या एवढ्या वर्षात खूप काही बदलले आहे. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जिथे राहिलो, ते मातीचं घर जमीनदोस्त झालं आहे. त्या घरासमोरची एकेकाळची नांदती विहीर बुजली आहे. त्या विहिरीवर असणारी लाकडी खिराडी, अजूनही आठवते . पहाटे उठून बहीण आणि मी ज्या पारिजातकाची फुलं वेचायला जायचो. पहाटे साडेपाच – सहाला पारिजातकाचा सडा पडलेला असायचा . बुंधा हलविला की पारिजातक अंगावर फुलांचा वर्षाव करायचा . बहिण सुषमा आणि शेजारची विद्या सोबत असायची . तो पारिजातक नेणिवेत एवढं घट्ट रुतून बसला आहे की आजही कुठे पारिजातक दिसलं की मी पार ४० वर्ष मागे जातो . ते झाड आता नाही. भोवतालच कोणतंही घरं, इतर झाडंही आता जागेवर नाही. तेव्हाची अनेक माणसंही नाहीत.
माध्यमिक शाळेची कौलारू इमारत १५ वर्षांपूर्वीच पडली असे समजले. ज्या मैदानात आम्ही खेळायचो ते पार आक्रसलेले आहे. त्या काळात ८-१० वर्षाचे आम्ही कॉर्क बॉलने क्रिकेट खेळायचो . दर महिन्याला पगारासाठी आईला यवतमाळला जावे लागायचं . मी सोबत असायचोच. आईच्या मागे हट्ट करून मी कॉर्क बॉल घेवून यायचो . सोबत साठवणे बुक डेपोतून ६०-७० पैशात मिळणारी गोष्टींची पुस्तकं . माझ्याजवळ एवढी पुस्तकं जमा झाली होती की मी ५ पैसे शुल्क घेवून इतरांना वाचायला द्यायचो . मात्र तेव्हा मोजून २-४ ग्राहक होते.
त्याकाळी गावाला खेटून वाहणाऱ्या नदीची हालतही घरं आणि शाळेसारखीच झाली आहे . एकेकाळी या नदीचा प्रवाह वाहता होता, हे आज सांगूनही खरं वाटणार नाही. जिथे गणपतीचे विसर्जन करत होतो, पोहणं शिकण्याचा प्रयत्न करत होतो, गावातील महिला धुणं धुवायला येत होत्या, त्या साऱ्या जागा कधीच्याच गायब झालेल्या. त्या काळात तासनतास आम्ही नदीत पडून राहायचो. डोहात पोहणं शिकण्याच्या प्रयत्नात अर्जुन वृक्षाच्या मुळात पाय अडकल्याने धड पाण्यात नाही आणि धड झाडावर नाही, अधांतरी लटकलो होतो .पोट पार खरचटून निघालं, होतं. रक्ताळलेल्या त्या पोटावर मित्राने झाडपाला आणि मीठ लावलं होतं. (मी अजूनही त्याला गमतीने म्हणतो , जखमेवर मीठ चोळणं काय असते याची प्रत्यक्ष अनुभूती मला अतिशय लहान वयात आली ) त्या साऱ्याच आठवणी ताज्या झाल्यात (विशेष म्हणजे ज्या झाडाच्या मुळ्यात अडकून पडलो होतो, ते झाड सापडलं. ते अजूनही तसंच आहे. डोहही आहे , पण पाणी नसल्यासारखं )नदी आणि पाण्याचं वेड मला तेव्हापासूनच. ज्या नदीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत, तिला अनेक वर्षांपूर्वी दुरून वळविलं आहे, असे सांगण्यात आले. पण तिचीही एकंदरीत अवस्था वाईटच. एक होती नदी…म्हणण्यासारखी.
आई यावर्षीच गेल्याचे सांगताच अनेकजण कळवळलेत. अर्थात आता आई बाबाच नाही तर त्यांच्या काळातील खूप सारी माणसं जगात नाही. गावाशी नात कायम राहावं यासाठी आई ज्या शाळेत शिक्षिका होती तिथे आईच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी वेगवेगळ्या वर्गात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्याचे ठरवून आलो. मुख्याध्यापकांना तसे सांगितले.
अतिशय मर्मस्पर्शी व भावविभोर असे लेखन. वाचताना सहजच डोळ्यांंच्या कडा आपोआपच ओल्या होतात. सगळीकडे हीच परिस्थिती आहे.
धन्यवाद सर !