चीन जगाला का जिंकू शकणार नाही?

साभार: साप्ताहिक साधना

– रामचंद्र गुहा

‘मिलिटरी ऑफेन्सिव्ह’ हा शब्दाचा संबंध भारतीय तत्काळ चीनशी जोडतात. १९६२ चे सीमायुद्ध किंवा ज्याला आपण ‘लडाखमधील गलवान खोऱ्यातील आक्रमण’ असे म्हणतो, त्याचा विचार त्यामागे असतो. याउलट ‘चार्म ऑफेन्सिव्ह’ असा शब्द मात्र आपण आपल्या या बलवान कम्युनिस्ट शेजाऱ्याच्या संबंधाने वापरत नाही. त्यामुळेच नुकतेच भारतीय माध्यमांना चिनी विद्वानांनी आणि राजकीय मुत्सद्यांनी दिलेल्या मुलाखतींना आलेला ऊत पाहणे आश्चर्यकारक होते. एका ज्येष्ठ चिनी विद्वानाने ‘द हिंदू’शी बोलताना असा दावा केला की, त्यांच्या देशाने कोरोना विषाणूच्या या महामारीला पाश्चिमात्त्य देशांहून अधिक चांगल्या प्रकारे हाताळले आहे. ४० हून अधिक देशांना चीनने विविध प्रकारची वैद्यकीय मदत पुरवली आहे, असा दावाही त्यांनी केला. त्यानंतर असे ठामपणे प्रतिपादन केले की, चीनविषयी नकारात्मक दृष्टी बाळगणाऱ्या देशांपेक्षा सकारात्मक दृष्टी बाळगणाऱ्या देशांची यादी बरीच मोठी आहे.
(https://www.thehindu.com/…/a-world-with…/article31568704.ece)

यादरम्यान भारतातील चीनचे राजदूत स्वतःच्या देशाच्या बाजूने शक्य तितके चांगले प्रदर्शन करण्यासाठी एका भारतीय दूरचित्रवाणी वाहिनीवर जाऊन पोहोचले. भारताला साह्य पुरवण्यासाठी व मदतीचा हात देण्यासाठी चीन तयार आहे, असे ते म्हणाले. या साथीवर भारताने लवकरात लवकर विजय मिळवावा, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. ते पुढे म्हणाले की, चीनमधील वैद्यकीय सामग्री भारताला खरेदी करता यावी, यासाठी आम्ही मार्ग खुला केला आहे.

( http://in.china-embassy.org/eng/embassyšnews/t1779228.htm)

वैद्यकीय क्षेत्रामध्ये साह्य म्हणून विशिष्ट मदत देऊ करून ‘हिंदी चिनी भाई भाई’ या आता बऱ्याच अंशी विस्मृतीत गेलेल्या बंधाला हे राजदूत आवाहन करताना दिसले. १९६२ च्या युद्धापूर्वी तो प्रचलित आहे असे मानले जात होते. त्यामुळेच ते म्हणाले की, चीन व भारतादरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला याच वर्षी ७० वर्षे पूर्ण होत आहेत. आपण केवळ शेजारीच नाही तर चांगले मित्र आणि सहयोगीही आहोत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे, दोन प्रगतीशील देश म्हणून चीन आणि भारताने परस्पर सहकार्याने या साथीविरोधातील लढ्यात विजयी झाले पाहिजेत.

दरम्यान, चिनी प्रस्थापित व्यवस्थेने अमेरिकेच्या प्रस्थापित व्यवस्थेशी अशीच ओघवती बोलणी सुरू केली आहेत. एका उच्चपदस्थ चिनी राजकीय व्यक्तीने ‘द वॉलस्ट्रीट जर्नल’मध्ये संकुचिततावादी प्रजासत्ताकाची पाठराखण करत असा दावा केला की, पश्चिमेकडील माध्यमांमध्ये अनाठायी त्यांच्या देशाची राक्षसी प्रतिमा झालेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाशी कसे लढावे याबाबतीत चीन हा आदर्श आहे. त्यांनी असेही नोंदवले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेने ज्या देशांना तडाखा दिला त्यामध्ये चीनने ‘पुस्तक बंद ठेवून’ परीक्षा दिली. व त्याच्या उंचावणाऱ्या निकालांनी चीनपाठोपाठ इतर देशांनी ‘पुस्तक उघडे ठेवून’ दिलेल्या परीक्षांमध्ये त्यांचे निर्णय घेण्यासाठी माहिती पुरवली. वुहानमधील लोकांची त्यांनी प्रशंसा केली. त्यांच्या मते, वुहानमधील लोक हे ‘जबाबदारपणा, आत्मत्याग आणि ऐक्याचे उत्कृष्ट उदाहरण’ होते; त्यामुळेच साथीशी परिणामकारक रीत्या लढण्यासाठी त्याने जगाला प्रेरित केले. ‘स्वतःचे मॉडेल आणि यंत्रणा निर्यात करण्याचा चीनचा कधीही उद्देश नव्हता’, पुढे ते लिहितात, ‘कोरोनाविरोधात जीव वाचवण्याच्या या लढाईतील चीनची कार्यक्षमता, चैतन्यभावना व जबाबदारीची जाणीव हे सर्व स्वाभाविक होते.’
(https://www.wsj.com/…/china-wants-tohelp-the-world-fight-co…)

चीनची या राष्ट्राच्या बाजूने केली गेलेली ही प्रसिद्धी मोहीम नेहमीपेक्षा वेगळी आहे. काहीशी अस्वस्थता आणि अपराधीपणाची भावनादेखील त्यातून सूचित होत आहे. काही स्वतंत्रपणे केले गेलेले अहवाल असे दर्शवतात की, चीनची राज्यव्यवस्था बाकी काहीही असले तरी, ही साथ हाताळण्याच्या बाबतीत जबाबदार, खुली आणि पारदर्शक होती. खरे तर ज्या जंगली प्राण्यांच्या मांस-बाजारातून ही साथ उद्‌भवली ते बाजार उघडावेत, यासाठी त्यांना जंगली प्राण्यांची तस्करी पुन्हा सुरू करू देणे, हेच मोठे बेजबाबदारपणाचे गुन्हेगारी कृत्य होते. त्यानंतर ही साथ सर्वत्र पसरली तेव्हा चीनने स्वतःच्याच डॉक्टरांना शिक्षा केली होती, ज्या डॉक्टरांनी धोक्याची सूचना आधीच दिली होती आणि चीनने इतर जगापासून ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट काही आठवडे लपवून ठेवली.

चीनमधील राजकीय व्यक्ती व विद्वानांचे असे बाहेर येणे हेच दाखवते की, या साथीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्यांच्या देशाच्या सामाजिक स्थानावर परिणाम होऊ शकतो, याविषयी ते चिंतीत आहेत. गेली काही दशके चिनी प्रस्थापित व्यवस्थेने जागतिक व्यवहारांतील स्वतःचे वाढते महत्त्व गृहीत धरले होते. संरक्षणाबाबतीतील प्रगती व तंत्रज्ञानातील कार्यक्षमता याबरोबरीने चीनने साधलेली नेत्रदीपक आर्थिक प्रगती यांनी राजकीय नेतृत्वाला आत्मविश्वासाची वाढती जाणीव दिली आहे. स्वतःच्या संस्कृतीच्या पुरातन असण्याविषयीचा अभिमान हा नेहमीच चिनी मूल्यांच्या मध्यवर्ती राहिला आहे. आता आर्थिक समृद्धी व लष्करी कौशल्य यांना जोडणाऱ्या बंधाने ‘जगाला कह्यात ठेवण्याचा व आकार देण्याचा’ विश्वास त्यांच्या स्पष्ट विधिलिखितामध्ये बळकट केला आहे.

जागतिक महानतेच्या या अपेक्षेचे स्वतः चिनी नसलेल्या अनेक लेखकांनीही समर्थन केले आहे. मोठ्या प्रमाणावर असे घोषित केले गेले की, एकोणिसाव्या शतकाने ग्रेट ब्रिटनला जागतिक महासत्तेच्या रूपात पाहिले; विसाव्या शतकाने त्याच भूमिकेत अमेरिकेला अनुभवले, तसे आता एकाविसाव्या शतकात ही जबाबदारी चीनकडे (पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना) हस्तांतरित होईल. सध्याच्या या साथीच्याही बरेच आधीपासून मी या दाव्यांविषयी साशंक होतो. पृथ्वीवरील सर्वाधिक प्रभावशाली राष्ट्र म्हणून चीन सहजासहजी अमेरिका व ग्रेट ब्रिटन यांच्यावर मात करेल असे मला वाटत नव्हते. याचे कारण असे की, सर्व प्रकारची आर्थिक प्रगती व लष्करी ताकद लक्षात घेऊनही चिनी संस्कृती ही चीनबाहेर तितकीशी आकर्षक नव्हती, जितकी ब्रिटिश संस्कृती एके काळी ब्रिटनबाहेर होती किंवा अमेरिकन संस्कृती अमेरिकेबाहेर अजूनही आहे.

हार्वर्डमधील विद्वान जोसेफ नाय यांच्या शब्दांत सांगायचे तर, जागतिक व्यवहारांवर वर्चस्व राखू शकणारी ‘हार्ड पॉवर’ चीन असेलही; पण त्यासाठीची ‘सॉफ्ट पॉवर’ चीनपाशी नाही. एकोणिसाव्या शतकात जेव्हा ब्रिटनने जगावर जय मिळवला तेव्हा त्यांनी स्वतःसोबत शेक्सपियर, डिकन्स यांचे साहित्य त्याचप्रमाणे क्रिकेट, टेनिस, फुटबॉल व इतरही बरेच काही आणले. विसाव्या शतकात जेव्हा अमेरिकेने जगावर ताबा मिळवला तेव्हा त्यांनी स्वतःसह हॉलिवुड, जॅझ, निळी जीन्स, त्याचप्रमाणे फॉकनर व हेमिंग्वे (इतरही अनेकांसह) यांच्या कादंबऱ्या आणल्या.

जगातील महानतम संस्कृतींपैकी एक असण्याची अभिमानस्पद बाब चीनजवळही नक्कीच आहे. मात्र ज्या व्यक्तीने कम्युनिस्ट चीन घडवला, त्या माओ झेडाँगने इतिहासातील कला, स्थापत्य आणि साहित्य रानटीपणे नाकारले. त्यांचे पुसटसे अवशेषही संपूर्णत: पुसून टाकण्याचा प्रयत्न त्याने केला. या बाबतीत तो त्याच्या दुसऱ्या (सोव्हिएत) टोकाहून पूर्णपणे वेगळा होता. त्यांनी स्वतःचा श्रीमंत रशियन वारसा सांस्कृतिक निर्यातीच्या स्वतःच्या डावपेचाचा भाग बनवण्याचा सक्रिय प्रयत्न केला. १९५० आणि १९६० मध्ये जेव्हा जागतिक प्रभावस्थानासाठी सोव्हिएत युनियनने अमेरिकेशी निकराची झुंज दिली, तेव्हा त्यांनी त्यांच्या वतीने महान रशियन संगीतकार आणि कम्युनिस्टपूर्व काळातील महान रशियन कादंबरीकार यांना आमंत्रण दिले.

ब्रिटिश, अमेरिकन आणि रशियनांनी जेव्हा आशिया आणि आफ्रिकेत आपली राजकीय पदचिन्हे वाढवण्याचे ठरवले, तेव्हा त्यांच्या आर्थिक व लष्करी सामर्थ्यांच्या संबंधाने त्यांची भेट भीती आणि असुरक्षिततेशी झाली. परंतु त्यांच्याकडे असणाऱ्या आकर्षक सांस्कृतिक उत्पादनांमुळे त्यांची भेट ममत्वाच्या आणि प्रेमाच्या भावनेशीही झाली. त्यांचे खेळ, त्यांची पुस्तके, त्यांचे संगीत आणि त्यांचे चित्रपट या सगळ्या गोष्टींनी इतर देशातील व्यक्तींना त्यांच्या प्रभावक्षेत्रात खेचले. मागील महासत्तांनी अर्पण केलेले जे विशाल सांस्कृतिक देणे आहे, त्याच्याशी तुलना करता चीनकडे जगाला देण्यासारखे जे काही आहे. ते म्हणजे त्यांच्या पाककृती- आणि हे त्यांच्या वर्चस्ववादी व धाकदपटशाहीच्या मार्गांशी जुळवून घेण्यासाठी नक्कीच पुरेसे नाही. दुसरीकडे, ब्रिटन आणि अमेरिकेचा जागतिक प्रभाव टिकून राहिला, याचे कारण त्यांचे राजकीय वर्चस्व हे सांस्कृतिक धुरीणत्वासह होते. व्हिएतनाम आणि इराक येथील अमेरिकन धोरणांना विरोध करतानाही आम्ही जीन्स घालत होतो, कोका-कोला पीत होतो, रॉक संगीत ऐकत होतो, आणि क्लाईन इस्टरवुड व मेरियल स्ट्रीपचे चित्रपट पाहत होतो. अमेरिकेच्या संस्कृतीतील सौंदर्य आणि वैविध्य यांचा गौरव करतानाच अमेरिकन राज्यव्यवस्थेचा तिरस्कार आम्ही करू शकतो.

तुलनात्मक दृष्ट्या, सातासमुद्रापार हृदये आणि मने जिंकण्यासाठीच्या त्यांच्या स्वतःच्या शोधामध्ये, ‘सॉफ्ट पॉवरची’ असणारी तौलनिक उणीव चीनला गंभीररीत्या नुकसानीची ठरणार आहे. कोरोना-१९ विषयी कुणाला माहिती असण्याच्या पूर्वींही हे ठीक होते आणि ही साथ उलटल्यानंतरही ते तसेच असणार आहे. चिनी जरी आपल्या सीमानजीकच्या भागांत सध्या गोंधळ माजवत नसले, तरीही ‘कसे वागावे व राष्ट्र कसे चालवावे’ या बाबतीत चीनकडे आदर्श म्हणून पाहावे, हे भारतीयांना यत्किंचितही पसंत पडणार नाही; अगदी आशियाच्या व आफ्रिकेच्या इतर भागांतील लोकांनाही. चिनी कदाचित अजून भरभराटीला येतील आणि सामर्थ्यवान होतील, मात्र तरीही चीन इतर देशांमध्ये स्वतःच्या मित्रांची व प्रशंसकांची रांग कधीच उभी करू शकणार नाही, जशी ती चीनचा महान प्रतिस्पर्धी असणाऱ्या अमेरिकेकडे आहे, आणि असणार आहे.

(मराठी अनुवाद : सुहास पाटील)

Previous articleआमराया: आता उरल्या आठवणी !
Next articleस्थलांतरितांबाबतच्या गैरसमजांना छेद देणारे प्रकरण
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.