अरुवार कवी आणि माणूसही…

-प्रवीण बर्दापूरकर 

गुंतलेले प्राण ह्या रानात माझे

फाटकी ही झोपडी काळीज माझे

-ना . धों . महानोर

रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर समाज आणि मुद्रीत  माध्यमात वैपुल्यानं लेखन झालेलं आहे . या बहुतेक लेखनाचा भर महानोरांच्या कवितेवर आहे . आमच्या मुग्धा कर्णिकनं महानोरांच्या शब्दकळेचा उल्लेख ‘अरुवार’ या चपखल आणि लोभस  शब्दात केला आहे . ( फार म्हणजे फारच  वर्षांनी हा शब्द अवचित भेटला . ) खरं तर , केवळ कवी म्हणूनच नाही तर माणूस म्हणूनही महानोर पूर्णपणे अरुवारच होते असा अनुभव आहे .

बरंच मागे जाऊन सांगायच तर १९६७-६८ चे ते दिवस होते . औरंगाबादच्या पांडुरंग कॉलनीत एका छोट्याशा खोलीत आम्ही राहात होतो . वडिलांचं नुकतंच निधन झालेलं होतं . आमच्यासाठी तो काळ कठीणच नाही तर विपन्नावस्थेचा होता . त्या काळात वडिलांचे एक दूरचे मावस काका उत्तम क्षीरसागर आणि प्रभाकर क्षीरसागर यांचा आम्हाला खूपच आधार मिळाला . या दोघांमुळेच मला शिक्षणाची गोडी लागली . सर्वच क्षीरसागर बंधू उच्चशिक्षित होते . उत्तम क्षीरसागर  यांना आम्ही आबा म्हणत असू तर मित्र वर्तुळात त्यांना महाराज म्हणत . ते अभिजात साहित्य प्रेमी ,वाचक आणि  कलासक्त होते . त्यांची ऊठबस त्या काळात ना. धों. महानोर भास्कर लक्ष्मण भोळे चंद्रकांत पाटील नेमाडे अशा मंडळीत होती . भालचंद्र नेमाडे यांच्या गाजलेल्या ‘कोसला’ या कांदबरीच्या पहिल्या आवृत्तीचं मुखपृष्ठ महारांजांनीच रेखाटलं होतं . महाराजांकडेच मी या सर्वांना बघितले . महानोर वगळता ही सर्व मंडळी तेव्हा नुकतीच प्राध्यापकी पेशात स्थिरावत होती तरुण होती आणि तिशीच्या उंबरठ्यावर म्हणजे माझ्यापेक्षा वयाने १२-१४ वर्षांनं ज्येष्ठ होती . यापैकी भोळे आणि महानोरांशी माझी बऱ्यापैकी गट्टी जमली . पुढे या दोघांचंही अपार ममत्व मला लाभलं .  १९७७ साली पत्रकारिता करण्यासाठी मी औरंगाबाद सोडलं आणि १९८१ साली नागपूरला पडाव टाकल्यावर भोळे आणि महानोरांची छत्रछाया माझ्यावर पुन्हा पसरली . तेव्हापासून या दोघांच्याही मी अतिशय नियमित संपर्कात आलो आणि प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या या दोघांतही असलेला माणूस मला सतत दिसत राहिला . तेव्हा आम्ही बजाजनगर मधील ‘आनंद मंगल’ या फ्लॅट्समध्ये राहत असे . तिथल्या टेरेसवर मित्रांच्या मैफिलीत काव्य गायनांसाठी महानोर यांना  दोन वेळा आमंत्रित केलं . कोणतेही आढेवेढे न घेता ते आले इतके ते साधे होते , निगर्वी होते .नागपूरची थंडी पण पेटवलेल्या शेकोटीच्या उबेत महानोर रंगले . आधी भास्कर लक्ष्मण भोळे गेले आणि आता ना.धों . महानोरही…

ना. धों . महानोरांना नंतर अमाप प्रसिद्धी मिळाली ; अनेक मोठमोठे सन्मान लाभले . त्यांची भटकंतीही खूप झाली पण त्यांची पावलं , त्यांचं हृदय  मात्र पळसखेडच्या भूमीत जखडूनच राहिलं  . कवी आमदारकथा आणि ललित लेखक प्रयोगशील शेतकरी या पलीकडे जाऊन महानोरांना व्यसन होतं ते पळसखेडची माती कविता आणि माणसांचं . त्यांचं हे माणूसवेडेपण जात धर्म आणि प्रदेशाच्या सीमा ओलांडून अफाट विस्तारलेलं होतं.राजकारणसमाजकारण प्रशासन साहित्य कला अशा सर्व क्षेत्रात महानोरांचा मुक्त संचार होता . त्यांना हेरलं  ते  यशवंतराव चव्हाण यांनी आणि मग हा माणूस दोन्ही ओंजळीत घेऊन निगुतीनं सांभाळला तो शरद पवार यांनी .

महानोर तसे काँग्रेस विचाराचे पण त्यांच्या निष्ठा मात्र शरद पवारांवर होत्या . शरद पवार हाच त्यांचा राजकीय विचार होता . काँग्रेसमधून फुटून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर दीड-दोन महिन्यांनं मी एकदा पळसखेडला गेलो . गप्पांच्या ओघात महानोरांना विचारलं ‘तुम्ही काँग्रेसवादी की राष्ट्रवादी’ तेव्हा महानोर म्हणाले , ‘तुला हा प्रश्न पडलाच कसा मी तर कायम शरद पवारवादीचं !’ शरद पवारांप्रमाणेच कविवर्य कुसुमाग्रज लता मंगेशकर आशा भोसले आणि पु. ल. देशपांडे हीदेखील महानोरांची आस्थेची माणसं . गप्पा सुरु  झाल्या की या दैवतांविषयी असंख्य हकिकती आणि आठवणी महानोर त्यांच्या खुमासदार शैलीत सांगत असत . ते ऐकतांना महानोरांचं हे कथन कधीच संपू नये असं वाटायचं .

उंच आणि भक्कम बांधा रापलेला गोरा वर्ण विस्तृत भालप्रदेश आणि अत्यंत साधी राहणी म्हणजे ना. धो. महानोर . पेहेराव कायम पायजामा आणि सदरा , तो बहुसंख्य वेळा धुवट  .  त्यांना  मी फारच क्वचित पॅन्ट आणि शर्टमध्ये पाहिलं तेही मॉरिशसमधे .   शिवाय आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे महानोर कायम हसतमुख असत . सर्व क्षेत्रातल्या अति सर्वोच्च पदस्थ लोकांशी घरोब्याचे संबंध असूनही आणि कुणालाही झिडकारुन टाकावं किंवा कुणालाही हिडिसफिडिस करावं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं . महानोर सालस माणूसवेडे होते . अनवाणी पायानंही  आलेल्या , फाटक्या  कुणाशीही ते आगत्यानं  बोलत . ‘पळसखेडचं तुमचं घर म्हणजे लंगर आहे ,’ असं मी त्यांना नेहमी म्हणत असे कारण त्यांच्या घरी कधीच पाच-दहा माणसांचा स्वयंपाक झाला नाही . त्यांच्या घरचा ताटांचा आकडा ५०-६० क्वचित शंभरच्याही पार जात असे . नवीन कवी आला असेल तर त्यांच्या कविता ऐकाव्या , आल्या गेल्यांना भेटावं , त्यांना शेत दाखवावं , शेतातल्या एकएका झाडाची जन्मकथा सांगावी , गप्पाची मस्त  मैफिल रंगवावी आणि त्या सर्वांना भरपेट भोजनानंद द्यावा असं  महानोरांना सात्विक व्यसन  होतं .

एकदा असेच बसलो असताना भेटायला आलेल्या कुणीतरी विचारलं , ‘ते लताफळ काय आहे ?’ महानोर लगेच उत्साहानं जमलेल्या सर्वांना घेऊन एका झाडाकडे घेऊन गेले आणि ते झाड साक्षात लतादीदींनी कसं लावलं आहे , याची आठवण त्यांनी भारावलेल्या स्वरात सांगितली . प्रत्यक्षात ते झाड होतं सीताफळाचं पण महानोर त्या फळांना सीताफळ कधीच म्हणत नसत तर लताफळ म्हणत . त्यांच्या नजरेतून  कायमच स्नेहार्द्रता  आणि ते बोलणाऱ्या शब्दातून आपुलकी ओसंडत असे . हे मी इतक्या ठामपणे सांगतो आहे याचं कारण राज्यातच नाही तर परदेशातही महानोरांसोबत भरपूर प्रवास केल्यामुळे त्यांचा निकटचा सहवास लाभला आहे .

ना . धों . महानोरांचं बालपण अति गरिबीत गेलं ; इतक्या गरिबीत की खूप  इच्छा असूनही ते शिकू शकले नाहीत मात्र कवितेनं त्यांचं बोट फारच लवकर धरलं आणि त्यांना लिहितं  केलं . अक्षरश: ओसाड माळरानावर त्यांनी शेती फुलवलीती त्यांचे प्रयत्न कल्पकता आणि अफाट श्रम यांचा संगम आहे . त्यापासून प्रेरणा घेऊन पळसखेडकरांनी जलसंवर्धनाची मोहीम आणि प्रयोगशीलता राबवून परिसर संपन्न केला . तुटक तुटकपणे हे आणि आणखी बऱ्याच गोष्टी समजत गेल्या  . नाही तरी कोणताही माणूस एकाच बैठकीत समजत नाही , तो असाच तुटक तुटक  समजत जातो .  

केवळ शेतीच नाही तर पळसखेड्यात महानोरांनी ज्ञानगंगाही आणली . गावातल्या वर्गखोल्यांना त्यांनी वेगवेगळ्या कवींची नावं दिली ; त्या त्यांनी खोल्या उभारण्यासाठी लोकवर्गणी जमा केली . त्याची एक आठवण आहे– बहुधा १९८२ साल असावं . हिवाळी अधिवेशनासाठी महानोर नागपूरला येणार होते . तेव्हा ते विधान परिषदेचे सदस्य होते . महानोरांच्या वर्गखोल्या उभारण्यात नागपूरकरांचंही योगदान असावं , असं डॉ . भास्कर लक्ष्मण भोळे आणि मला सुचलं . तेव्हा भोळे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक होते आणि स्वतंत्र प्रज्ञेचा विचारवंत असा त्यांचा लौकिक होता तर मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो . मग महानोरांशी बोलून त्यांच्या काव्य गायनाचा एक कार्यक्रम करावा आणि उपस्थितांना मदतीचं आव्हान करुन निधी जमा करावा असं आम्ही ठरवलं . माहिती खात्याच्या सीताबर्डीवरील सभागृहात हा कार्यक्रम झाला . ‘टी. जी.’  या नावाने परिचित असणारे काँग्रेसचे लोकप्रिय पुढारी पत्रकार लेखक त्र्यं. गो. देशमुख हे  राज्याचे मंत्री होते . त्यांच्याकडे माहिती खात्याचाही कार्यभार होता . त्यामुळे सभागृह नि:शुल्क मिळालं . कार्यक्रमाच्या दिवशी दुपारी सभागृहात टी. जी. देशमुखांची भेट झाली तेव्हा त्यांनी विचारलं . ‘कार्यक्रम कसा झाला .’ मी त्यांना सांगितलं , ‘ झाला नाही अजून व्हायचा आहे . आज संध्याकाळी सहा वाजता आहे .’

महानोरांचं काव्यगायन ऐकायला रसिकांनी वेळेआधीच चांगली गर्दी केली . कार्यक्रम सुरु होण्याच्या पाच-सात मिनिटं आधी काव्य गायन ऐकायला टी. जी. देशमुखही पोहोचले . भोळे सरांनी प्रास्ताविकात पळसखेडला एक वर्गखोली बांधण्यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन केलं . काव्य गायनाचा कार्यक्रम झकास रंगला यात काही आश्चर्य नव्हतं . मंत्री असूनही टी. जी. देशमुख श्रोत्यांमध्ये खाली संतरंजीवर बसले . एवढंच नाहीतर कार्यक्रम संपल्यावर आमच्यासोबत झोळी धरुन उभे राहिले आणि नागपूरकरांच्या योगदानाची सुरुवात शंभराच्या पाच नोटा टाकून केली . ( तेव्हा ही रक्कम घसघशीतच होती . ) लोकांनीही लक्षणीय प्रतिसाद दिला . ती भरलेली झोळी टी. जीं.च्या हस्तेच आम्ही महानोरांच्या स्वाधीन केली . ‘रान  हेच संपूर्ण जगण्याचं भावजीवन असलेला कवी’ अशा शब्दांत टी  . जी. देशमुख यांनी महानोर यांचा गौरव केला होता , हे अजूनही आठवतं .

मराठी मनाच्या जागतिक नकाशावर पळसखेड हे गाव आणणाऱ्या ना . धों . महानोरांना काही पळसखेडकरांनी बऱ्यापैकी छळलंही . तो छळ असह्य झाला तेव्हा ती बाब महानोर यांनी तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांना कळवली . तेव्हा मी एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाच्या औरंगाबाद ब्युरो ऑफिसमध्ये कार्यरत होतो . गोपीनाथ मुंडे यांनी फोन करुन ते मला सांगितलं आणि पळसखेडला जाऊन चौकशी करुन वस्तुस्थिती कळवण्यास सांगितलं . मी पळसखेडला गेलो , अनेकांना भेटलो जी काय माहिती मिळाली ती मुंडे यांना कळविली . मग गोपीनाथ मुंडे स्वत: पळसखेडला आले त्यांनी त्या प्रकरणात सर्वांची समजूत घातली आणि समेट घडवून आणला. हा एकच प्रसंग जेव्हा , खिन्न महानोर बघायला मिळाले . त्यावेळी झालेल्या सभेत व्यासपीठावर महानोरांनी आग्रहानं मलाही शेजारी बसवून घेतलं होतं पण तो समेट काही फार टिकला नाही . कोर्टकचेऱ्या झाल्या . महानोरांना त्याचा भरपूर मानसिक त्रास झाला तरी त्या काळात महानोर शांत होते . ना त्यांचा तोल सुटला , ना त्यांनी त्रागा व्यक्त केला , ना ते कुणाला अद्वातद्वा बोलले . तणावाच्या त्या काळातही ते अरुवारपणेच वागले .

अखंड गप्पाष्टक हे महानोरांचं आणखी एक व्यसन  . त्यांच्या पोतडीत असंख्य हा शब्द थिटा पडावा इतक्या असंख्यांच्या आठवणी हकिकती आणि किस्से होते . त्यामुळे अनेकदा तर किती सांगू आणि किती नको अशी महानोरांची अवस्था होत असे . एका कोजागिरी निमित्त नागपूरच्या ‘आधार’ या संस्थेनं ना . धों . महानोरांच्या जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता . प्रारंभी छोटासा सत्कार , स्वागत आणि मग त्यांची जाहीर मुलाखत मी घ्यावी असं नियोजन होतं . ‘पक्ष्यांचे लक्ष थवेगगनाला पंख नवे’ असा तो कार्यक्रम होता . नागपूरला पोहोचायला महानोरांना जरा उशीर झाला आणि ते  थेट कार्यक्रम स्थळीच पोहोचले . त्यामुळे कार्यक्रमाच्या स्वरुपाबद्दल बोलणं झालं नाही . शुभदा फडणवीसचं प्रास्ताविक आटोपल्यावर भास्कर लक्ष्मण भोळेंच्या हस्ते महानोरांचा सत्कार करण्यात आला . या दरम्यान हळूच त्यांना जे सात-आठ प्रश्न काढले होते तो कागद मी दाखवला . जाहीर मुलाखत सुरु झाली आणि माझ्या पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात महानोर सलग सव्वा तास  बोलले . हकिकती , आठवणी आणि काही कवितांचं गायन अशी एक सुरेल लय त्यांच्या कथनाला लाभली होती . श्रोते मंत्रमुग्ध झाले , त्या संध्याकाळचा आसमंत महानोरांच्या त्या सुरेल कथनानं उजळून निघाला . महानोर एकदाचं बोलायचे थांबले आणि मला म्हणाले , ‘विचार तुझा पुढचा प्रश्न’ .  

मी त्यांना म्हणालो ‘तुम्ही एकाच प्रश्नाच्या उत्तरात माझ्या सर्वच प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली . पु. ल. देशपांडे तुम्हाला ‘धो , धो महानोर’ का म्हणत असत याची प्रचीती आली . आता आणखी कांही कविताच सादर करा .’ ’धो धो महानोर’ला श्रोते आणि महानोरांनीही जोरदार हास्याची दाद दिली ती दादही त्यांच्या अरुवार स्वभावाला साजेशी होती . अन्य कुणी लेखक  कलावंत असता तर त्याला नक्कीच राग आला असता .

अशात आमच्या गाठीभेटी कमी झाल्या होत्या . आम्ही दिल्ली सोडून औरंगाबादला स्थायिक झालो ते कळल्यावर एकदा ते घरी आले . माझ्या बेगमच्या आजारपणाचं कळल्यावरही येऊन गेले . निरोप घेताना दुसऱ्या खोलीत मला नेऊन काही मदत पाहिजे का असं आस्थेनं विचारलं . या शेवटच्या दोन प्रत्यक्ष भेटी , बाकी अधूनमधून फोनवर बोलणं . हळूहळू त्यांचीच तब्येत बिघडत गेली . मध्यतंरी त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले, ‘मला जरा प्रवीण बर्दापूरकरांचा नंबर द्या  बरं.’ काळजात चsssर्र झालं . मग त्यांना मीच बोलत असल्याची आठवण करुन दिली . विधिमंडळात त्यांनी केलेल्या भाषणांचं पुस्तक प्रकाशित पाठवण्यासाठी माझा पत्ता त्यांना हवा होता . 

सुलोचना वहिनी गेल्यापासून ते खचले होते . नभातल्या चैतन्याचं दान मराठी कवितेला देणारे अरुवार मनाचेही महानोर आता त्याच नभात विलीन झालेले आहेत… 

अरुवार म्हणजे कोमलनाजुक , मृदु , सुंदर , मऊ , हळुवार , सुकुमार . – दाते शब्दकोश )

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleलोकसभा निवडणुकीची खडाखडी – मोदी म्हणजे भाजपच !
Next articleज़िंदगी और कुछ भी नहीं…तेरी मेरी कहानी है…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.