फिल्म इंडस्ट्रीत सुशांतच्या अगोदरही अनेक कलावंतांनी स्वतःला अकाली संपविले आहे. प्रसिध्द दिग्दर्शक गुरुदत्त, परवीन बाबी, दिव्या भारती, सिल्क स्मिता, डिम्पल कपाडियाची बहिण रीम कपाडिया, नफिसा जोसेफ, जिया खान, प्रत्युषा बॅनर्जी, मनमोहन देसाई अशा अनेकांनी वैयक्तिक आयुष्यातील निराशा, अपयश, प्रेमभंग, आर्थिक अडचणी, मानसिक रोग, लोकप्रियता ओसरणे या व अशा कारणांमुळे आत्महत्या केल्या आहेत. काहीजणांच्या आत्महत्येची कारणं चकित करणारी आहेत. परवीन बाबी ही ‘पॅरानाईड स्क्रिझोफेनिया’ या मानसिक रोगाने ग्रस्त होती. या आजारात कोणीतरी आपला जीव घ्यायला निघालं आहे, असा कायम भ्रम होत असतो. त्या अवस्थेत परवीन बाबीने अमिताभपासून बिल क्लिंटनपर्यंत, तर अमेरिका, ब्रिटन सरकारपासून वेगवेगळ्या गुप्तचर संस्था आपल्या जिवावर उठल्या आहेत, असे आरोप केले होते. कोर्टात तिने तशी याचिकाही दाखल केली होती. फिल्म इंडस्ट्रीत अनेक कलावंत कमी जास्त प्रमाणात मानसिक रोगाचे शिकार असतात. कमालीची असुरक्षितता, केवळ यश आणि पैशाला महत्व देणारी माणसं… यामुळे झगमगाटी आयुष्य जगणाऱ्या अनेक कलावंतांना आयुष्याच्या सायंकाळी येणारं एकटेपण व नैराश्य पेलवत नाही. ज्यांना असह्य होते , ते स्वत:ला संपवतात . बाकी दारू आणि मादक द्रव्याच्या आहारी जातात .
एकेकाळचा सुपरस्टार राजेश खन्नाबद्दल असे सांगितले जाते की आपण ‘सुपरस्टार’ आहोत या भ्रमातून त्याला कधीच बाहेर येता आले नाही. शेवटच्या काही वर्षात डिप्रेशनमध्ये असताना तो प्रचंड दारू पित असे. त्यावेळी मानसोपचार तज्ञांनी त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी घरी शूटिंगसाठी वापरतात तसे लाईट वापरायला सांगून लाईट…अॅक्शन…कट या शूटिंगदरम्यान वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या सहाय्याने प्रत्यक्ष शूटिंग होते आहे, असा आभास निर्माण करा. त्याला तो सुपरस्टार असल्याचा फील द्या , अशी ट्रीटमेंट सुचविली होती, एकेकाळी मराठी नाट्यविश्वात तुफान लोकप्रिय असलेल्या काशिनाथ घाणेकरांचीही अवस्था अशीच होती. राजेश खन्ना असो वा घाणेकर या एकेकाळी प्रचंड यश व लोकप्रियता अनुभवलेल्या कलावंतांना स्वतःच्या सुवर्णकाळातून बाहेरच येता येत नाही. त्यांच्यासाठी काळ तिथेच गोठला असतो. त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही मानसिक उपचाराचा फायदा होत नाही. काही सन्माननीय अपवाद वगळता एकेकाळी लाखो लोकांचे आयडॉल असलेल्या कलावंतांचे अखेरचे दिवस केविलवाणे असतात. अगदी स्पष्ट सांगायचं झाल्यास रुपेरी पडद्यावर सुपर हिरो-हिरोईनची भूमिका साकारणारे, वाटेल ते आव्हान लीलया पेलणारे हे कलावंत माणूस म्हणून अगदीच कुचकामी असतात. आयुष्याच्या उतरत्या वाईट कालखंडात इतर क्षेत्रातील व्यक्तींसारखं आपल्याला साधंसुधं आनंदी आयुष्य जगता येऊ शकतं, हे त्यांच्या डोक्यातच शिरत नाही.
खरी नीती ,विचार पडद्या मागची आणि पुढची स्थिती दाखवणार मीडिया वाच आपल्याला खरा आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतेय……..