उनसे मोहब्बत कमाल की होती है.. जिनका मिलना मुकद्दर मैं नहीं होता

– सानिया भालेराव

‘उनसे मोहब्बत कमाल की होती है.. जिनका मिलना मुकद्दर मैं नहीं होता’

काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये कुठल्याश्या मैफिलीत एका शायरातने ही ओळ म्हटली होती. मुकद्दर म्हणा, डेस्टिनी म्हणा, नशीब म्हणा.. दोन जीव एकत्र येतात.. एकत्र राहतात हा नशिबाचा भाग असूही शकेल कदाचित पण प्रेमात पडणं.. प्रेम करता येणं ह्यासाठी नशीब कशाला लागतं? असं मला वाटायचं. एकत्र राहता येणं हे गंतव्याचं अंतिम ठिकाण नसेल तर मग मुकद्दर किंवा नशिबाच्या समोर मान तुकवायची गरज काय? नशिबाच्या पुढे नेऊन ठेवत ते प्रेम.. ‘तू रबिन्द्रनाथ वाच’.. असं मला माझा एक बंगाली मित्र म्हणला होता. त्यांच्या कथा वाचल्या. अवाक व्हायला झालं.. कविता मात्र जड गेल्या.. हरकत नाही.. . पुस्तकं/कविता आणि काही नितांत चांगले चित्रपट/कलाकृती या सगळ्यांची एक वेळ येते आपल्या आयुष्यात.. त्यानुसार येईल वेळ कवितांची सुद्धा.. असं स्वतःला समजावून मी आपल्या सो कॉल्ड रुटीन मध्ये अडकले. काही महिन्यांपूर्वी रबिन्द्रनाथांच्या कवितांचं पुस्तक हाती लागलं.

UNENDING LOVE by Rabindranath Tagore

I seem to have loved you in numberless forms, numberless times…
In life after life, in age after age, forever.
My spellbound heart has made and remade the necklace of songs,
That you take as a gift, wear round your neck in your many forms,
In life after life, in age after age, forever.

शाश्वत प्रेम..

कोणत्याही आकारात, कोणत्याही स्वरूपात मी असलो तरीही मी कायम तुझ्यावरच प्रेम करत आलो आहे
जन्मानुजन्म.. शतकानुशतकं… निरंतर
माझ्या मंत्रमुग्ध झालेल्या हृदयाने एकदा आणि अनेकदा तुझ्यासाठी गीतांची माळ सजवली आहे
हे तू भेट म्हणून स्वीकार आणि तुझ्या गळ्याभोवती ही माळ तू ज्या विविध स्वरूपात असशील त्या रूपांमध्ये परिधान कर..
जन्मानुजन्म.. शतकानुशतकं… निरंतर

कविता अत्यंत सुरेख आणि गहिरी आहे. प्रेम.. शब्दातून व्यक्त करता येत नाही असं जे आपण म्हणतो ते खोटं वाटावं इतकं तरल रबिन्द्रनाथांनी लिहिलं आहे. तसं बघायला गेलं तर त्यांचं आणि कादंबरी देवी यांचं प्रेम अधुरं राहिलं . प्रेमामुळे बहरलेली त्यांची प्रतिभा , याच प्रेमामुळे त्या दोघांना झालेल्या यातना, दुःखद शेवट..हे सगळं रबिन्द्रनाथांच्या वाट्याला आलंच. संवदेनशील मनाच्या वाट्याला येणाऱ्या यातना प्रचंड असतात. शब्द थेट हृदयात पोहोचतात ते उगाच नाही.. ज्याच्या आत दुःख कधी झिरपलं नाही त्याला त्याचा स्वाद कसा कळणार? वरवरचं आयुष्य जगणाऱ्या माणसांना शब्दांच्या मागे दडलेल्या भावना समजतीलही कदाचित.. पण उमजतील का? हा खरा प्रश्न आहे.

मला एक प्रश्न पडला मात्र.. Unending Love असं का बरं म्हटलं असावं.. प्रेम हे निरंतर असतं.. आणि जे नसतं ते प्रेम कसं? थोडा अजून विचार केल्यावर मग वाटलं की जे आजन्म जिवंत राहतं, झिरपत राहतं.. काळाच्या, मूर्त- अमूर्ताच्या पलीकडचं असं हे प्रेम. शिद्दतवाला प्यार.. आणि ज्याला हे अनुभवायला मिळणं ह्यासाठी नशीब लागतंच.. मग ते प्रेम नशिबात असो वा नसो.. पण ते करता येणं.. अनुभवता येणं ह्याला नशीब लागतंच.. हर किसी के मुकद्दर मैं यह अहसास नहीं होता..

तू ही ज़ाहिर है तू ही बातिन है
तू ही तू है तो मैं कहाँ तक हूँ

इस्माइल मेरठी यांचा हा अप्रतिम शेर. ही कविता वाचून आठवला.

बाहेर देखील तूच आहेस आणि माझ्या अंतरंगात सुद्धा तूच सामावला आहेस
सर्वत्र केवळ तूच आहेस मी आहे तरी कुठपर्यंत आता…

प्रेम जेंव्हा जग व्यापून टाकतं तेंव्हा हृदयाच्या आत आणि बाहेर सगळीकडे ते बहरतं. तू माझ्यामध्ये इतका सामावला आहेस की आता मी माझा उरलोच नाही.. मी पणाची रेषा जिथे पुसट होत जाते.. माझं न होता जेंव्हा ते आपलं होतं.. ते प्रेम.. स्वतःच्या, काळाच्या, जगाच्या पलीकडे नेऊन ठेवणारं..

रविवार सुरु झालाच आहे.. प्रेमात आकंठ डुंबायला यासारखा उत्तम दिवस असू शकत नाही.. थोडं पाणी वाहू द्या, थोडं हसू उमलू द्या.. जिवंत आहोत का जरा चाचपून पाहूया… So Cheers to Unending Love..Cheers to being in Love!

 (Painting by Artist Deepa vedpathak)

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे )

[email protected]

Previous articleचौकटी मोडताना…!
Next articleएकाकीपणाशी मैत्र…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.