जनसंवादाचे ‘मोदी-ठाकरे’ मॉडेल !


अतुल विडूळकर

माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आताच्या काळात सर्वात समंजस, matured, संयत राज्यप्रमुख वाटतात. त्यांच्या बोलण्यात गांभीर्य, दिलासा आहे. म्हणून जनतेला ते आश्वासक वाटतात. खरतर कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला इतकं मोठं संकट फेस करणारे पहिलेच सीएम असावे ते. वाटत नाही की या नेत्याला विधिमंडळ कामकाज, प्रशासन आणि राज्यकारभाराचा केवळ 3 महिन्यांचा अनुभव आहे. हे असं वाटण्यामागे जसं त्यांचं सहज वागणं आहे, तसच आहे त्यांचं Communication Model.

कोरोनाचं संकट कोसळल्यापासून मुख्यमंत्री जवळपास रोज जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांचं बोलणं अगदी छापील, आखीव, काटेकोर चतुसीमा असल्यासारखं नाही. अलीकडच्या काळातील मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीच्या संवाद शैलीच्या, प्रोटोकॉलच्या थोडं वेगळं त्यांचं स्किल आहे, जे या संकटकाळात जनतेला आश्वासक वाटतंय.

राजकीय नेते म्हणून आणि राज्यप्रमुख म्हणून बदलत गेलेल्या communication model वर थोडीशी नजर टाकूया.

‘British Raj’ मधल्या Political Ruling Attitude’ च्या प्रभावातून काँग्रेस नेते कधी बाहेर निघाले नाही. लोकनेते म्हणून नेहरुजी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचं communication model सामान्य जनतेला जवळचं वाटत होतं, हे जरी खरं असलं तरीही पंतप्रधान किंवा राज्यप्रमुख म्हणून, त्या पदावरून बोलताना त्यांचं communication model वेगळं असायचं. किंवा सर्वोच्च पदावरील व्यक्तीने कसं बोलायचं याचा प्रोटोकॉल ते follow करत असावे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात उच्चवर्गीय टिपिकल शालीनता दिसायची. काँग्रेसप्रमुख सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी ‘रोड शो’चा मार्ग अवलंबला आणि ते थेट जनतेत जायचे. At least पब्लिकच्या अगदी जवळ असायचे. राज्यकर्ता म्हणून त्यांच्या वागण्याचं विश्लेषण अर्थातच करता येणार नाही.

काँग्रेस नेते राज्यकर्ते म्हणून यशस्वी ठरले असले तरी आणि त्यांचं त्या पदावरचं अस्तित्व जनतेला आश्वासक वाटत असलं तरीही त्यांचं communication model अर्थात भाषा, शैली जनतेला आपली वाटण्याची शक्यता कमीच होती.

हाच प्रोटोकॉल पंतप्रधानपदावर असताना डॉ मनमोहन सिंग यांनी पाळला. किंबहुना, त्यांचं Non Political background, विद्वत्ता आणि अर्थातच वय यामुळे यामुळे तो प्रोटोकॉल स्वाभाविकपणे त्यांच्यात उतरला.

ज्यांना पंतप्रधान म्हणून संधी मिळाली त्या काँग्रेसेतर नेत्यांनी सुद्धा हा प्रोटोकॉल तोडण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून पंतप्रधान आणि सामान्य माणूस यांच्या व्यक्तिमत्वात एक अनामिक, UnIdentified, typical पण अनिवार्य अंतर सर्वांनी जपलं. किंवा ते प्रयत्नपूर्वक जपायचं नसतं, इतकं ते स्वाभाविक झालं होतं.

त्यामुळे, त्यांचं त्या पदावरील अस्तित्व कितीही आश्वासक असलं तरीही पंतप्रधान पदावरील व्यक्ती ही सामान्य लोकांना आपल्यातली वाटणं शक्य नव्हतं. याला नेहरू-इंदिराजी अपवाद असल्या तरीही ते जनतेला ‘आपले’ वाटायचे, ‘आपल्यातले’ नाही.

ही परिस्थिती बदलवली ती विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. टिपिकल ‘British Raj ‘ मधले सारे प्रोटोकॉल त्यांनी मोडून काढले. प्रचारसभेतले भाषणं सोडा, पण पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानंतर संसदेच्या पायरीवर डोकं टेकवणं असो की भाजप संसदीय मंडळाच्या सभेतलं त्यांचं रडणं असो….अभ्यासक आणि विरोधकांना ते कितीही Symbolic (Even नाटकी) वाटत असलं तरीही सामान्य माणसाला ते प्रातिनिधिक वाटलं. कारण पंतप्रधान पदावरील व्यक्ती रडू शकते, हे निदान आपल्या देशातल्या माणसाने तरी बघितलं नव्हतं.
(त्या पूर्वी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ ऐकताना पंडित नेहरुजी रडले होते, हे ऐकत आमचं बालपण गेलं. प्रॅक्टिकल घडवलं ते मोदींनी.)

त्यांनतर नरेंद्र मोदींचं प्रत्येक वागणं (हातात झाडू घेऊन साफसफाई वगैरे) हे असंच प्रातिनिधिक होतं. चायवाला असो की गरीब माँ का लडका… हे सारं नरेंद्र मोदी यांच्या नवीन communication model चा भाग होता, यावर तेव्हा कुणाचं लक्ष गेलं नाही. भाजप आयटी सेलने सुशिक्षित वर्गात, नव्या आर्थिक अभिजन मंडळीमध्ये भक्त निर्माण करण्याआधी नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेला आपलं भक्त करून टाकलं होतं. या प्रभावातून जनता बाहेर येणं हे सहजी सोपं नाही.

नरेंद्र मोदी यांचं सामान्य असणं हे जनतेसाठी महत्वाचं आहे. म्हणून ते A square + B square म्हणाले, गणपतीची प्लास्टिक सर्जरी म्हणाले, नाल्यातून गॅस निघतो म्हणाले, ओबामाला बराक म्हणाले, ट्रम्पला ‘डोलांड’ म्हणाले तरीही सामान्य माणसाला त्यात वावगं काही वाटत नाही. त्यांच्यासाठी ते क्षम्य असतं. त्यांच्या बाबतीत सामान्य माणूस judgmental होत नाही, कारण ते त्यांच्यातील वाटतात.

अगदी काल 8 वाजता मोदींनी देशात 21 दिवस ‘लॉक डाऊन’ घोषणा केली. 21 दिवस घरात बसायचे आहे आणि कोरोना हा किती मोठा धोका आहे हे convince करण्यापलीकडे त्यांच्या भाषणात दुसरं काही नव्हतं. त्यामुळे जनतेचं कन्फ्युजन वाढलं. महाराष्ट्र आधीच लॉक डाऊन असताना लोकांनी पॅनिक व्हायची गरज नव्हती. पण जनतेच्या कुटुंबातील सदस्य होण्याच्या नादात मोदी इतर ठोस बाबीवर बोलले नाहीत. आणि लोक सैरभैर झाले. तरीपण विरोधक आणि सोशल मीडियावरील काही जण याव्यतिरिक्त सामान्य माणसाला त्यात काही वावगं वाटलं नाही. वाटलं असलं तरीही त्याच्या दृष्टीने ते क्षम्य आहे.

म्हणून त्यांनी लोकांना झाडू हातात घ्या म्हटले, की लोक झाडू हातात घेतात. आजपर्यंत कोणत्या पंतप्रधानाने असं म्हटलं होतं? घरातली भांडी वाजवायला सांगितली तरीही ते वाजवतात, कारण कोणत्याच पीएम ने ताट-वाटी-चमचा वाजवायला सांगितलेलंच नव्हतं. Assignment का जमाना है बॉस. सब चलता है. यामधून जनतेला राष्ट्रकार्य केल्याचा फील येतो. असा फिल देणं हे मोदींच्या communication model चा भाग असतो. मोदी म्हणजे ‘तुम मुझे भूल जाओ, ये मै होने नही दुगा’ या तत्वाने चालणारी व्यक्ती आहे. ते कायम प्रचारकी भूमिकेत असतात, याचं कारणच हे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवादाच्या प्रचलित प्रोटोकॉलच्या बाहेर पडले आहेत, हे इथे लक्षात घ्यायला पाहिजे. ते त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं नसेल कदाचित, तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग देखील असेल… पण मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीच्या वागण्याबोलण्यातला बदल जनतेने नोटीस केलाय.

काल आणि आज सीएम बोलताना म्हणाले, ‘तुम्हाला वाटत असेल की हा आला पुन्हा, आता काय बंद करतो’…. यापूर्वी असं कुणी बोललेलं निदान माझ्या पिढीला तरी आठवत नाही. पदाची झुल, त्यासोबत येणारं ग्लॅमर, हवाहवासा वाटणारा ‘लोखंडवाला कॉम्प्लेक्स सिंड्रोम’ हे सारं नाकारण्यासाठी जिगर पाहिजे, ते उद्धव ठाकरे यांनी दाखवलं. खरतर जॅकेट न घालणारा मुख्यमंत्रीच आपण बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रात पाहिला असेल.

राज्यकर्त्यांचे कपडे, राहणीमान यातही मेसेज असतो. जिथं मेसेज असतो, तिथे communication असतं. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे याबाबतीत Trend setter ठरले आहेत. खरतर mass communication च्या विद्यार्थ्यांनी यावर Dissertation करायला पाहिजे, इतका चांगला हा विषय आहे. या दोन्ही नेत्याचं वेगळेपण हे त्यांच्या वागण्या-बोलण्यात आहे. मोदींच्या चाहत्यांना कदाचित आवडणार नाही, पण आश्वासक बोलण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींपेक्षा पुढे गेले आहेत.

:- अतुल विडूळकर

.

(लेखक ‘मीडिया वॉच’ चे उपसंपादक आहेत)

+91 84088 58561

:-

Previous articleवो नहीं मेरा, मगर उससे मुहब्बत है तो है…!
Next articleकाय सांगशील ज्ञानदा?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.