-माणिक बालाजी मुंढे
……………….
अमुक एक गोष्ट दाखवली म्हणजेच चॅनल नंबर वन होतं असं काही ठोसपणे सांगता येत नाही. टीव्ही 9 पहिल्यांदा नंबर वन झालं ते जगबुडीच्या दिवसभर बातम्या दाखवल्यानं. पण कायम नंबर वन राहायचं असेल तर राजकीय अजेंड्याशिवाय पर्याय नाही. जगबुडीसारख्या बातम्यांचा स्टेरॉईडसारखा उपयोग होईल, त्यानं थोड्या काळापुरती बॉडी फुगलेलीही दिसेल पण सदृढ शरीर हवं तर मेहनतीला पर्याय नाही. कारण अजूनही तरी आपल्याकडे लोक मनोरंजन म्हणून मराठी चॅनल्सकडे पहात नाहीत. राजकारणाच्या बातम्या मात्र त्यांच्या मनोरंजनाचं साधन आहेत हे खरं. हवं तर गंभीर मनोरंजन म्हणा. एखादा राजकीय पक्ष ज्या कारणांमुळे सत्तेत जातो आणि बाहेर पडतो अगदी तसच काही टीआरपीबद्दल चॅनल्सचं होतं. टीआरपीसाठी कंटेटचं ध्रुवीकरण केलं जातं, खळबळजनक सादरीकरण असतं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोग्रॅमिंगवर किंवा रिपिटवर फारसा भर न देता कायम नवं आणि नव्या घडामोडी तुम्ही रिपोर्ट करत राहिलात, त्याचं विश्लेषण करत गेलात तर चॅनल्सचा टीआरपी चढत जातो. हे ऐकायला जेवढं सोप्पं आहे तेवढं प्रत्यक्षात नाही.