स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू देशातील काही उमद्या, अभ्यासू, तरुण संसपटूंचे भाषण, त्यांच्या भाषणातील माधुर्य, अभ्यासूपणा, व्यासंग ऐकण्यासाठी संसदेत मुद्दाम जास्तवेळ थांबायचे. अशा संसदपटूमध्ये तेव्हाच्या राजापूर लोकसभा मतदार संघातील खासदार बॅरिस्टर नाथ पै होते. विरोधी पक्षात असूनही बॅरिस्टर नाथ पै यांना नेहरूंचा जिव्हाळा लाभला तो त्यांच्या भाषा कौशल्यामुळेच. मात्र सद्यस्थितीत त्यांचा वारसा चालवणाऱ्या कोकणातील लोकप्रतिनिधींचे भाषा शैलीचे वर्तन ऐकले की, हेच का ते बॅरिस्टर नाथ पै यांच्या कार्यक्षेत्रात जनतेची सेवा करणारे लोकप्रतिनिधी? असा प्रश्न उपस्थित होतो. अगदी अलीकडच्या काळात ‘मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली जाईल’ असे वक्तव्य आजी मुख्यमंत्र्यांबद्धल कोकणातीलच माजी मुख्यमंत्र्यांनी केले. त्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. या त्यांच्या असभ्य भाषाशैली वर्तनाबद्दल त्यांना अटकही झाली. या सगळ्यावरून आपल्या लक्षात येईल की कोकण प्रदेशाच्या राजकीय वातावरणात राजकीय नेत्यांचे भाषावर्तन आणि त्या अनुषंगाने त्यांची विकास कार्यपद्धती कशी बदलत गेली. आता कोकणची जनताही अशाच नेत्यांना आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहे. त्यामुळे यांच्यातील बदलत गेलेल्या ‘रावडी भाषेला’ जनताही कशी शरण गेली आहे हेही लक्षात येऊ शकते.खरेतर आजच्या राजकीय नेत्यांचे अशा प्रकारचे वर्तन पाहिले की, फक्त कोकणच्याच नाही तर काही अपवादात्मक नावे सोडल्यास आजच्या राजकीय नेत्यांना स्वतःची अशी भाषाच नाही, असेच म्हणावे लागेल. आधीची सर्व कोकणची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता कोकणच बदलत गेलेलं हे राजकीय सौजन्य विचार करायला लावणार आहे, हे मात्र निश्चित!
कोकणातील मागच्या पिढीतील सर्व राजकीय नेते हे सहिष्णुतावादी स्वभावाचे होते.त्यांच्या सर्वोदयी विचाराचा पगडा त्यांच्या कार्यकर्त्यांवर होता. त्यामुळे त्यांच्या नेत्यांच्या बोलण्यात साधा वरचा स्वर नसायचा.याचा परिणाम कार्यकर्त्यांवर होऊन कार्यकर्तेही विनम्रपणे कार्यरत राहत. स्वर्गीय मधु दंडवते उर्फ नानांची सभा राजापूर लोकसभा मतदार संघाच्या प्रचारासाठी एका ठिकाणी होती. नानांवर भरभरून प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांची सेवा करण्यासाठी धडपडत असत. त्या सभेच्या ठिकाणी नानांचे चहापान आपल्या घरी व्हावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली. शेवटी एका कार्यकर्त्याच्या घरी नाना उतरतील, फ्रेश होतील, चहा घेतील आणि सभेच्या ठिकाणी येतील असे सभा नियोजनाच्या मीटिंगमध्ये ठरले. दुसऱ्या दिवशी आधीच्या सभा करून येईपर्यंत नानांना या सभेला यायला उशीर झाला. ज्या घरी नाना चहापान करणार होते ते घर दूर असल्यामुळे नाना सभेच्या बाजूच्या घरात चहापान करतील असा अचानक बदल करण्यात आला. ज्याच्या घरी नाना चहापानाला जाणार होते त्याला हे कळतच तो हिरमुसला. त्याच्या घरातील माणसे नाराज झाली. सभेच्या ठिकाणी आल्यावर नानांना हे कळले.नानांनी सभेच्या बाजूच्या घरी चहापान केला. तिथेच आधी चहापानाची सोय ज्याच्या घरी केली तोही कार्यकर्ता होता. शेवटी त्या कार्यकर्त्याला घेऊन नाना त्याच्या घरी गेले. त्याच्या परिवाराला भेटले. त्याच्या आईला वाकून नमस्कार केला. त्याच्या घरी चहा घेतली आणि पुन्हा सभेच्या ठिकाणी आले.हा प्रसंग नाना देशाचे अर्थमंत्री असतानाचा आहे. यावरून आपल्या लक्षात येईल कोकणातील आधीच्या पिढीतील राजकीय नेते किती विनयशील होते आणि त्यांच्या भाषेत, त्यांच्या वागण्यात कसा कमालीचा गोडवा होता. आता मात्र भाषिक आक्रमकपणा, पांचट विनोद, करमणुकप्रधानता याचाच अनुभव येणाऱ्या आजच्या राजकीय नेत्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांची ‘अशी जपणूक करणे’ हे आता विसरायलाच हवे!
अलीकडल्या काळातील कोकणातील राजकीय नेते सामान्यातील सामान्य होऊन जगताना दिसत नाहीत. त्यांचे राहणीमानही तसे नसल्यामुळे त्यांचा सामान्य माणसांपासून संवादही तुटलेला दिसतो. त्यांचे जगणेच पोशाखी असल्यामुळे राहणेही पोशाखी आणि बोलनेही सामान्य लोकांशी एक अंतर ठेवूनच. त्यामुळे सर्वसामान्य जनतेशी त्यांचा संवाद कधी होतच नाही. त्यामुळे सामान्यांचे प्रश्नही ते गांभीर्याने घेत नाहीत. चुकून जर सामान्यांचे प्रश्न सुटत असतील तर ते त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे समजावे. विशेष म्हणजे हे कार्यकर्ते मिळणाऱ्या टक्केवारीमुळेच प्रश्न सोडवत असतात असा त्यांच्यावर आरोप केला जात आहे. मात्र या सगळ्यांहून मधु दंडवते माणूस म्हणून वेगळे होते. त्यांचा डोक्यात सतत सामान्य माणसाचे भले व्हावे याबद्धलच विचार चाललेला दिसायचा. ते सामान्य कार्यकर्त्यांमध्ये सामान्य होऊन राहायचे. म्हणून ते सर्व स्तरातील जनतेला प्रिय होते.त्यांचे रहाणीमान, त्यांचे सगळ्यांशी आपुलकीने बोलणे या याबद्दल अनेक उदाहरणे सांगता येतील. आताचे नेते वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागात आपले वेगळे बंगले बांधून राहिलेले दिसतात. त्यांच्या गाड्यांची तर गणतीच आपण करू शकत नाही. या सगळ्यामुळे त्यांच्या बोलण्यात कायम एक अधिकारवाणीचा दर्प जाणवत राहतो. नानांकडे मात्र स्वतःची गाडी नव्हती, की पंचवीस वर्षांत ज्या मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून आले तिथे त्यांचं स्वतःचे घरही नव्हते. आपल्या मतदार संघात आले की ते शासकीय निवासस्थानीही राहायचे नाहीत. आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी त्यांचा मुक्काम असायचा. कणकवलीत मामा आळवे हे त्यांचे जिवाभावाचे कार्यकर्ते होते. त्यांच्या घरी बर्याच वेळा नानांचा मुक्काम असायचा. एके दिवशी नाना त्यांच्या घरी मुक्कामाला होते. तेव्हा मामा आळवेना पहाटे पाच वाजता बाथरूममध्ये कपडे धुतानाचा आवाज आला. मामा उठून बघतात तर काय, आपल्या घरी खासदार असलेला देशातील एक मधु दंडवतेंसारखा मोठा नेता स्वतःचे कपडे स्वतः धुतो आहे. हे पाहून मामांना संकोच वाटला. मामानी विनंती केली. कपडे धुवू नका. तर नाना म्हणाले, आपलं काम आपणच कायम कराव! दुसरी गोष्ट म्हणजे नाना अर्थमंत्री म्हणून देशाची सेवा बजावून दिल्लीहून मुंबईला आले तेव्हा गाडी घेण्यासाठी ते एका बँकेत गाडीचे कर्ज घ्यायला गेले. तेव्हा त्या बँकेचा मॅनेजर त्यांच्याकडे बघतच राहिला. त्याला काय बोलावं हेच कळेना.
कोकण म्हणजे फक्त सिंधुदुर्ग नाही साहेब…