
डेटिंग ॲप्समुळे मित्रमैत्रिणी, सहकारी किंवा ओळखीच्या लोकांच्या द्वारे भावी जोडीदाराला भेटणं याऐवजी आता भावी जोडीदारांच्या भेटी खाजगी, बंदिस्त ठिकाणी किंवा आॉनलाईन होतात. लोकांच्या नजरांना तोंड देत भेटण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर खाजगीपणा जपला जातो या कारणास्तव तरुणाईला डेटिंग अॅप्स आवडतात. एकमेकांचा खाजगीपणा जपत एकमेकांना भेटता येणं हे अनेकांना क्रांतिकारी पाऊल वाटतं. त्यामुळे डेटिंग ॲप्सवर एकमेकांचे “म्युच्युअल फ्रेंडस” जास्त असले तरी प्रत्यक्ष भेटणं टाळलं जातं इतका खाजगीपणा जपला जातो. अर्थात, डेटिंग ॲपवर भेटताना खाजगीपणा जपला जातो हे खरं असलं तरी एखादी व्यक्ती प्रत्यक्षात कशी वागते हे कळू शकत नाही. जोडीदार हा समाजात कसा वावरतो हे आॉनलाईन संवादांवरुन समजणं कठीण होतं.
अर्थात अशा प्रकारे केवळ ॲप्स डिलीट करुन मानसिक आरोग्य लगोलग लाभत नाही. त्यासाठी डेटिंग ॲप्समुळे नक्की कोणत्या मानसिक, शारीरिक समस्या उद्भवत होत्या ते समजून घ्यायला हवं. यासाठी समुपदेशकाची मदत लागली तरी घ्यावी. तुमच्या चिंता घालवायला तुम्ही ही ॲप्स वापरता आणि ही ॲप्स वापरुन चिंता जास्तच वाढवून घेता असं घडतं आहे का ते तपासायला हवं. तुम्हाला तुमच्यावर प्रेम करणारं कोणी भेटणारच नाही का? या तणावातून हुकअप्स शोधत रहाता का? हे पहायला हवं.
सुरक्षिततेच्या दृष्टीनं कायदा आणि कॉर्पोरेट पातळीवर नियम असणं हा एक उपाय आहे. मात्र सांस्कृतिक आणि सामाजिक पातळीवर डेटर्सनी सजगपणे आपलं वागणं बदलायला हवं. आपण केलेल्या छळाचा समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतो इकडे बहुतांशी पुरुष दुर्लक्ष करतात. स्त्रियांना दुय्यम लेखतात. स्त्रियांनीही आपला छळ होत असताना तो सहन करणं चुकीचं आहे. त्याबद्दल आवाज उठवायला हवा. अॅप वापरणं बंद करणं किंवा युजर्सना ब्लॉक करणं एवढंच आत्ता स्त्रियांच्या हातात आहे. असे प्रयत्न चांगले आहेत मात्र अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे.
नोकरी आणि आर्थिक स्थैर्य नाही हे कारण डेटिंग ॲप् वापरताना निराशा देतं. विशीतल्या भारतीयांपैकी तुमच्या नोकरीच्या सध्याच्या अवस्थेवरुन डेट नाकारली गेली असं सातपैकी एका केसमध्ये तरी घडतंच. भारतातला बेरोजगारीचा प्रचंड दर डेटिंगच्या आणि आॉनलाईन डेटिंगच्या मध्ये येतो. चांगली नोकरी न मिळवता आल्यानं नातं पुढे गेलं नाही असंही घडतं. आर्थिक बाबतीत जुळणार नाही या कारणानं ब्रेकअप्स होतात.