राजकारणी असुसंस्कृत असतात असा बहुसंख्य जनतेचा एक आवडता सिद्धांत आहे . माध्यमं आणि विशेषत: चित्रपटांनी हा समज फार मोठ्या प्रमाणात पसरवलेला आहे . इतकी वर्ष राजकीय वृत्तसंकलनात घालवल्याच्यानंतर मी एक ठामपणे सांगू शकतो की , सगळेच राजकारणी हा जो काही समज पसरलेला आहे तसे असुसंस्कृत नसतात . सगळेच राजकारणी असंवेदनशील , रांगडे , रासवट , दुष्ट , खुनशी आणि कट-कारस्थानं करणारे नसतात . या समजाचा एक उप भाग म्हणजे , राजकारणी वृत्तपत्रा व्यतिरिक्त आणि कांहीच वाचत नाहीत . माझा स्वत:चा अनुभव मात्र असा मुळीच नाही . अनेक राजकारण्यांना वाचनसोबतच संगीत , चित्रकलेची जानकारी असते , हे मला चांगलं ठाऊक आहे . ज्येष्ठतम नेते शरद पवार , सुशीलकुमार शिंदे , नितिन गडकरी अतिशय चांगले वाचकच नाहीत तर त्यांच्या संग्रहालयात मोठी ग्रंथ संपदा आहे . विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , मनसेचे नेते राज ठाकरे , देवेंद्र फडणवीस , सुधीर मुनगंटीवार , जयंत पाटील , छगन भुजबळ अशा कितीतरी विद्यमान मंत्र्यांची नावं , ते चांगले वाचक असण्याबद्दल घेता येतील . माझ्या एका पुस्तकावर एखाद्या समीक्षकाला लाजवेल इतकं अप्रतिम भाषण छगन भुजबळ आणि नितिन गडकरी यांनी केल्याचं स्मरणात आहे . सुमारे ३ वर्षांपूर्वी एकदा संगमनेरला विद्यमान मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे जाण्याचा प्रसंग आला . त्यांना तर चक्क ग्रेसच्याही कविता पाठ आहेत . आता हयात नसलेल्या अनेक राजकारण्यांची नावेही या संदर्भात सांगता येतील . सांगायचं तात्पर्य माध्यमं आणि चित्रपट पसरवत असलेले सगळेच समज किंवा रंगवत असलेल्या सर्वच प्रतिमा खऱ्या असतात असं नव्हेच .