साहित्य, कला, संगीतातल्या बहुतांशी प्रतिभावंतांना या प्रांतांच्या स्पर्शाचा नित्य अनुभव येत असतो. किंबहुना या प्रांताच्या स्पर्शानीच व्यक्तिमत्त्वात प्रतिभा येते असंही मला वाटतं. काही प्रतिभावंतांना तर या प्रदेशात नित्य वावरही शक्य होतो. आणि असं वावरतांना बरसलेल्या तेजोलहरींनी निथळतच मग ते लौकिक जीवनात परत येतात. कवी ग्रेस त्यांच्यावरच्या दुर्बोधतेच्या आरोपांना उत्तर देतांना ‘वास्तवच दुर्बोध आहे त्याला मी काय करू?’ असं म्हणत असत. या उत्तरात त्यांना याच प्रांतातली दुर्बोधता अभिप्रेत असावी.