‘कीमिया’गिरी: साहिर

(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)

-मिथिला सुभाष

*******

‘साहिर’ म्हणजे जादू! युसूफ़ जमालचा एक शे’र आहे,

मैं साँसों को ज़हर समझ के पीता हूं लेकिन,

कौन है आखिर वो साहिर, जो ज़हर को शहद बनाता है..

हा शेर आपल्या साहिरसाठीच लिहिलाय की काय असं वाटावं, एवढी मोठी शब्दांची कीमिया-जादू तो करत असतो. त्याने अनेकांच्या आयुष्याचे जहर मधात तब्दील केलंय, बदललंय!

साहिर पहिल्यांदा भेटला शाळकरी वयात. राष्ट्रभाषा प्रबोध परीक्षेत त्याची एक नज़्म होती-

मेरी मेहबूब कहीं और मिलाकर मुझसे!

एक शहंशाह ने दौलत का सहारा लेकर

हम गरीबों की मोहब्बत का उडाया है मज़ाक़..!

त्या पंधरा-सोळाच्या वयात एकदम खाडकन तोंडात मारल्यासारखी ही कविता आली. ती इतकी असरदार होती की डोक्यात रोमांसचा जन्म होत असतांनाच, ‘ताजमहाल’ नावाचं रोमांसचं प्रतीक ध्वस्त झालं. ‘तल्खियां’ वाचण्यासाठी वडलांकडे उर्दूचे धडे गिरवायला लागले आणि त्याच सुमारास साहिर पुन्हा एकदा भेटला.

अभी ना जाओ छोडके, के दिल अभी भरा नहीं..

आह.. माझ्या भावविश्वात पुन्हा एकदा बहार आई.. आणि साहिरचं वेडच लागलं.

जादू म्हणजे भ्रम! साहिर एखाद्या भ्रमासारखाच दिलक़श आणि लुभावना होता. ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ किंवा ‘जिन्हें नाज़ है हिन्द पे वो कहां हैं’सारखी आधुनिक उर्दू अदबच्या भाषेत ज्याला ‘तरक्कीपसंद’ कविता म्हणतात, तशी गाणी लिहून तो जमिनीवर आणायचा. पण ‘आज सजन मुझे अंग लगा ले’ किंवा ‘हम आपकी आंखों में’ पण तोच लिहित होता.

पण खरा साहिर हा नव्हेच. या सगळ्याच्या पलीकडे,

‘कभी खुद पे कभी हालात पे रोना आया, बात निकाली तो हर इक बात पे रोना आया’

किंवा

‘गम और ख़ुशी में फ़र्क न महसूस हो जहां, मैं दिल को उस मक़ाम पे लाता चला गया’

लिहिणारा साहिर, खरा साहिर. प्रेम आणि अध्यात्म-रुहानियत, हे दोन जज़बात त्याने कुठल्या कुठे नेऊन ठेवले. तो नेहमीची प्रेमगीतं लिहित होता तेव्हाच,

‘वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन,

उसे एक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा’

लिहित होता. प्रेमभंगाचा याहून जास्त ग्रेसफुल स्वीकार असू शकतो? नाही!

‘ज़ुर्मे उलफ़त पे हमें लोग सज़ा देते हैं’ …

ओह्ह… उफ़्फ़..!! निहायत मासूम कैफ़ियत! मी प्रेम केलं त्याची शिक्षा लोक मला देतायत! तुकडाच पडतो काळजाचा.

साहिरच्या प्रेमाला समंजसपणाची गहराई होती, जी त्याला सुधा मल्होत्राने दिली होती. विरहाचं अस्तर होतं, जे त्याला अमृता प्रीतमकडून मिळालं होतं. या वस्त्राला बेहतरीन संकल्पनांचे किनारे होते, बेशक़ीमती शब्दांच्या बुट्ट्या होत्या, ज्या त्याच्या अफ़लातून ज़हानतने, विलक्षण बुद्धिमत्तेने त्याला दिल्या होत्या. साहिरची गाणी त्याच्या फूलकोमल संकल्पनांमुळे डोळ्यांसमोर जगमगाता कहकशां-झगमगती आकाशगंगा साकार करायची. इश्क़बद्दल साहिरने लिहिलेलं एकच गाणं ऐका.

तेरा इश्क़ है मेरी आरज़ू, तेरा इश्क़ है मेरी आबरू

दिल इश्क़, जिस्म इश्क़ है और जान इश्क़ है

ईमान की जो पूछो तो ईमान इश्क़ है

तेरा इश्क़ मैं कैसे छोड दूँ, मेरी उम्रभर की तलाश है

ये इश्क़ इश्क़ तेरा इश्क़ इश्क़

ये इश्क़ इश्क़ इश्क़ है, इश्क़ इश्क़

पूर्ण क़व्वाली देणं शक्य नाही. पण आणखी चार ओळी दिल्याशिवाय दिल मानता नहीं..

 

नाज-ओ-अंदाज से कहते हैं कि जीना होगा

जहर भी देते हैं तो कहते हैं कि पीना होगा

जब मैं पीता हूं तो कहते हैं कि मरता भी नहीं

जब मैं मरता हूं तो कहते हैं कि जीना होगा

कारण??

ये इश्क़ इश्क़ है इश्क़ इश्क़, ये इश्क़ इश्क़ है इश्क़ इश्क़

वल्लाह..! आफ़रीन..!! मरहबा..!!!

प्रेमाबद्दल याहून जास्त, याहून वेगळं, याहून चांगलं कुणी काय लिहेल राव! सब तो उस जादूगर ने, साहिर ने लिख दिया!!

प्रत्येक कवी, शायरला कधीतरी एखादं सेन्श्युअस, मादक पण पटकन उमगणार नाही असं कोडं घालण्याचा मोह होतो. मजरूहने जसं, ‘आंचल में क्या जी, अजब-सी हलचल’ लिहिलं, शक़ील बदायुनीने तर ‘ढ़ूँढ़ो ढ़ूँढ़ो रे साजना’ हे मधुरात्रीचं साग्रसंगीत वर्णन करणारं पूर्ण गाणंच लिहिलं, तशीच एक अतिशय इंटेन्स लाईन साहिरने चित्रलेखाच्या ‘ए री जाने न दूंगी’ या गाण्यात लिहिलीये. ‘आज सखी पी डालूंगी मैं दर्शनजल की बूंद-बूंद!’ अय्योsss…!!

साहिरची spirituality-रुहानियत किंवा अध्यात्माकडे जाण्याआधी त्यानं लिहिलेल्या आणखी दोन गाण्यांचा ज़िक्र केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. तशी तर त्याची शेकडो गाणी राहून गेलीयेत, जी कुठल्याही उल्लेखाची मोहताज़ नाहीत. पण मला ‘दिल ही तो है’मधे शिरायचंय, म्हणून त्यातली एक ही क़व्वाली!

‘निगाहें मिलाने को जी चाहता है!’

यातली एक शरारत लाजवाब है.

‘किसीके मनाने में लज़्ज़त वो पाई कि फिर रूठ जाने को जी चाहता है!’

मी रुसल्यावर ‘कुणीतरी’ मला अस्सा मस्का मारलाय ना, की मला पुन्हा रुसून बसावंसं वाटतंय! कसली जालीम शोख असेल ही छोरी! याच फिल्ममधलं दुसरं गाणं,

‘तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्क़िल होगी’ हे गाणं म्हणजे, प्रेमातल्या पझेसिव्हनेसचा कळस आहे आहे.

या सिनेमात साहिरने आध्यात्मिक उंची गाठणारं एक गाणं लिहिलंय.

लागा चुनरी में दाग, छुपाऊँ कैसे

चुनरी में दाग, छुपाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे

लागा चुनरी में दाग…

या जगात जगतांना मी खूप चुका केल्या. ‘तिथून’ ‘इथं’ येतांना माझ्या ‘बापानं’ मला जे शिकवलं होतं, जे निरागस पावित्र्य माझ्या ओंजळीत टाकलं होतं, ते सारं मी विसरून गेले. आता जेव्हा पुन्हा ‘तिथं’ जाईन, तेव्हा मी माझ्या त्या ‘बापाशी’ नजर कशी मिळवू?? माझ्या ‘चुनरी’वर चुकांचे डाग लागलेत!

हो गई मैली मोरी चुनरिया

कोरे बदन सी कोरी चुनरिया

जाके बाबुल से नज़रें मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे

लागा चुनरी में दाग…

जितका अस्पर्शित देह मी इथे आणला होता, तेवढीच निर्मळ होती माझी चुनरी. आता त्यावर एवढे डाग पडलेत की, मैं बाबुल से नज़रें मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे?? कशी जाऊ परतून??

याच गाण्यात साहिर पुढे लिहितो,

 

कोरी चुनरिया आत्मा मोरी

मैल है माया जाल

वो दुनिया मोरे बाबुल का घर

ये दुनिया ससुराल

जाके बाबुल से नज़रे मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे

लागा चुनरी में दाग…

काय फोड करू याची?? सपशेल थक्क झालेय. कुठेतरी खोल व्रण असल्याशिवाय कुणीही अशा अजरामर कविता लिहू शकत नाही. ‘कौन रोता है किसी और की खातीर ऐ दोस्त, सबको अपनी ही किसी बात पे रोना आया’ हा साहिरच्या अस्तित्वाचा स्थायीभाव झाला होता. त्याला त्याच्या दुखऱ्या बालपणाची पार्श्वभूमी होती. तो लहान असतांना त्याच्या आईने आपला हक्काचा ‘मेहेर’ – पोटगीही न घेता तलाक़ घेतला. त्यानंतर त्याच्या वडलांनी दुसरं लग्न केलं आणि लहान्या साहिरला मिळवण्यासाठी कोर्टकज्जे केले. त्यात वडलांना यश आलं नाही, साहिरचा ताबा आईकडेच राहिला. पण त्याच्या बालमनावर एक चरचरीत ओरखडा पडला. साहिरने लग्न केलं नाही. त्याच्या मनावर पडलेली जखम त्याच्यासोबत वाढत राहिली.. मृत्युच्या चार वर्षं आधी त्याने लिहिलं,

मुझसे पहले कितने शायर, आए और आकर चले गए,

कुछ आहें भरकर लौट गए, कुछ नग़मे गाकर चले गए

वो भी एक पल का किस्सा थे, मै भी एक पल का किस्सा हूँ

कल तुमसे जुदा हो जाऊँगा, जो आज तुम्हारा हिस्सा हूँ

हिंदी फिल्म इंडस्ट्रीला अनेक बेहतरीन गीतकार लाभले. पण साहिरने एका विशिष्ट तबक़्याला वेड लावलं. त्याला प्रेम मिळालं नाही, बहुतेक म्हणूनच, ‘निखळ प्रेम, त्याची अभिव्यक्ती, ते लपवणं, ते जाहीर करणं, कसं असावं’ हे साहिरला नक्की माहित होतं. ‘प्युअर फॉर्ममधल्या प्रेमाचा आत्मीय स्वीकार कसा करावा, ते मोडलं तर त्याचा सामना कसा करावा, एकतर्फी प्रेम कसं हाताळावं आणि प्रेमभंगाचं दु:ख कसं पचवून मनाशी तळाशी जपून ठेवावं’ हे त्याला माहित होतं. आणि म्हणूनच माझ्या आणि माझ्या नंतरच्या पिढीतल्या अनेकांना आजही असं वाटतं की साहिर समोर बसून सांगतोय,

तुम मुझे देखकर मुस्कुराती रहो,

मैं तुम्हें देखकर गीत गाता रहूँ

*************************

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

Previous articleरामेश्वरम 
Next articleभंडारा अग्नीतांडवात नर्सेसचा बळी…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.