मोहन ते महात्मा @ १२५ वर्षे

-हरीश केंची
“सव्वाशे वर्षांपूर्वीच्या या साऱ्या घटनांतून मोहन… मोहनदासचं … महात्मा बनण्याची प्रक्रिया होण्यास प्रारंभ झाला होता. त्यामुळंच अनेक वर्षांनी आफ्रिकेतील गांधीवादी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांनी म्हटलं होतं, ‘तुम्ही आम्हाला मोहनदास दिले होते, आम्ही त्यांना महात्मा बनवून परत दिलंय!’ त्यांचं हे म्हणणं बऱ्याच अंशी खरं होतं.
आफ्रिकेत रंगभेद, वर्णभेद नीती आणि हिंदी भाषकांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात यश मिळवल्यानंतर गांधीजींनी नवा संघर्ष हिंदुस्तानात सुरू करायचा होता. त्यासाठी गांधीजी आफ्रिकेतून १९१५ च्या सुमारास परतले. भारतात यश मिळालं, त्याचा पाया त्यांनी आफ्रिकेत घातला होता. त्याची दिशा त्यांना आफ्रिकेत सांपडली होती. त्याचा आरंभ बरोबर १२५… सव्वाशे वर्षांपूर्वी पोरबंदर ते डरबन प्रवासादरम्यान जाणता-अजाणता झाला होता. हे मात्र खरे! वकील मोहनदास केवळ दादा अब्दुल्लाह यांच्या खासगी व्यापारी पेढीचा खटला लढण्यासाठी आफ्रिकेत गेले होते. पुढे पुढे अशी परिस्थिती निर्माण झाली की, आफ्रिकेतील सगळ्या भारतीयांच्या पिढीची केस लढवून ते महात्मा बनले!”
——————————————–
सव्वाशे वर्षांपूर्वी १८९३ च्या २४ एप्रिलला जहाजात पाय ठेवून मोहनदासनं दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासाला प्रारंभ केला, तेव्हा वकील असलेल्या मोहनला फक्त आपला वकिली व्यवसाय सेट करायचा होता. प्रापंचिक जबाबदारी पार पाडायची होती. परंतु तिथल्या २१ वर्षाच्या आपल्या वास्तव्यात एकापाठोपाठ एक अशा काही घटना घडत गेल्या की, बॅरिस्टर मोहनला महात्मा होण्याला भाग पडलं. सव्वाशे वर्षांनंतर त्या सगळ्या घटनांचा मागोवा घेताना महात्मा होण्याच्या त्या घटना ज्या भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत पोहोचलाय…! १८९१ मध्ये लंडनहून बॅरिस्टर होऊन परतलेल्या मिस्टर मोहनकडे डिग्री तर होती पण मनाजोगतं काम मिळत नव्हतं. लग्नानंतर सांसारिक जबाबदारीही येऊन पडली होती. या दरम्यान मोहन राजकोट-मुंबई अशा फेऱ्या मारत होता. पण हाती फारसं काही लागत नव्हतं. या दरम्यान मूळचे पोरबंदरचे पण दक्षिण आफ्रिकेत व्यापार करणारे दादा अब्दुल्लाह यांच्या खटल्याची, वकील म्हणून केस चालविण्याची ऑफर आली. मोहननं ते स्वीकारलं. लंडनहून परतल्यावर दोनच वर्षात पुन्हा हिंद महासागर ओलांडून दक्षिण आफ्रिकाकडे जाण्याची तयारी त्यानं आरंभली. दादा अब्दुल्लाह या अशिलाशी झालेल्या बोलण्यानुसार वकिलाला अशिलाकडून १०५ पौंड फी शिवाय येण्याजाण्याचं प्रथम वर्गाचं स्टीमरचं तिकीट मिळणार होतं. पण स्टीमरचं आरक्षण फुल झालं होतं. त्या दिवशी मोझांम्बिकचे गव्हर्नरसुद्धा त्या स्टीमरमधून प्रवास करत होते. बॅरिस्टर मोहननं आपल्या गोड बोलण्यानं त्यांच्या केबिनमधून प्रवास करण्यासाठी जागा मिळवली. १८९३ च्या २४ एप्रिल रोजी हे जहाज दक्षिण आफ्रिकेकडे निघाले. आणि पाठोपाठ त्याअर्थाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचं मार्गक्रमण सुरू झालं. दक्षिण आफ्रिकेच्या या प्रवासात जागोजागी थांबा होता. इंधन आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी जहाजात चढविण्यासाठी झांझिबार इथला थांबा खूपच मोठा होता. प्रवासादरम्यान जहाजाच्या कप्तानाशी मोहनची चांगलीच गट्टी जमली होती. त्यानं २४ वर्षाच्या तरुण मोहनला वेश्यागमन करण्यासाठी सोबत नेण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पण मोहननं त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतरच्या मोठ्या प्रवासानंतर दक्षिण आफ्रिकेतील नाताल प्रांतातल्या डरबन बंदरात मोहन उतरला. दादा अब्दुल्लाह हे मोहनला घेण्यासाठी बंदरावर आले होते. इथूनच तिथल्या मोहनच्या संघर्षाला प्रारंभ झाला.
फेटा उतरवावा की नको?
बंगाली घाटाचा फेटा बांधलेल्या मोहनला प्रश्न पडला की, हा फेटा तसाच राहू द्यावा की, तो उतरवून टोपी परिधान करावी? बोडकं डोकं राखणं हे तसं त्यावेळी अपमानजनक समजलं जात असे. फेटा उतरवला तर स्वतःची इज्जत उतरवली असं समजलं जाई. मग मोहननं फेटा परिधान करण्याचा निर्णय घेतला. फेट्याबाबत स्थानिक लोकांमध्ये चर्चा अर्थात कुजबूजीने लोक बोलू लागले. मोहननं स्थानिक वृत्तपत्रात या फेट्याबाबत लेख लिहून त्याचं समर्थन केलं होतं. त्याची कारणमीमांसाही स्पष्ट केली होती. अशाप्रकारे आफ्रिकेत आल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मोहनच्या वैचारिक संघर्षाला प्रारंभ झाला होता. त्याकाळी दक्षिण आफ्रिकेवर ब्रिटिशांशिवाय नेदरलँड – डच यांचंही शासन होतं. नाताल म्हणजे जिथं डरबन बंदर आणि शहर होतं तो भाग ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. जवळचं असलेल्या प्रिटोरिया शहरात केस लढण्यासाठी मोहनला जायचं होतं. प्रिटोरिया ट्रान्सवाल प्रांतात होतं तो प्रांत डच लोकांच्या ताब्यात होता.
डब्यातून बाहेर काढलंत, मी देशातून हुसकून लावीन
डरबन बंदरात उतरल्यानंतर तिथं थोडी विश्रांती घेऊन मोहन प्रिटोरियाला जाण्यासाठी निघाला. दोन तासांच्या प्रवासानंतर पिटरमेरितझरबर्ग स्टेशन आलं. संध्याकाळ झाली होती. थेट अंटार्तिकातून हिंदी महासागरात पाण्याबरोबरच येणाऱ्या थंड वाऱ्याने संपूर्ण देश गारठलेला होता. तिकीट कलेक्टरांच्या प्रमुखाने मोहनला प्रथमवर्गाचं तिकीट असतानाही तिसऱ्या वर्गाच्या डब्यात जायला फर्मावलं,  मोहनने ते ऐकलं नाही, म्हणून मोहनला डब्यातून उतरविण्यात आलं. आजही छोटंसं असलेलं ते स्टेशन त्याकाळी तर तिथं अजिबात वर्दळ नसायची. अशा वातावरणात कडाक्याच्या थंडीत मोहनला रात्र काढावी लागली. रात्रभर एकटे राहिलेल्या मोहनच्या डोक्यात विचारानं थैमान घातलं होतं. या विचारांपैकी एक विचार असाही असावा की, ‘इंग्रजांनो, तुम्ही मला डब्यातून बाहेर काढलंत, आता मी तुम्हाला माझ्या देशातून हुसकावून लावीन!’
 ट्रेन नंतर घोडागाडीतही अपमान!
दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्रेनमधून प्रवास करून मोहन पुढचं स्टेशन चार्ल्सटाऊनला पोहोचला, ते ट्रेनचं शेवटचं स्टेशन होतं. या पुढचा प्रवास घोडागाडीनं करायचा होता. घोडागाडीचा चालक हा गोरा होता, त्यानं मोहनला आंत घेतलं नाही. शेवटी रिक्षात ज्याप्रमाणे आपल्या इथं लोक लटकून जातात तसं मोहनला तिथं लटकत प्रवास करावा लागला. ट्रेननंतर चोवीस तासात दुसऱ्यांदा रंगभेदाचा, वर्णवादाचा अनुभव मोहनला आला.
 घोडगाडीनंतर हॉटेलमध्येही अपमान
मोहन जोहान्सबर्ग पोहोचला तेव्हा संध्याकाळ झाली होती. रात्रीच्या मुक्कामासाठी इथल्या ख्यातनाम ‘हॉटेल ग्रँड नॅशनल’ हॉटेलच्या रिसेप्शनजवळ मोहन पोचला, तिथंही रिसेप्शनिस्टनं सांगितलं की, इथं केवळ गोऱ्यांना जागा दिली जाते. हे हॉटेल गोऱ्यांसाठीच आहे. तुम्हाला इथं जागा नाही.इथंही मोहनचा अपमान झाला.
 हॉटेल नंतर पुन्हा ट्रेनमध्ये अपमान
प्रिटोरिया जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी प्रथम वर्गाचं तिकीट घेऊन मोहन ट्रेनमध्ये बसला. तिकीट चेकर ट्रेनमध्ये आल्यानंतर त्यानं मोहनकडे तुच्छतेने कटाक्ष टाकला. ‘गोऱ्या प्रवाशांमध्ये तुम्ही इथं शोभत नाही, थर्ड क्लासमध्ये निघून जा, भले तुमचं पहिल्यावर्गाचं तिकीट असो!’ असं त्यानं म्हटलं. तिथं पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण मोहन बरोबर प्रवास करणाऱ्या इतर गोऱ्या प्रवाशांनी चेकरला सांगितलं की, हा प्रवासी आमच्यासोबत या डब्यातून प्रवास करतोय, याबाबत आमचा काहीही आक्षेप नाही! तर तुम्ही का आक्षेप घेता?  त्यानंतर हे प्रकरण शांत झालं.
मायदेशी परततांना वेगळं वळण
१८९४ मध्ये त्या केसचा निकाल मोहनच्याबाजूनं लागला. मोहनचं आफ्रिकेला ज्या उद्देशानं येणं झालं होतं तो उद्देश आता पूर्ण झाला होता. ठरविल्याप्रमाणे मोहनला स्टीमर पकडून मायदेशी परतायचं होतं. पण या परतण्याचावेळी एक वेगळं वळण समोर उभं राहीलं. मोहनला निरोप देण्यासाठी काही मित्र, सहकारी जमले होते. त्यांच्यापैकी एकानं मोहनच्या हातात स्थानिक वर्तमानपत्र ‘डरबन मर्क्युरी’ चा अंक दिला. त्यात एक विस्तृत लेख होता. त्यात म्हटलं होतं, इथं राहणाऱ्या हिंदी भाषकांना जे काही थोडेफार अधिकार देण्यात आलेले आहेत तेही अधिकार काढून घेण्याबाबत आणि त्यातले काही गोठविण्याबाबत इथलं सरकार कायदा करणार आहे. मोहनला निरोप देण्यासाठी जमलेल्यांनी सरकारच्या या निर्णयाविरुद्ध लढा द्यावा अशी चर्चा सुरू केली. त्याचं नेतृत्व मोहन यानेच करावं असा आग्रह त्यांनी धरला. या आग्रहामुळे मोहनदास गांधी तिथं थांबायला तयार झाले. हजारो लोकांच्या सह्या असलेलं निवेदन लॉर्ड रिपन यांच्याकडं मोहनदासच्या माध्यमातून पाठविण्यात आलं.
तुमच्याशिवाय आमचं कोण?
लॉर्ड रिपन यांना निवेदन पाठविल्यानंतर मोहनदासला परतायचं होतं, पण स्थानिक हिंदी लोकांनी त्यांना तिथंच थांबण्यासाठी आग्रह धरला. ‘तुम्ही आहात म्हणून आमच्यात लढण्याची हिंमत आली, तुम्हीच म्हणता ना कोणतीही समस्या असली तरी ती मुळापासून उखडून टाकायला हवी, मग आपण जाण्याची घाई का करताहात? जरा थांबा अन हा प्रश्न मार्गी लावा! ‘दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा इतिहास’ यांत गांधीजींनी लिहिलं आहे की, त्या आग्रहानंतर मी तिथं राहायला तयार झालो. हे काम सार्वजनिक असल्यानं त्यासाठी फी वा पैसे कसे घेणार? त्यामुळं मी पैसे घेण्यास नकार दिला. पण इथल्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपल्या साऱ्या केसेस माझ्याकडं सोपविण्याचं त्यांनी नक्की केलं. इथल्या सगळ्याचं हितरक्षण आणि ब्रिटिशांविरुद्ध कायमस्वरूपी लढा देण्यासाठी जून १८९४ मध्ये ‘नाताल इंडियन काँग्रेस’ ची स्थापना करण्यात आली. आपलं गांव पोरबंदर पासून बारा-पंधरा हजार किलोमीटर दूर दक्षिण आफ्रिकेत अर्थाजनासाठी आलेला वकील मोहनच्या जीवनात परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू झाला होता.
 इकडं देशात पत्नी मुलं प्रतीक्षेत!
इकडं पत्नी कस्तुरबा आणि मुलं मोहनदासची डोळ्यात प्राण आणून वाट पहात होती. एक वर्षात काम संपवून परत येईन असं सांगून गेले होते. पण दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी ते परतले नाहीत. १८९६ मध्ये सहा महिन्यासाठी भारतात आले पण भारतात सहा महिने पूर्ण होण्याआधीच दक्षिण आफ्रिकेतून टेलिग्राम आला, ‘ताबडतोब परत या!’ यावेळी तिकडं जाताना एकटे जाण्याऐवजी त्यांनी पत्नी कस्तुरबा आणि हरीलाल मणिलाल या आपल्या मुलांना त्यांनी बरोबर घेतलं. गांव पोरबंदर ते जिल्ह्याचं ठिकाण राजकोट असा कधीतरी प्रवास केलेल्या कस्तुबांना थेट दक्षिण गोलार्धात आलेल्या दुसऱ्या खंडातल्या देशात जाण्यासाठी निघाल्या होत्या.
 दक्षिण आफ्रिकेत पाऊल टाकताच
भारतातील आपल्या वास्तव्यात मोहनदास जिथं जिथं गेले तिथं तिथं त्यांनी दक्षिण आफ्रिकेत सध्या काय चाललंय याचा प्रचार केला. वर्तमानपत्रातून लेख लिहून दक्षिण आफ्रिकेत हिंदी भाषकांची हालत किती वाईट आहे. याची चर्चा घडवून आणली. भारतात असलेल्या इंग्रज सरकारनं याची नोंद घेऊन नाताल प्रांतात टेलिग्राम करून मोहनदासनं इथं भारतात निर्माण केलेल्या वातावरणाची माहिती दिली! त्यामुळं तिथलं सरकार आणि गोरी प्रजा यांनी मोहनदासच्या ‘स्वागताची’ जय्यत तयारी आरंभली होती. ‘क्रूरलँड’ या स्टीमरमधून गांधी परिवार आफ्रिकेच्या किनारी लागले. इथल्या रागावलेल्या इंग्रज-गोऱ्या तरुणांना समजलं की मिस्टर गांधी येताहेत. या स्टीमर बरोबरच भारतीय प्रवाशांना घेऊन आणखी एक ‘नादीर’ नामक स्टीमर सुद्धा किनारी लागली होती. तेव्हा आफ्रिकेत असा प्रचार झाला होता की, भारतातून येणारे चळवळ करणारे वकील मोहनदास येताना आपल्यासोबत आठशे माणसाचा काफ़िला घेऊन येतोय! जणू आफ्रिकेवर चढाई करण्यासाठीच येताहेत असं वातावरण निर्माण इथं झालं होतं.
नाताल राज्यात प्रवेशबंदी
१८९६ च्या १९ डिसेंबरला डरबन बंदराला या स्टीमर पोहोचल्या. त्यावेळी तिथल्या सरकारनं असा आदेश दिला गेला होता की, इथं कोणत्याही भारतीय माणसाला जमिनीवर पाय ठेवू देऊ नका. कारण त्यावेळी भारतात साथीच्या रोगानं उच्छाद मांडला होता. या स्टीमरबरोबरच मिस्टर गांधी आणि भारतातल्या साथीचे रोगदेखील नाताल प्रांतात प्रवेश करताहेत अशी बातमी पसरवली गेली होती. २३ दिवस त्या स्टीमर बंदरातच रोखून ठेवल्या होत्या.शेवटी स्टीमरचे मालक असलेल्या दादा अब्दुल्लाहच्या दबावाखाली सरकारनं भारतीयांना डरबनच्या भूमीवर पाय ठेवण्यास परवानगी दिली.
 मिस्टर गांधींशिवाय इतर सर्वांचं स्वागत
त्यावेळी तिथल्या गोऱ्या इंग्रज तरूणांनी असा निश्चय केला होता की, भारतीय प्रवासी आले तर चालतील पण मिस्टर गांधीला या भूमीवर पाऊल ठेवू देणार नाही. पण त्यांनी येण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या तंगड्या तोडल्या जातील. अशी धमकी दिली गेली होती. अशा वातावरणात मोहनदासला सल्ला दिला गेला की, अंधार पडल्यानंतर त्यांनी जहाजातून बाहेर पडावं. त्यानुसार मोहनदासनं आपल्या कुटुंबियांना मित्र जिवाजी रुस्तमजी यांच्या घरी जायला सांगितलं. कस्तुरबासाठी तर हे मोठं धर्मसंकट उभं राहिलं होतं. अनोळखी प्रदेश, बोलली जाणारी अजाण भाषा, वेगळ्या धर्माचं पालन करणारी माणसं अशा ठिकाणी आपल्या पतीला एकटे सोडून दोन लहान मुलांना घेऊन जायचं होतं.
पुन्हा एकदा अपमान
डरबनच्या गोऱ्या तरुणांनी मोहनदासला विरोध करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्यांना असं समजलं होतं की, मोहनदास अद्यापि जहाजातून उतरलाच नाही. म्हणून ती मंडळी बंदरावर फेऱ्या मारत होती. कस्तुरबा आणि मुलांना घेऊन घोडागाडी पुढं निघाली पाठोपाठ मोहनदास चालत निघाला. रस्त्यावर वाहतूक फारशी नव्हती. त्यामुळं फेटा बांधलेल्या भारतीय माणसाला लोकांनी ओळखलं आणि गांधी…..गांधी….अशी आरडाओरडा करायला सुरुवात केली. मोहनदासला पकडलं आणि मारहाण करायला सुरुवात केली. कुणी फेटा ओढला, कुणी कपडे फाडले,सगळा गोंधळ सुरू असतानाच तिथून डरबनच्या पोलीस सुपरिटेंड अलेक्झांडर यांची पत्नी जात होत्या त्या मध्ये पडल्या, त्यांनी त्या मारहाण करणाऱ्या तरुणांना दम भरला, धमकावलं. वातावरण शांत झालं पण रंगभेदाचा, वर्णद्वेषाचा पुन्हा एकदा जबरदस्त अनुभव मोहनदासला मिळाला. या परिस्थितीतून सही सलामतरीत्या आपला पारशी मित्र रुस्तमजींच्या घरी पोचले. तिथंही गोऱ्या तरुणांचा एक गट पोहोचला होता, रुस्तमजीनं चर्चा करण्याच्या बहाण्याने त्यांना रोखून धरलं होतं. वेषांतर करून मोहनदासला मागच्या दरवाज्यातून पोलिसांचा वेष घालून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचविले. तिथं पोलीस सुपरिटेंड उपस्थित होते. त्यांनी तरुणांच्या गटाला समजावून रुस्तमजींच्या घरापासून दूर पांगवलं. हळूहळू वातावरण शांत झालं.
युद्धाच्या काळात कुणासोबत?
काही दशकापासून आफ्रिकेत राहणाऱ्या नेदरलँड आणि बुअर म्हणून ओळखले जाणारे लोक आणि ब्रिटिश यांच्यात वाद सुरू झाला. जोहान्सबर्गवर कब्जा मिळविण्याचा छुपी योजना इंग्रजांनी आखली होती. हे लक्षांत येताच बुअरांनी त्याचा प्रतिकार केला. यांच्यातली लढाई तीन वर्षे सुरू होती. यात जखमी झालेल्यांसाठी मोहनदासने ‘इंडियन अम्बुलन्स कोअर’ नामक स्वयंसेवकांची तुकडी उभी केली. लष्करी जवानांप्रमाणे कोट-पॅन्ट आणि विशेष टोपी परिधान करून या स्वयंसेवकांनी मोहनदास बरोबर सेवा केली. युद्ध संपुष्टात आल्यानंतर गांधीजींच्या लक्षांत आलं की आपण जे अपेक्षिलं होतं तशाप्रकारचा अपेक्षित बदल इंग्रजांमध्ये झालेला नाही. अस्वस्थ मोहनदास मग या साऱ्या समस्या तशाच टाकून १९०१मध्यें भारतात परतला. पण थोड्या दिवसानंतर टेलिग्राम आला ‘आपण ताबडतोब निघून या, इथली परिस्थिती गंभीर बनलीय!’
आणखी एक अपमान स्वागताला होतं!
एक वेगळ्या प्रकारचा अपमान, तिसऱ्यांदा आफ्रिकेत येणाऱ्या मोहनदासच्या स्वागतासाठी वाट पहात तिष्ठत होतं. इंग्रजांनी ट्रान्सवाल प्रांतात हिंदी भाषकांना प्रवेश करण्यास बंदी घातली होती, याशिवाय अधिक कडक कायदे त्यासाठी त्यांनी तयार केले. जे लोक तिथं राहतात त्यांना परवाना आवश्यक केला होता. इंग्रज अंमलदार त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा घरात घुसून त्याची तपासणी करू शकेल, असा फतवा काढला गेला होता. याचा अर्थ इंग्रज लोक अत्याचार करण्यासाठी आणखी खालच्या स्तरावर जाऊ लागलेत याची जाणीव मोहनदासला झाली. यांच्याविरोधात त्यांनी यहूदींच्या एका नाट्यगृहात सभेचं आयोजन केलं आणि त्याविरोधात एल्गार केला.
 ‘सत्याग्रहा’ चा शब्द इथं जन्मला!
आज सर्वत्र प्रचलित झालेल्या ‘सत्याग्रह’ हा शब्द पहिल्यांदा आफ्रिकेत सप्टेंबर १९०६मध्ये वापरला गेला. ट्रान्सवालमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. मोहनदासने त्यात कोणत्याही प्रकारची हिंसा करायची नाही, सत्याचा आग्रह धरत लढाई लढायची, अशाप्रकारच्या प्रतिज्ञा सर्वांना घ्यायला लावल्या. तो संघर्ष ‘सत्याग्रह’ म्हणून ओळखला गेला. या सत्याग्रहाच्या दरम्यान मोहनदासनं आपली भूमिका मांडण्यासाठी ‘इंडियन ओपिनियन’ या नावाचं नियतकालिक देखील सुरू केलं होतं.
अखेर सत्याचाच विजय झाला
हा संघर्ष खूप दिवस चालला. इंग्रजांना इथं अखेर माघार घ्यावी लागली. आफ्रिकेत भारतीय लोकांच्या विरोधात काढलेला काळा कायदा जवळपास रद्द केला गेला तर काही कायदे नरमाईत पडले. दोन दशकानंतर मोहनदासला आपल्या जीवनकार्याचं सूत्र सापडलं. त्यासाठी त्यांना अनेकदा कारागृहाच्या वाऱ्या कराव्या लागल्या होत्या. अनेक प्रकारच्या शिक्षा भोगाव्या लागल्या होत्या. कारागृहात असताना त्यांना टोपी घालण्याची सक्ती करण्यात आली होती. ‘संकटातून संधी’ या न्यायाने मोहनदासनं ती टोपी आपल्या डोक्यावर कायम ठेवली. त्यानंतर त्या टोपीला ‘गांधी टोपी’ म्हणून लोक ओळखू लागले. इंग्रजांना आणि इतरांना हे आश्चर्य वाटत होतं की, या छोट्या उंचीच्या, अशक्त अशा माणसामागे लोक कसे जातात? त्यांच्या सभेला हजेरी कसे लावतात? कारागृहात जाण्यासाठीही तयार कसे होतात? अशा निश्चयी आणि निर्धारी लोकांसमोर झुकण्यावाचून सरकारकडे कोणताच पर्याय उरला नव्हता. मारामारी, हिंसक लढाई यानं भरलेल्या इतिहासात हा संघर्ष अत्यंत अनोखा आणि वेगळ्या प्रकारचा होता. इंग्रज आधी आफ्रिकेत आणि नंतर भारतात मोहनदासला ओळखू शकले नाहीत. अखेर त्यांना मोहनदासप्रती शरण जाण्याव्यतिरिक्त कोणताच मार्ग राहिला नाही. आफ्रिकेतील या संघर्षाला जे यश मिळालं, त्यानं इथं भारतात असलेल्या व्हाईसरॉयला याची भीती आणि चिंता वाटू लागली. त्यानं इंग्लडच्या राजराणीला तसं कळवलं. त्यात त्यानं आफ्रिकेतल्या भारतीयांवर होत असलेल्या अन्यायाबाबत तिथल्या इंग्रज शासकावर टीकाही केली होती.
मोहन ते महात्मा…!
या साऱ्या घटनांतून मोहन… मोहनदासचं … महात्मा बनण्याची प्रक्रिया होण्यास प्रारंभ झाला होता. त्यामुळंच अनेक वर्षांनी आफ्रिकेतील गांधीवादी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांनी म्हटलं होतं, ‘तुम्ही आम्हाला मोहनदास दिले होते, आम्ही त्यांना महात्मा बनवून परत दिलंय!’ त्यांचं हे म्हणणं बऱ्याच अंशी खरं होतं. आफ्रिकेत रंगभेद वर्णवाद, नीती आणि हिंदी भाषकांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात यश मिळवल्यानंतर गांधीजींना नवा संघर्ष हिंदुस्तानात सुरू करायचा होता. त्यासाठी गांधीजी आफ्रिकेतून १९१५ च्या सुमारास परतले. भारतात यश मिळालं, त्याचा पाया त्यांनी आफ्रिकेत घातला होता. त्याचा आरंभ बरोबर १२५… सव्वाशे वर्षांपूर्वी पोरबंदर ते डरबन प्रवासादरम्यान जाणता-अजाणता झाला होता. हे मात्र खरे! वकील मोहनदास केवळ दादा अब्दुल्लाह यांच्या खासगी व्यापारी पेढीचा खटला लढण्यासाठी आफ्रिकेत गेले होते. पुढे पुढे अशी परिस्थिती निर्माण झाली की, आफ्रिकेतील सगळ्या भारतीयांच्या पिढीची केस लढवून ते महात्मा बनले!
गांधीजींनी तुरुंगवास भोगला!
 ‘एशियाटिक कायदा सुधारणा’ या नव्या कायद्याप्रमाणे सगळ्या हिंदी भाषकांना रजिस्ट्रेशन करून त्याचं सर्टिफिकेट स्वतःजवळ ठेवणं बंधनकारक होतं. या कायदा करण्यामागे तिथं राहत असलेल्या भारतीयांना आणि चिनींना तिथून हुसकून लावण्याचं षडयंत्र होतं. ब्रिटिशांनी जिथं जिथं आपली वसाहत केली तिथं तिथं तिथल्या जनतेला गुलाम बनविण्याचा सतत प्रयत्न केला होता. त्यासाठीच गांधीजी आणि हिंदी भाषक विरोध करीत होते. सर्टिफिकेट पाठोपाठ अनेक अनिष्ट कायदे त्या पाठोपाठ येणार होत्या. बापू नातालप्रांतातून कस्तुरबांची प्रकृती तपासून परतत असताना वोलक्रस्ट स्टेशनवर अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे सर्टिफिकेट मागितलं, त्यांच्याकडे ते नव्हतं म्हणून गांधीजींना सजा झाली. ३ महिन्याची कैद किंवा ३० पौंड रकमेचा दंड! कधीच दंड न भरणाऱ्या गांधीजींनी तुरुंगवास पत्करला.
एका खासगी पेढीची केस लढविण्यास गेलेले मोहनदास गांधी आफ्रिकेतील एका अख्ख्या पिढीची केस लढवून महात्मा गांधी बनले!
गांधीजींचं दक्षिण आफ्रिकेत कुठे काय आहे!
१८९३ ते १९१४ दरम्यानचा काळ गांधीजींनी आफ्रिकेत घालवला. भारतात त्यांनी जी काही आंदोलनं केलीत, त्याचा प्रारंभिक प्रयोग गांधीजींनी आपल्या वास्तव्यात आफ्रिकेच्या भूमीवर केला होता. देशात ठिकठिकाणी जी आश्रमे साकारली त्या आश्रमजीवनाची सुरुवातही त्यांनी इथूनच केली होती!
फिनिक्स आश्रम : जिथून अहिंसक आंदोलनाची ज्योत पेटली
गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत डरबन जवळ १९०४ मध्ये फिनिक्स आश्रम स्थापन केला. आफ्रिकेतील आंदोलनात हा आश्रम त्याचं मुख्य केंद्र होतं. इथूनच लंडनमधून उच्चशिक्षण घेऊन परतलेल्या गांधीजींनी सुख, सोयी, सुविधा या सर्वांचा त्याग करून साधं जीवन जगण्याचा निर्धार याच आश्रमात केला. आपल्या आगामी जीवनात गांधीजींनी ज्या सिद्धांताचा, वैचारिक बैठकीचा आरंभ केला तो ही याच आश्रमात. फिनिक्स आश्रम हा एक सामूहिक जीवनाचा प्रयोग होता. ज्यात समाजातल्या सर्व थरातील लोकांना समान समजलं जाई.
आपल्या गरजा कमी असतील, साधं जीवनाबरोबरच  समाजोपयोगी विचार आणि प्रवृत्ती बनावी हाच या आश्रमाचा मूळ हेतू होता. आश्रम त्याकाळात सामाजिक जागृती, शेतीचा विकास, परिश्रमानं परिवर्तन यासारख्या अनोख्या उपक्रमांनी आश्रम ओळखलं जाई. रंगभेद आणि वर्णवाद विरोधातलं आंदोलन गांधीजींनी इथूनच तीव्र केलं होतं.
इथूनच गांधीजींना श्रीमद भगवदगीताचा असलेला परिचय अधिक दृढ बनला. या आश्रमात राहात असताना गांधीजी भगवदगीताचं पठण करीत अशी नोंद इथं आढळतं. एवढंच नाही तर त्यांनी ती मुखोदगत केली होती. याच आश्रमात आपल्या काही जिवलग ख्रिस्ती मित्रांबरोबर त्याचं वाचन करीत आणि अर्थ समजावून सांगत. भगवदगीताचा प्रभाव त्यांच्यावर खूपच होता. दिवसभर त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न ते करत.
हा आश्रम १९८५ मध्ये आफ्रिकेत घडलेल्या अंतर्गत वादामुळे हिंसक घटनांच्या भक्ष्यस्थानी पडला होता. त्यानंतर २००० मध्ये त्याची दुरुस्ती केली गेली ते जसं होतं अगदी तसंच ते पुन्हा नव्याने निर्माण केलं गेलं. आणि त्याची स्मृती जागृत केली.
टॉलस्टॉय आश्रम : साधेपणा आणि आपलेपणाचं केंद्र
गांधीजींनी १९१० मध्ये जोहान्सबर्गपासून ३० किलोमीटर अंतरावर ११०० एकर जमिनीवर विशाल असा दुसरा आश्रम स्थापन केला. गांधीजींवर थोर विचारवंत टॉलस्टॉय यांचा खूप मोठा प्रभाव होता. त्यांच्या विचारांचा आणि लेखनाचा प्रभाव असल्यानेच आश्रमाचं नाव त्यांनी ‘टॉलस्टॉय फार्म’ असं ठेवलं. या टॉलस्टॉय आश्रमात सत्याग्रह करणारे आंदोलनकारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना आश्रय मिळत असे. या आश्रमाची जागा गांधीजींना हरमन केलनबोक यांनी भेट म्हणून दिली होती.
गांधीजींनी टॉलस्टॉय आश्रम साधेपणा आणि भाईचारा याचं एक स्थान बनवलं. मिळूनमिसळून, साधेपणाने आणि शांततेने समाजातील सर्व थरातील लोक उच्च नीच हा भेदभाव विसरून राहू शकतील. हे गांधीजींनी टॉलस्टॉय आश्रमाच्या माध्यमातून जगाला दाखवून दिलं. असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
आफ्रिकेतल्या वर्णभेदाच्या लढ्याला इथूनच बळ मिळालं. सत्याग्रहींना सत्याग्रहाच्या प्रती अतूट श्रद्धा हे इथलं वैशिष्ठय होतं. कालांतराने या आश्रमाची अवस्था खुपच वाईट बनली. इथं चोरीच्या घटना देखील घडल्या. आश्रमात संग्रहालय उभं करण्यासाठी जुळवाजुळव सुरू होती तेही उध्वस्त झालं. १९७० नंतर तर आश्रमाची अवस्था खूपच खराब झाली. १९८० दरम्यान तर दुरुस्तीच्या अभावी इमारतही ढासळू लागली. अखेर भारतातील उद्योगपतींच्या मदतीनं गेल्यावर्षी याच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आणि त्याला पूर्वीचं रंगरूप पुन्हा प्राप्त झालं,नवं रूप लाभलं. गांधीजी त्याकाळी खेळामध्येही रस दाखवीत. टॉलस्टॉय फार्ममध्ये गांधीजींनी फुटबॉल क्लबची स्थापना केली होती. हे त्यांच्या क्रीडाप्रेमाचं उत्तम उदाहरण!
 १८९३ : प्रथम आफ्रिका प्रवास
आज आफ्रिकेशी दृढ नातं असतानाही तिथं जाण्यासाठी थेट फ्लाईट्स नाहीत. त्यामुळं व्हाया दिल्ली-मुंबई-दुबई असा प्रवास आजही करावा लागतोय. तेव्हा सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काळात थेट स्टीमर-जहाज कुठून असणार? म्हणून मोहनदास पोरबंदरहुन राजकोट, तिथून मुंबई आणि मुंबईनंतर स्टीमरमधून प्रवास करीत घाटाघाटाचं पाणी पीत….डरबन पोहोचले होते. तो प्रवासही एक महिनाभर चालला होता.
१ – २४ एप्रिलला मुंबईहून रवाना झाले.
२ – ७ मे रोजी लामू बंदरावर पोहीचले.
३ – तिथून मोम्बासा पोहोचले.
४ – मोम्बासाहून झांझीबार
५ – झांझिबार मध्ये आठवडाभर रोखलं होतं.
६ – मोंझाबिकमध्ये त्यांनी अल्पसा आराम केला.
८ – २४ मे रोजी म्हणजे बरोबर एक महिन्यानंतर नाताळच्या राज्याच्या डरबन शहरात पोहीचले.
आफ्रिकेत गांधीजींना भेटलेले तीन विदेशी मित्र
दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यात ओळख झालेल्या तिघा विदेशींची पुढे गांधीजींशी गाढ मैत्री झाली. त्यापैकी एक होते हरमन केलनबाक, ज्यांनी गांधीजींना टॉलस्टॉय आश्रम बांधण्यासाठी मोठी जमीन दिली होती. हरमन धनवान आर्किटेक्ट होते आणि दक्षिण आफ्रिकेतील मोठमोठाले इमारती ते बनवीत होते. मूळ जर्मनीचे असलेले हरमन यांचा गांधीजींशी परिचय झाला, त्यांना  गांधीजींच्या वर्णभेदाच्या विरोधातील लढ्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते गांधीजींचे प्रशंसक आणि मित्र बनले. गांधीजींचे समवयस्क असलेले हरमन केलनबाक दक्षिण आफ्रिकेत असलेल्या गांधींचा घनिष्ठ मित्रांपैकी एक होते.गांधीजी भारतात परतल्यानंतर ते एकदा भारतात येऊन गांधीजींना  भेटून गेले होते. १९३८ पर्यंत या दोघांमध्ये पत्रव्यवहार होत होता, १९४५ मध्ये हरमन यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला.
दुसरा घनिष्ठ मित्र होता हेनरी पोलाक आणि त्यांची पत्नी मिली. पोलाक यांचं लग्न मिलीशी करण्यात गांधीजींनी मध्यस्तीची महत्वाची भूमिका बजावली होती. गांधीजींच्या वकिली व्यवसायाच्या कार्यालयात पोलाक काम करीत होते नंतर ते मित्र बनले. व्यवसायाने वकील असलेल्या पोलाक यांचा १९४१ पर्यंत गांधीजींशी पत्रव्यवहार सुरू होता. गांधीजी भारतात आल्यानंतर पोलाक ब्रिटनला निघून गेले. तिथं ते भारतातील संस्थानिकांचे खटले चालवीत असत.
गांधीजींच्या तिसऱ्या विदेशी मित्राचं म्हणजे मैत्रिणीचं नांव आहे, लेडी सोन्झा स्लेझिन. या गांधीजींच्या टॉलस्टॉय आश्रमात टायपिस्ट होत्या. प्रारंभीच्या काळात आठवड्यातून दोनतीन वेळाच कार्यालयात यावं लागत होतं. सत्याग्रहाच्या आंदोलनाने प्रभावित होऊन स्नेझिल या गांधीजींशी जोडल्या गेल्या.
गांधीजींच्या आफ्रिकेतल्या वास्तव्यात या तिघा मित्रांची त्यांना खूपच मदत झाली होती. गांधीजी भारतात परतल्यानंतरही या तिघांशी संपर्क राखून होते.
एटर्नि मोहनदास, हेनरी पोलाक आणि सोन्झा हे तिघेही या छायाचित्रात दिसत आहेत. सोबत मागे उभे असलेले गांधीजींचे दोन स्थानिक साथीदारही दिसताहेत. जोहान्सबर्ग मध्ये गांधीजींचे वकिली व्यवसायाचं कार्यालय होतं. तिथं १९०२ मधील हे छायाचित्र. या कार्यालयाच्या जागी आता बहुमजली इमारत उभी राहिलीय. त्यामुळं त्याच्या खुणा आता तिथं दिसत नाही.
*तुम्ही बनवलेल्या सँडल्स वापरण्याची माझी लायकी नाही!*
सध्याच्या वातावरणात आपण आपल्या मतांशी कायम असतो, दुसऱ्यांच्या मताशी, विचाराशी सहसा सहमत होत नाही. किंबहुना त्याची अवहेलना करण्यातच आपण धन्यता मानतो. पण त्याकाळात असं काही नव्हतं. गांधीजींचे विरोधकही त्यांना मान देत, त्यांच्या विचारांना मानत. असाच एक विरोधक होता जनरल समट्स.
जनरल जेन समट्स सोबत गांधीजींचा संबंध खूपच चढ उताराचे होते. त्याकाळात आफ्रिकेत ब्रिटिश लष्करी अधिकारी समट्स गांधीजींची आंदोलने विफल करण्यासाठी प्रयत्नशील असत. ते असणं देखील स्वाभाविकही होतं. पण त्याविरोधात गांधीजींनीही सत्याग्रहाच्या विचारधारेशी अनुरूप आंदोलन सुरू केलं होतं. त्यामुळं प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षपणे जनरल समट्स त्यानं प्रभावित झाले होते. राजकीय संबंधांच्या या तणावातही एक दुसऱ्याचा सन्मान त्यांनी राखला होता.
एका आंदोलनादरम्यान जनरल समट्स यांनी गांधीजींना कारागृहात धाडलं. तिथं एक कैदी जोडे बनविण्याची कला जाणत होता. गांधीजींनी त्याच्याशी ओळख करून घेतली आणि जोडे बनविण्याचे शिक्षण घेतलं. गांधीजींनी जनरल समट्स साठी एक सँडल बनवलं. १९१४ मध्ये भारतात परतत असताना गांधीजींनी तो सँडल जनरल समट्स यांना भेट म्हणून दिला.
जनरल स्मट्स यांनाही गांधींजींबाबत आदर होता, त्यांनी ते सँडल एक मौल्यवान भेट म्हणून आयुष्यभर सांभाळून ठेवलं होतं. आज ते सँडल प्रिटोरियातील आफ्रिकन  नॅशनल म्युझियममध्ये ठेवण्यात आलेलं आहे. एकदा गांधीजींच्या जन्मदिवशी जनरल स्मट्स यांनी एक खास पत्र लिहून शुभेच्छा पाठविल्या होत्या. त्यात म्हटलं होतं, ‘तुम्ही दिलेले सँडल मी प्राणपणाने जपून ठेवले आहेत. आपल्या हाताने तयार केलेले ते सँडल्स मी पायात घालुन वापरावं एवढ्या योग्यतेचा मी नाही. मी तुमच्या विनम्रतेला आणि अहिंसेला वंदन करतो. मला नेहमीच तुमच्याबद्धल आदर वाटत आलाय कारण आपण कायमच मानवतेला प्राधान्य दिलं आहे!’
शताब्दीची नाणी
१९९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सरकारनं गांधीजींच्या आगमनाच्या शताब्दीनिमित्त खास नाणी प्रकाशित केली होती. ३२.५ मिलिमीटर व्यासाचं १५.६ ग्राम वजन असलेलं चांदीचं नाणं होतं. या नाण्याच्या एकाबाजूला गांधीजी आणि दुसऱ्या बाजूला पिटरमेरिट्झबर्ग स्टेशनचं चित्र रेखाटलेलं होत.
केसिनोत गांधीजी!
जेव्हा लक्षांत आलं की, सभा संमेलनं याचा फार प्रभाव इंग्रजांवर पडणार नाही. म्हणून नंतर जोहान्सबर्गच्या एम्पायर थिएटरमध्ये जाहीर सभा गांधीजींनी आयोजित केली. सभेचं आयोजन ११ सप्टेंबर १९०६ रोजी करण्यात आलं होतं. त्याची पत्रके वाटण्यात आली होती, पोस्टर्स ठिकठिकाणी चिकटविण्यात आली होती. त्यापैकी एक मोठंस पोस्टर जोहान्सबर्गच्या गोल्ड रिफ सिटी कॅसिनोच्या भिंतीवर लावण्यात आलं होतं. कॅसिनोसारखं ठिकाण गांधीजींसाठी योग्य नाही. पण या पोस्टरवर लिहिण्यात आलं होतं की, एशियाटिक कायद्याच्या विरोधात जाहिरसभा ठेवण्यात आली आहे. एटर्नि मिस्टर एम.के.गांधी सभेत प्रमुख वक्ते आहेत! यानं खूप मोठा परिणाम साधला
गांधीजींना ‘अन टू धिस लास्ट’ पुस्तकाचा परिचय कुणी केला?
१९०४ च्या मार्चमध्ये मोहनदास जोहान्सबर्ग मधून नातालप्रांतात जात होते. ट्रेन निघण्याच्या तयारीत होती तेवढ्यात पोलाक यांनी गांधीजींच्या हातात एक पुस्तक दिलं आणि सांगितलं, ‘हे पुस्तक वाचा, तुम्हाला नक्कीच आवडेल.’ ट्रेन निघाली आणि गांधीजींनी पुस्तक वाचायला सुरुवात केली, त्यांतल्या विचारांनी त्यांना अस्वस्थ केलं त्यामुळं ते पुस्तक खाली ठेवूच शकले नाहीत. नाताल प्रांतात पोहोचेपर्यंत संपूर्ण पुस्तक वाचून काढलं. पुस्तकाचा खूप परिणाम गांधीजींवर झाला, रात्रभर ते झोपू शकले नाहीत. या पुस्तकात जे तीन विचार सांगण्यात आले होते त्यानं ते विचारात पडले. याबाबत गांधीजींनीच लिहिलं होतं. ‘पुस्तक वाचल्यानंतर माझी झोप उडाली, पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याचा निर्धार केला. मी या पुस्तकातून तीन मुख्य सिद्धांत अशा रीतीने समजू शकलो होतो. ‘सर्वांचं भलं झालं तर त्यात आपलंही भलं आहे! वकील आणि शेतकरी यांच्या कामाची किंमत एकसारखी असायला हवी! सर्वांना समान अधिकार आहे. साधं, मेहनती, आणि मजुरीचं काम करणाऱ्या गावकऱ्यांचं जीवन हे खरं जीवन आहे! पहिली बाब मी जाणत होतो. दुसरी बाब मला काहीशी मला माहिती होतं. पण तिसऱ्या बाबतीत मी कधीच विचार केलेला नव्हता. सकाळी उठल्यावर मी त्या विचारावर चालण्याचा निर्धार केला’
ज्या काही पुस्तकातील विचारांचा प्रभाव गांधीजींवर झाला त्यात ‘अन टू धिस लास्ट’ याचा मोठी महत्वाची भूमिका बजावलीय. गांधीजींनी त्यानंतर या पुस्तकाचं गुजराती भाषेत ‘सर्वोदय’ नावानं अनुवादित केलं आहे.
(लेखक मुक्त पत्रकार आहेत)
९४२२३१०६०९
Previous articleहिंसा अहिंसा
Next article‘वाईट नजर’ ……
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.