुखांचा आनंद   शोधल्यामुळे  जैन, बुद्ध अशा  श्रमण मार्गाच्या तत्त्ववेत्त्यांनीही त्यांची कठोर निंदा केली. शरीर पीडेचा  वा दु:ख मुक्तीचा श्रमण मार्ग  चार्वाकाला अप्रस्तुत वाटतो . चार्वाक सुखवादी अहे.

यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्तिमृत्युरगोचर:।

भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।

(जग रे भावा समाधाने – सुखी रहा इहलोकी  ।   

राख झाली देहाची की – उरते ती सारी माती ।।)

परिश्रम  कर . पराक्रम कर.  आणि  समाधानाने सुखाने जग . मृत्यूनंतर एकदा शरीराची राख झाली की सारे संपते . पुनर्जन्म चांगला मिळावा या  भितीपोटी कर्मकांड करत बसू नका . समाधी अवस्था झूट . केवल  ज्ञान थाप . आत्मा बकवास . निब्बाण  अशक्य .

चार्वाकाचे  हे उपदेश  विशुद्ध ऐहिक – जडवादी आहेत .त्याला परलोक तुच्छ , वेद  नको, उपनिषद नको, ब्राह्मण , अरण्यक – स्मृती इत्यादी ग्रंथ नको.

बुद्धाच्या अष्टांग मार्गावर त्याचा विश्वास नाही.  जैनाची केवल ज्ञान ही चार्वाकाला  थाप वाटते .   जैन, बौद्ध,  वैदिक या सर्वांची टीका सहन करत आणि त्यांची उलटी खिल्ली उडवत चार्वाक विचार –  भारतात हजारो  वर्षे दुमदुमत राहिले .

शेवटच्या चार्वाकाचा ऐतिहासिक उल्लेख  अकबर बादशहाच्या  काळात आढळतो . हा शहाणा  अकबराची भेट घेऊन त्याला आपली नास्तिकता पटवून देत होता . धर्माची  चर्चा आणि चिकित्सा करण्यासाठी अकबराने इबादतखाना नावाचे नवे ऑफिस उघडल्याचे इतिहासात नोंदवले आहे. तिथे त्याने सगळ्या धर्माच्या पंडितांसोबत चर्चा केल्या .  उत्तर आयुष्यात १५८२ साली  अकबराने इस्लाम  धर्म सोडून दिला आणि ‘दिने इलाही’ नावाचा नवाच  धर्म काढला. त्याच्या  या नव धर्माला –  धर्म ग्रंथच  नव्हता . मौलवी / पंडित ही भानगड पण नव्हती . या  नव धर्म  स्थापनेवर कदाचित चार्वाक  मताचा अंशत: प्रभाव  असावा. अकबर कृत  दिने इलाहीच्या काही मताशी  चार्वाकाचे विलक्षण साम्य आढळून येते .

न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः ।

नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः ॥

(स्वर्ग नाही, मोक्ष नाही, परलोकीचा  आत्मा नाही ।

वर्ण -आश्रम ,  कर्मकांडे फळ  तुला  देणार नाहीत ।।)

——————————————————————————————

अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम्‌ ।

बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृर्मिता ॥

यज्ञाचे ते अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंड , राख फासती अखंड ।

बुद्धी आणि पौरुष नाही   –  त्या षंढांच्या पोटाचा  धंदा ।।

——————————————————————————————

कर्म करत रहा, फळ आता मागू नकोस, पुढल्या जन्मी तुला ते मिळेलच. त्यानुसार तुझी जात/ वर्ण  ठरेल अन त्यावरून लायकी; ही शार्मिक शिकवण म्हणजे आपला  सुप्रसिद्ध कर्म- फल  सिद्धांत होय . ती त्याकाळची सामाजिक व्यवस्था आहे .  त्यात जन्मजात शोषण आहे .

कर्म सिद्धांत , पुनर्जन्म , चातुर्वण्य, वंशशुद्धी व तिच्यामुळे येणारा अहंकार यावर चार्वाकांनी कठोर टीका केली. पुनर्जन्म हा मूर्खपणा मानून हिणवला .  वंशशुद्धी ही वस्तुस्थिती नसून आभास आहे, तो आपले वरिष्ठत्व टिकविण्यासाठी केलेला प्रचार आहे असे चार्वाक मानतात.चार्वाक विचार वेदप्रामाण्य, ईश्वराचे अस्तित्व, पुनर्जन्माचा सिद्धान्त, यज्ञादी कर्मकांडाची उपयुक्तता हे सर्व एकाच वेळी नाकारतो . केवळ ‘प्रत्यक्ष’ प्रमाण हेच सत्य मानतो .

बौद्धांची दु:खमुक्तीची धडपड , निर्वाण ,  जैनांचा अनेकांतद – सारी दर्शने   – यांना चार्वाक काहीच  जुमानत नाही. यज्ञाच्या आगीत बुधलाभर  तूप जाळून परलोकाची हाव   धरण्यापेक्षा….  तेच  तूप पिऊन शरीर व मन धष्टपुष्ट आणि  सशक्त  करा – असा जगण्याचा सरळ साधा, सोपा मार्ग चार्वाकाला अभिप्रेत आहे.

———————————-

कृषिगोरक्षवाणिज्यदण्डनीत्यादिभि: बुधै:।

एतेरैव सदोपायैर्भोगाननुभवेद्भुवि ।।

(शहाण्यांनी या जगात शेती, गोपालन, व्यापार, प्रशासन सेवा इत्यादी कामे करून

 मिळालेल्या द्रव्याच्या साह्याने सुखोपभोग घ्यावेत, हाच लोकायतांचा आदर्श आहे.)

——————————————————————————————

चार्वाक ही  प्राचीन नास्तिकांची भारतीय उपाधी आहे. यात ब्राह्मण आहेत, राक्षस आहेत, दैत्य आहेत, ऋषिमुनी आहेत,राजे महाराजे – गोर गरीब सारे आहेत.  गंमत म्हणजे  कधी कधी देव पण आहेत.( ज्यांना  इथर पोथ्या देवता म्हणतात) देवांचा गुरू बृहस्पती हा पहिला चार्वाक असल्याचे मानले जाते. शंकर- पुरंदर-  बृहस्पती अशी चर्वाकांची वैचारिक परंपरा सांगितली जाते. ही परंपरा अस्तिकांच्या ग्रंथातून शोधता येते  . चार्वाक लोक्स ग्रंथ लिहिण्याचा भानगडीत पडले नसावेत किंवा आस्तिकांनी ते ग्रंथ नष्ट केले असावेत .

हे चार्वाक लोक  हजारो वर्ष आस्तिकांना धर्माविषयी प्रश्न विचारून भंडावून  सोडत आले आहेत . या प्रश्नावर डोकी खाजवत – त्याचे खंडन मंडन  आणि  त्या चर्चेतून विविध भारतीय दर्शने – श्रद्धा  अणि तत्वज्ञ तयार झाले  असे अनेक अभ्यासक मानतात. चार्वाक विचारतो : –

शुश्चेन्निहतः स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति ।

स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ॥

(यज्ञामध्ये बोकड मेला – जर तो आता स्वर्गी जाईल   ।

 यजमानाच्या पित्यासाठी मार्ग गवसला आम्हाला  ॥)

यज्ञामधे बळी दिलेले बोकड जर स्वर्गात जात असतील तर यजमानाच्या  बापाला त्याच रस्त्याने थेट स्वर्गात का पाठवू नये ?, असे चार्वाक विचारतो.

——————————————————————————-

प्रत्यक्ष प्रमाण हेच खरे . बाकी सब झुट . बाप  दाखव नाही तर श्राद्ध  कर – काल्पनिक थेअरी चालणार नाहीत . जे प्रयोगात समजले तेच विज्ञान . प्रत्यक्षात दिसले तेच ज्ञान .  प्रत्यक्ष, अनुमान व शब्द या तीन प्रमाणांच्या आधारे घटना, परिस्थिती यांची चिकित्सा करून सत्यासत्यता पडताळून पाहता येते असा सिध्दांत चार्वाकांनी मांडला.

धार्मिक छू छा  मंतर  – वेद मंत्र –  इत्यादी लिहिणारे हरामखोर –   भंड, धूर्त, आणि निशाचर आहेत.असे स्पष्टपणे त्याने सांगितले .

——————————————————————————————

त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः ।

जर्भरीतुर्फरीत्यादि पण्डितानां वचः स्मृतम्‌ ॥

(वेदांचे कर्ते भंड, धूर्त, आणि निशाचर   । 

जर्भरी, तुर्फरी, वगैरे अर्थहिन बकवास   ॥)

जर्भरी, तुर्फरी असे (निरर्थक) वा आर्ष रानटी शब्द वेदात येतात . त्याची चार्वाकाने चेष्टा केली आहे

——————————————————————————————

आज ज्याला नास्तिक बुद्धिवादी विचार  म्हणून जगभर ओळखले जाते –  तो विज्ञान निष्ठेचा  विचार चार्वाकांनी सर्वदूर पोहचविला होता.  लोकायत म्हणजे इहलोकविषयक प्रणाली. हे चार्वाक लोक अतिशय  नीतिमान होते. मृदुभाषी होते . सभ्य होते .  चार्वाकचे मराठी भाषांतर गोड बोलणारा असे होते.  चारू म्हणजे  गोड, मनाला रुचेल तेच आणि वाक्‌ म्हणजे सांगणारा.

धर्म निंदा – ईश्वर निंदा सोडून –  त्यांचा कोणताही गुन्हा आणि पाप आस्तिकांच्या ग्रंथात सुद्धा नोंदवलेले  नाहीत.  य़ज्ञाचे कर्मकांड, त्यात होणारा वेळेचा व द्रव्याचा नाश आणि त्यातील प्राणी  हिंसा हे चार्वाकांच्या यज्ञविरोधामागील कारण होते. चातुर्वण्य हे संस्कृतीचे अधिष्ठान मानायलाही त्यांचा विरोध होता. युक्तिवाद आणि चर्चा करणाऱ्या एका चार्वाक पंथी ब्राह्मणाला- तू तर राक्षस आहेस – असे संबोधून आस्तिक ब्राह्मणांनी  जाळून मारल्याची नोंद महाभारतात येते .

परंतु चार्वाकांच्या हिंसेचे – चोरीचे – खुनशी वृत्तीचे एकही उदाहरण मिळत नाही . एकही नाही. विरोधकांच्या ग्रंथातही नाही.

जीवनाचे ध्येय | असे सुखप्राप्ती

सुखानेच तृप्ती | माणसांना

– विंदा करंदीकर (चार्वाक दर्शन )

शरीराला आणि इंद्रियाना होणाऱ्यासुखमय भावनाना चार्वाक सुख मानतात . इथे सारा न्याय प्रत्यक्ष हेच प्रमाण असा आहे. मनाला होणारा संतोष  त्यांनाअभिप्रेत आहे. प्रियेच्या बाहुपाशात खरे सुख अशा अर्थाची चार्वाक वचने आहेत.

जगाला बुद्धिवाद आणि नैतिकता शिकवणारे चार्वाक अतिशय सुखाने स्वत:चे संसारी आणि व्यावसायिक जीवन जगत असावेत, असे मानायला जागा आहे.

गंमत म्हणजे काही सवाई चार्वाक देखील तयार होते . लोकायतचे अपडेटेड व्हर्जन म्हणजे :

 तत्त्वोपप्लव सिंह अर्थात विचारावर झडप घालणारा सिंह .

तत्त्वोपप्लव सिंह हा चार्वाक मताचा एकच ग्रंथ सध्या शिल्लक दिसतो .  त्याचा लेखक  जयराशी भट्ट हा  सातव्या  शतकांत होऊन गेला.  वैदिक, बौद्ध आणि जैन यांच्यावर या ग्रंथात  सडकून टीका केलेली आहे. पण तो चार्वकालाही जुमानत नाही . इझम किंवा विचारसरणी चूक आहे . अनुभव आणि विवेक बुद्धी माणसाला प्रयत्नपूर्वक मिळवता येते . सर्व लोकांच्या अधिकतर हितासाठी विवेक वापरावा . चार्वाकासकट  कोणत्याही पुस्तकी इझम च्या नादी लागू नका असे जयराशी भट्ट स्पष्टपणे सांगतो . चार्वाक मताला जुनाट म्हणणारे नवे चार्वाक जन्माला येत होते . यालाच   विज्ञाननिष्ठ विचार  असे म्हणतात .  भारतात लघुरुपाने  का होईना – पण हा विचार होता . हे अतिशय अभिमानस्पद आहे.

. (प्रस्तुत लेख अनेक संदर्भ ग्रंथ व इंटरनेटवरील उपलब्ध लेखांतील माहितीचे संकलन आहे.  संस्कृत श्लोकांचे मराठी रुपांतर लेखकाने केले आहे. )

……………………………………………………..

अधिक वचनासाठी संदर्भ ग्रंथ :

चार्वाक – इतिहास आणि तत्त्वज्ञान – सदाशिव आठवले (प्राज्ञपाठशाळा – वाई)

‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’ – आ.ह. साळुंखे

भारतीय तत्वज्ञान – श्रीनिवास दीक्षित 

लोकायत – स. रा. गाडगीळ – लोकवाङ्मय गृह

वेध चार्वाकाचा – उदय कुमठेकर – अभय प्रकाशन नांदेड.

चार्वाकमंथन – संपादकः उदय कुमठेकर – परामर्श प्रकाशन, तत्त्वज्ञान विभाग्, पुणे 

चार्वाकवाद आणि अद्वैतवाद – डॉ. प्रदीप गोखले – टिळक महाराष्ट्र विद्यापीठ 

लोकायत (इंग्रजी ) – देविप्रसाद चट्टोपाध्याय – 

सर्वदर्शनसंग्रह – माधवाचार्य – प्र. फोटोझिंको प्रेस पुणे, (शासकीय प्रकाशन)

‘भारतीय जडवाद’  –  राममनोहर लोहिया 

‘जडवाद’ – मानवेन्द्रनाथ रॉय ( अनुवाद : बा.र. सुंठणकर  ) कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे 

‘विचारमंथन – स.रा. गाडगीळ

Previous articleमाध्यमांच्या विश्वासार्हतेची  पातळी धोक्याच्या रेषेपर्यंत… 
Next articleपंछी बनु, उडता फिरू…  
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.