ढिम्म साहित्य-संस्कृती मंडळ आणि अशोक चव्हाणांचं अगत्य !

प्रवीण बर्दापूरकर

|| १ ||

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ स्थापन करण्यामागे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा असलेला हेतू कितपत साध्य झाला या संदर्भातल्या चर्चा आता शिळ्या झाल्या आहेत . या मंडळाचा कारभार साहित्यानुकूल नाही , अगत्य आणि सुसंस्कृतपणाशी मंडळाला काहीही देणं-घेणं नाही , हे आजवर अनेकदा सिद्ध झालेलं आहे . फार पूर्वी म्हणजे , डॉ . मधुकर आष्टीकर अध्यक्ष असताना या संदर्भात मीही बरंच लिहिलं होतं . साहित्य आणि संस्कृती मंडळाचा ताजा अनुभव फारसा सुखावह नाही तर आजवरच्या गलथान परंपरेला साजेसाच आहे .

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री , माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे एक अग्रगणी नेते  असे शंकरराव चव्हाण ( १४ जुलै १९२० – २६ फेब्रुवारी २००४ ) यांची जन्मशताब्दी नुकतीच सुरु झाली . त्यानिमित्ताने ‘आधुनिक भगीरथ’ हा शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी गौरव ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीनं प्रकाशित करण्यात आला . या ग्रंथासाठी लिहिण्याची संधी मलाही मिळाली . पत्रकारितेच्या धबडग्यात काही लोकांवर लिहायचं राहूनच गेलं होतं . त्यात विलासराव देशमुख आणि शंकरराव चव्हाण होते . विलासरावांवर तीन वर्षांपूर्वी एका पुस्तकासाठी एक प्रदीर्घ लेख लिहिला . पण , ते पुस्तक अजून प्रकाशितच झालेलं नाही आणि त्या पुस्तकाचं स्टेटस काय आहे , हेही कळत नाहीये .

शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी  गौरव ग्रंथासाठी लेख लिहिण्यासाठी या ग्रंथाचे संपादक डॉ . सुरेश सावंत बरेच मागे लागले . बेगमच्या प्रदीर्घ आजारपणामुळे ते काम बरंच रेंगाळलं ; परंतु डॉ . सावंत यांच्या चिवट पाठपुराव्यामुळे ते अखेर पूर्ण झालं हे मात्र खरं . सुमारे साडे चार हजार शब्दांचा तो ‘शंकरराव चव्हाण : कांही नोंदी’ हा लेख या ग्रंथात समाविष्ट झालेला आहे . डॉ. सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ग्रंथाचं संपादन अतिशय श्रमपूर्वक , कौतुकास्पद तपशीलवार केलेलं असून देखणा असा हा ग्रंथ सिद्ध झालेला आहे . ( कांही राजकारण्यांचा अपवाद वगळता ) सर्वच लेख शंकरराव चव्हाण यांच्या विविध पैलूंचा आढवा घेणारे आहेत . राजकारणात रस असणार्‍या प्रत्येकाच्या संग्रहात असायला हवा , इतका हा ग्रंथ संदर्भ म्हणून महत्त्वपूर्ण आहे . शंकरराव चव्हाण यांच्या संदर्भातला ‘आधुनिक भगीरथ ‘ हा जवळजवळ ८०० पानांचा ग्रंथ १४ जुलै २०२० ला प्रकाशित झाला . त्याच्या बातम्या वगैरे आल्या तरी हा मजकूर लिहित असताना ४ डिसेंबरला ,  म्हणजे सुमारे सव्वाचार महिने उलटले तरी  त्या ग्रंथाची प्रत अजून काही कुणाही लेखकाला मिळालेली नाही , मग मानधन तर लांबच राहिलं !

खरं तर , असे संदर्भ मूल्य असलेले अनेक महत्त्वाचे ग्रंथ साहित्य आणि संस्कृती मंडळानं आजवर प्रकाशित केलेले आहेत . मात्र हे ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचण्याची तसदी पाहिजे तितक्या किमान गांभीर्यानं कधीच  घेतलेली नाही , हेही तेवढचं खरं . साहित्य संस्कृती मंडळ ग्रंथाचं प्रकाशन करतं . सरकारी पातळीवर त्याचा एखादा दणदणीत प्रकाशनाचा कार्यक्रम होतो . त्याच्या बातम्या वगैरे येतात . विशेषत: ज्या व्यक्तीची जन्मशब्तादी किंवा अन्य काही महत्त्वाची घटना असेल तर , शासनाचं मुखपत्रात असलेल्या ‘लोकराज्य’ च्या अंकात त्या ग्रंथातील कांही मजकुराचा समावेश असलेला केला जातो पण , पुढे तो ग्रंथ कुठे कुठे धूळ खात पडतो , हे फक्त साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या प्रशासनालाच माहीत असतं .

बरं , संस्कृती साहित्य मंडळात आपण जावं तर , ते ग्रंथ कुणाकडे आहेत , कोण ते विकणार आहेत , कुठे उपलब्ध आहेत याच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी कुणीही उत्सुक नसतं . फोन केले तर या माहितीच्या संदर्भात काही हाती पडेल असंही संभाषण होऊ शकत नाही . साहित्य आणि संस्कृती मंडळानं आजवर प्रकाशित केलेले ग्रंथ , त्या ग्रंथ निर्मितीवार खर्च किती झाला आणि त्यापैकी किती ग्रंथांची  विक्री झाली  , या संदर्भात खरं तर खास ऑडिट होण्याची आणि मंडळाच्या कामाची झाडाझडती घेतेली जाण्याची नितांत गरज आहे . खरं तर , साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कारभारात सगळंच काही निराशाजनक नाही . बरंच कांही समाधनकारकही आहे पण , आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचावं याची उर्मीच मंडळाच्या प्रशासनाला नाही . मंडळ व्यावसायिक दृष्टीकोन स्वीकारुन , गेला बाजार एखाद्या खाजगी यंत्रणेची मदत घेऊन या ग्रंथाचं वितरण का करत नाही ? या प्रश्नाचं उत्तरचं मिळत नाही .

पत्रकारितेतील माझे ज्येष्ठ सहकारी सुरेश द्वादशीवर या मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी या मंडळाला व्यावसायिक चेहरा देण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न माझ्या माहितीप्रमाणे केला होता कारण द्वादशीवार यांची दृष्टी संपादकाची होती . संपादकाला दररोजचं वृत्तपत्र  विकलं कसं जातं आणि कसं विकलं जावं , याचं एक व्यावसायिकही भान असतं . विद्वत्तेसोबत ते भान सुरेश द्वादशीवार यांच्यामध्ये नक्कीच होतं पण , मंडळाच्या लालफितशाही कारभाराला सुरेश द्वादशीवार इतके कंटाळले की , अखेर त्यांनी राजीनामाच देऊन टाकला . माझी माहिती जर चूक नसेल तर ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांचाही अनुभव असाच उद्वेगजनक होता . मात्र , द्वादशीवार आणि बोराडे यांच्यातलं सौजन्य असं की , या संदर्भात त्यांनी कधीही जाहीर वाच्यता केली नाही . आता या मंडळाच्या कारभाराच्या संदर्भात फेरविचार करण्याची आणि या मंडळाचा चेहरा-मोहरा बदलण्याची वेळ निर्णायक आली आहे असं ठामपणे वाटतं . लेखकाला पुस्तक पाठवलं न जाणं एखाद्या खाजगी प्रकाशकाकडून घडतं तर मोठं काहूर उठलं असतं पण , साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशित झालेली पुस्तकं लेखकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्या संदर्भात काही चर्चा घडली , काही वादविवाद झाले तर त्याची दखलही मंडळाकडून घेतली जात नाही , हा अनुभव निश्चितच क्लेशदायक  आहे ; या मंडळाच्या प्रशासनाची कातडी किती गेंड्याची बनलेली आहे याचं हे निदर्शक आहे . या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री , विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र अशोक चव्हाण यांचा आलेला एक अनुभव आवर्जून नोंदवून ठेवण्यासारखा आहे .

|| २ ||

राजकारणी असुसंस्कृत असतात असा बहुसंख्य जनतेचा एक आवडता सिद्धांत आहे . माध्यमं आणि विशेषत: चित्रपटांनी हा समज फार मोठ्या प्रमाणात पसरवलेला आहे . इतकी वर्ष राजकीय वृत्तसंकलनात घालवल्याच्यानंतर मी एक ठामपणे सांगू शकतो  की , सगळेच राजकारणी हा जो काही समज पसरलेला आहे तसे असुसंस्कृत नसतात . सगळेच राजकारणी असंवेदनशील , रांगडे , रासवट , दुष्ट , खुनशी आणि कट-कारस्थानं करणारे नसतात . या समजाचा एक उप भाग म्हणजे , राजकारणी वृत्तपत्रा व्यतिरिक्त आणि कांहीच वाचत नाहीत . माझा स्वत:चा अनुभव मात्र असा मुळीच नाही . अनेक राजकारण्यांना वाचनसोबतच संगीत , चित्रकलेची जानकारी असते , हे मला चांगलं ठाऊक आहे . ज्येष्ठतम नेते शरद पवार , सुशीलकुमार शिंदे , नितिन गडकरी अतिशय चांगले वाचकच नाहीत तर त्यांच्या संग्रहालयात मोठी ग्रंथ संपदा आहे . विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , मनसेचे नेते राज ठाकरे , देवेंद्र फडणवीस , सुधीर मुनगंटीवार , जयंत पाटील , छगन भुजबळ अशा कितीतरी विद्यमान मंत्र्यांची नावं , ते चांगले वाचक असण्याबद्दल घेता येतील . माझ्या एका पुस्तकावर एखाद्या समीक्षकाला लाजवेल इतकं अप्रतिम भाषण छगन भुजबळ आणि नितिन गडकरी यांनी केल्याचं स्मरणात आहे . सुमारे ३ वर्षांपूर्वी एकदा संगमनेरला विद्यमान मंत्री  बाळासाहेब थोरात यांच्याकडे जाण्याचा प्रसंग आला . त्यांना तर चक्क ग्रेसच्याही कविता पाठ आहेत . आता हयात नसलेल्या अनेक राजकारण्यांची नावेही या संदर्भात सांगता येतील . सांगायचं तात्पर्य माध्यमं आणि चित्रपट पसरवत असलेले सगळेच समज किंवा रंगवत असलेल्या सर्वच प्रतिमा खऱ्या असतात असं नव्हेच  .

वर उल्लेख केलेल्या शंकरराव चव्हाण यांच्या संदर्भातल्या ‘आधुनिक भगीरथ’ या ग्रंथाच्या  संदर्भात आलेला अनुभव म्हणूनच आवर्जून शेअर करावा असा आहे . गेल्या महिन्यात एक दिवस मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी फोनवर बोलणं सुरु असतांना त्यांना म्हणालो , ‘नानासाहेबांवरचं  ( म्हणजे शंकरराव चव्हाण यांच्यावरचा ) गौरव ग्रंथ खूप चांगला  निघाला आहे , असं ऐकण्यात येतं आहे . पण ,साहित्य संस्कृती मंडळावर अवलंबून राहाल तर तो ग्रंथ वाचकांपर्यंत तर पोहोचणारच नाही . एवढंच कशाला ,  ज्यांनी या पुस्तकासाठी ज्यांनी लेखन केलेलं आहे त्या लेखकांपर्यंतही ते पुस्तक लवकर  पोहोचणार नाही , याची ठाम खात्री मला आहे .’

माझ्या म्हणण्याला अशोकराव चव्हाण यांनी उघड दुजोरा दिला नाही पण , ते सूचक हसले. मी त्यांना पुढे म्हटलं , ‘अशोकराव, यापेक्षा या पुस्तकाच्या प्रती साहित्य संस्कृती मंडळाकडून मागवून घ्या . तुम्ही मंत्री आहात . तुम्हाला मुंबईतील मुंबईत त्या प्रती सहज उपलब्ध होतील . लेखन करणाऱ्या सर्व लेखकांना एका छानशा प्रत्रासह त्या पुस्तकाची प्रत तुमच्या स्वाक्षरीनिशी तुम्हीच सप्रेम भेट म्हणून पाठवा . शंकररावांचे पुत्र , जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत , विद्यमान मंत्री आहेत , त्यांनी आवर्जून पाठवलेल्या या भेटीचा लेखकांना अतिशय आनंद होईल.’

अशोक चव्हाण गंभीरपणे ऐकत आहेत हे ओळखून  मी पुढे म्हणालो , ‘सरकारमधला एक महत्त्वाचा मंत्री आपण केलेल्या लेखनाची अतिशय आवर्जून दखल घेतोय त्याला एक वेगळं असं परिमाण लागेल . तुम्ही सुसंस्कृत आहे त्याच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल .’

अशोक चव्हाण यांना ती कल्पना पसंत पडली . ते ‘हो’ तर म्हणाले पण , ती सूचना अंमलात येईल का नाही याच्याविषयी माझ्या मनात किंचित शंका होती याच कारण कोरोनाचं संकट गडद झालेलं होतं .  राज्यातल्या मंत्री आणि प्रशासनावर कोरोनाच्या कामाचं मोठं दडपण होतं . गेल्या आठवड्यात माझी शंका खोटं ठरवणारं सुखद वर्तन म्हणा की अगत्य अशोक चव्हाण यांच्याकडून घडलं आणि त्या सुसंस्कृतपणाची दखल आपण घेतलीच पाहिजे असं आवर्जून वाटलं .

‘आधुनिक भगीरथ ’ हे चांगलं जाडजूड पुस्तक एका साध्या पण पुठ्ठ्याच्या अतिशय देखण्या बॅक्समध्ये , रिबिन बांधून अशोक चव्हाण यांनी सर्व लेखकांना पाठवलं . त्या पुस्तकासोबत अशोक चव्हाण याचं अतिशय एक छानसं पत्रही आहे . त्या पुस्तकासोबत जुलै महिन्यात राज्य सरकारचं मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ या नियतकालिकानं प्रकाशित केलेला शंकरराव चव्हाण यांच्यावरचा विशेषांक आणि त्यासोबत शंकरराव चव्हाण यांची मुद्रा कोरलेलं एक चांदीचं नाणंही आहे . एका अतिशय सुंदर , नक्षीदार आणि कलात्मक अशा डबीमध्ये ते नाणं पाठवलं आहे .

कोणत्या ना कोणत्या निमित्तानं सर्वच राजकारण्यांना नेहमीच टीकेच्या तोंडी धरणं आपल्याला आवडत असतं ; परंतु राजकारणी अनेकदा अनेक चांगल्या गोष्टी अगत्यानं करत असतात , त्याची सकारात्मक दखल मात्र फारशी घेतली जात नाही .  एकीकडे साहित्य आणि संस्कृती मंडळाचा लालफितशाहीमध्ये अडकलेला हा अनागोंदी व ढिम्म कारभार आणि दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी एका सूचनेची केलेली अंमलबजावणी , हे निर्दशनास आणून देणं हाच या लेखनाचा हेतू आहे .

राज्यातला आणि देशातलाही प्रत्येक मंत्री असा सुसंस्कृतपणे आणि जनतेशी अगत्यानं जर वागेल तर किती छान होईल नाही का ?

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९