बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण सर्वच ओळखतो. मात्र त्यांना ही संधी देण्यात महात्मा गांधींचे योगदान आहे, हे फार कमीच लोकांना माहित आहे. घटना समिती किंवा संविधान सभा याबद्दल आपले विचार मांडताना ती सर्व समावेशक असावी, त्यात सर्व पक्षांचे, विचारांचे प्रतिनिधी असावेत, असा आदेश गांधींनी दिला होता. प्रांतिक (राज्य) विधिमंडळातून सध्या जसे प्रतिनिधी राज्य विधानसभेवर निवडून पाठवले जातात तसे तेव्हाच्या राज्य विधिमंडळामधून घटना समितीवर प्रतिनिधी पाठवायचे ठरले. १९४५ मध्ये झालेल्या अखंड भारतातील प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत एकूण १५८५ जागांपैकी ९२५ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. घटना समितीच्या एकूण जागांची संख्या ३८९ निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी २९६ प्रतिनिधी राज्य विधिमंडळांनी निवडून द्यावयाचे होते तर ९३ जागा संस्थानी प्रजेच्या प्रतिनिधींसाठी ठेवण्यात आला होता. जुलै १९४६ मध्ये झालेल्या घटना समितीच्या निवडणुकीत २१२ सर्वसाधारण जागांपैकी २०३ जागा काँग्रेसने जिंकल्या. त्यानुसार काँग्रेसशी संबंधित नसलेले बुद्धीवंत, विचारवंत, कायदेपंडित एवढेच नव्हे तर काँग्रेसचे विरोधक असलेले नेतेही काँग्रेसने घटना समितीवर निवडून पाठवले होते. काँग्रेसचे विरोधक असलेल्या जस्टीस पार्टीचे श्वेतचलपतिराव व हिंदू महासभेचे डा. शामाप्रसाद मुखर्जी हे नेते सुद्धा काँग्रेसने पाठिंबा देऊन घटना समितीवर पाठवले होते. तत्कालिन शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे नेते डा. बाबासाहेब आंबेडकर यांना मात्र असे सहकार्य काँग्रेसकडून पहिलयांदा लाभले नाही. कदाचित त्या काळात काँग्रेस आणि आंबेडकर यांच्यात असलेल्या कटुतेमुळे हे झालेले असावे. तत्कालिन मुंबई ( आजची महाराष्ट्र) विधानसभेतून घटना समितीवर निवडून येण्या इतपत संख्याबळ नसल्याने आंबेडकरांना बंगाल राज्याच्या विधिमंडळातून घटना समितीत प्रवेश मिळवावा लागला. मात्र फाळणी झाल्यानंतर त्यांचे भारतीय घटना समितीतील सदस्यत्व संपुष्टात आले. मात्र या काळात त्यांनी घटना समितीचे सदस्य म्हणून केलेले कार्य, त्यांची भाषणे यामुळे काँग्रेस आणि त्यांच्यातील दुरावा कमी झाला होता. स्वतः महात्मा गांधींनाही आंबेडकर आणि आपल्या विचारात अनेक विषयावर समानता असल्याचे जाणवले. गांधी वा काँग्रेस आणि आंबेडकर यांचे कार्य परस्परपूरक असल्याचे आणि देशाशी संबंधित महत्वाच्या विषयांवर तीव्र स्वरूपाचे कोणतेही मतभेद त्यांच्यात नसल्याचे या तीनही घटकांना तो पर्यंत पटले होते. काँग्रेस म्हणजे जळते घर आहे, अशी जळजळीत टीका करणारे बाबासाहेबही काँग्रेस पक्षाशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेत पोहोचले होते.