महायुतीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे फायरब्रॅंड नेते बच्चू कडू , राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते संजय खोडके , शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि भारतीय जनता पक्षाचे तुषार भारतीय हे सर्व प्रमुख नेते नवनीत राणा यांच्या पराभवासाठी एकजुटीने भिडले आहेत . आपल्या पक्षनेतृत्वाकडून कुठलीही कारवाई झाली तरी बेहत्तर, आम्ही राणा यांचे काम करणार नाही , असा पवित्रा या चौघांनीही घेतला आहे. विशेष म्हणजे या चौघांनी उघड बंडखोरी केली असतानाही त्यांच्या पक्षाने वा नेतृत्वाने ‘राणांचे काम करा’, असा कुठलाही आदेश त्यांना दिला नाही किंवा त्यांच्यावर कुठलीही कारवाई सुद्धा केली नाही . बारामतीत विजय शिवतारेने बंडखोरीचे सूर आळवल्यावर एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस यांनी जातीने त्यांच्या मुसक्या आवळल्या , मात्र येथे तसा काहीही प्रकार घडला नाही , हे आश्चर्यकारक आहे.
२०१९ च्या निवडणुकीत मागासवर्गीय , मुस्लिम आणि मराठा -कुणबी या जिल्ह्यातील प्रमुख जातींनी नवनीत राणा यांना साथ दिली होती . त्या निवडणुकीत या तीन समाजाचे मोठे मतदान नवनीत राणा यांना झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपल्या कोटयातील जागा त्यांना दिली होती . राष्ट्रवादी कॉँग्रेस व इंदिरा कॉँग्रेसने त्यांना उघड पाठिंबा दिला होता. त्यावेळी नवनीत व रवी राणा यांनी निवडून आल्यानंतर आपण संपूर्ण पाच वर्ष दोन्ही कॉँग्रेस व धर्मनिरपेक्ष पक्षासोबत एकनिष्ठ राहू , असे वचन जाहीर सभेत दिले होते . विश्वास बसावा म्हणून त्या काळात राणा दाम्पत्याने नरेंद्र मोदी व भाजपवर कडाडून टीकाही केली होती. ( तेव्हाचे त्यांचे ते Video समाज माध्यमावर तुफान फिरत आहेत. ) मात्र निवडून आल्याबरोबर संसदेच्या पहिल्याच सत्रात राणाबाई भाजपच्या पंगतीत जावून बसल्या होत्या .मागासवर्गीय , मुस्लिम आणि मराठा -कुणबी हे तीनही प्रमुख समाज हा संधीसाधूपणा विसरले नाही. ते राणा यांना धडा शिकवण्याच्या मूडमध्ये आहे . राणांसाठी हा चिंतेचा विषय आहे .
त्यामुळेच मागासवर्गीय व मुस्लिम समाजात मतविभागणी घडवून आणण्यासाठी राणा जोरदार प्रयत्न करत आहेत . रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर व रिंगणात असलेले बहुतांश उमेदवार हे मतविभागणीसाठी राणांनी उभे केले आहेत, असे उघडपणे बोलले जात आहे. राणांची ही चाल लक्षात आल्याने आनंदराज आंबेडकर व इतर उमेदवारांबाबत आंबेडकरी समाजात नाराजी व संताप आहे . यावेळी कोणत्याही परिस्थितीत मतांची विभागणी होऊ द्यायची नाही, यासाठी आंबेडकरी समाजातील अनेक मान्यवर कामी लागले आहेत. त्यामुळे समाजात दिसत असलेली एकजुटता सर्वांना जाणवत आहे . अशीच एकजुट मुस्लिम समाजातही दिसत आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात ४२ वर्ष काँग्रेसचा खासदार होता. मात्र १९९६ पासून आधी रिपाई व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला हा मतदारसंघ गेला . दीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदा लढत असलेल्या काँग्रेसने दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांच्या रूपाने अतिशय आश्वासक चेहरा या निवडणुकीत दिला आहे . स्वच्छ व सौम्य प्रतिमेचे वानखडे हे अनेक वर्षेपर्यंत जिल्हा परिषदेच्या राजकारणात कार्यरत होते . अतिशय साधा सरळ , गोरगरिबांच्या अडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा आहे .जातीय राजकारणापासून कायम दूर असलेल्या वानखडे यांचे सर्व समाजातील नेते व कार्यकर्त्यांसोबत सलोख्याचे संबंध आहेत . दर्यापूर , अंजनगाव व इतरही एकही तालुक्यात मराठा -कुणबी समाजाचे नेते त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहे , यावरून त्यांची सर्वसमावेशकता लक्षात येते.
अमरावती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवत आहे . आतापर्यंत हा मतदारसंघ भाजप – सिवसेना युतीत कायम शिवसेनेकडे होता . आता पहिल्यांदाच भाजप येथून निवडणूक लढवत असताना पक्षाने नवनीत राणांना उमेदवारी दिल्याने भाजप -संघ परिवारात मोठी नाराजी आहे . भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी या नाराजीला जाहीर रुप दिले आहे . गेले पाच वर्ष जो माणूस सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना त्रास देत असताना , त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करत असताना , पक्ष कार्यालयावर दगडफेक केली असतांना त्याचे काम करायचे कसे , असा प्रश्न तुषार भारतीय यांनी उपस्थित केला आहे . भारतीय यांच्या भावनेशी संघ परिवारातील अनेकजण सहमत आहे . त्यामुळे काहीही झाले तरी नवनीत राणांना साथ न देता दिनेश बूब यांना मदत करायची असा निर्णय संघ परिवारातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे . भाजप – संघ परिवारातील २० टक्के मते जरी अन्यत्र वळली तर या मतदारसंघातील निकाल खूप वेगळा लागेल.
ही निवडणूक आमदार बच्चू कडू ,कॉँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर , राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके व भाजपचे नेते तुषार भारतीयांसाठी अतिशय प्रतिष्ठेची लढाई आहे . यशोमती ठाकूर सोडल्या तर इतर तिघांनी आपापल्या पक्ष नेतृत्वाकडे कानाडोळा करून राणांविरोधात उघडपणे तलवार उपसली आहे . हे चारही नेते संपूर्ण ताकतीने या लढाईत भिडले आहे .बच्चू कडू यांनी नवनीत राणांचे डिपॉझिट जप्त करून दाखवू अशी प्रतिज्ञा केली आहे . प्रहारचे उमेदवार दिनेश बूब असले तरी बच्चू कडू हे स्वत:ची निवडणूक असल्याप्रमाणे पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांची संपूर्ण जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे . माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख , काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व इतरही सर्व लहान मोठ्या नेत्यांना सोबत घेऊन त्या जीवाचे रान करत आहेत . संजय खोडके यांचा पक्ष महायुतीत असला तरी प्रचाराला सुरुवात होत नाही तोच राणांनी पोस्टरवर फोटो वापरल्याबद्दल जाहीर तंबी देऊन आपला फोटो प्रचारासाठी वापरायचा नाही, अशी समज देताना आपण उघडपणे विरोधात आहोत, हे खोडकेंनी स्पष्ट केले होते. अमरावतीच्या राजकारणात राणांनी खोडके यांना राजकारणातून नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. खोडके ते विसरले नाही. विसरणार नाहीत.