
‘प्यू रिसर्च सेंटर’ने २०२४ सालात दोन संशोधनं प्रसिद्ध केली. त्यातील एका संशोधनात लोकांना आपल्या नेत्याच्या धार्मिकतेविषयी प्रश्न करण्यात आला. त्यात, नेता हा जनतेच्या धार्मिक भावनांची कदर करणारा असावा असं जगभरातील नागरिकांनी मान्य केलं. युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिका खंडातील पस्तीस देशांत हे संशोधन झालं. त्यात भारताचाही समावेश आहे. त्यामध्ये, देशाच्या नेत्याची धार्मिक श्रद्धा आणि नागरिकांची श्रद्धा यांत अंतर असेल तरी चालेल, मात्र तो श्रद्धावान असावा असं म्हणणारे देश तर आहेतच, मात्र जनतेचा धर्म हाच नेत्याचाही धर्म असावा असं म्हणणारे देशही आहेत. या दुसऱ्या प्रकारात भारताचा समावेश होतो. भारतातील ८१ टक्के लोकांचं म्हणणं, आपल्या श्रद्धा असणाराच देशाचा नेता असावा, असं आहे. दुसरं संशोधन धर्माची सार्वजनिक जीवनातील भूमिका विशद करणारं आहे. तो अभ्यास केवळ अमेरिकेपुरता झाला. त्यात सुमारे ५७ टक्के लोकांच्या मतानुसार, सार्वजनिक जीवनातून धर्माच्या भूमिका आक्रसत आहेत असं म्हणणं पडलं. इतकंच नव्हे, तर त्या ५७ टक्के लोकांना त्या आक्रसत झालेल्या जाणिवांचं दु:खदेखील होतं. वेगळ्या शब्दांत, त्या लोकांना सार्वजनिक जीवनातून धर्म वजा होऊ नये असं वाटतं. या दोन्ही संशोधनातून संपूर्ण जग धार्मिक श्रद्धा आणि जाणिवा यांच्या दिशेनं निघालं आहे, असा अंदाज वर्तवता येतो.