पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी नेमकं मुद्द्यांवर बोलत नाहीत , पण संसदीय लोकशाहीत अपेक्षित असलेल्या उमदेपणानं वागतात तरी का ? याही प्रश्नाचं उत्तर ठोस ‘हो’ असं मिळत नाही . भाजप आणि एकूणच संघ परिवाराला पंडित जवाहरलाल नेहरु यांचा द्वेष वाटतो . ( कुणाचाही टोकाचा द्वेष करु नये आणि उदात्तीकरणही करु नये , या मताचा मी आहे , पण ते असो . ) तरी संसदीय उमेदपणाचं उदाहरण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचंच द्यायला हवं . लोकसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या प्रतिपादनासाठी ‘Lies’ ( खोटे ) हा शब्दप्रयोग केल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका झाली . त्यानंतर अत्यंत उमदेपणानं त्याबद्दल नेहरु यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे . हा शब्दही नंतर त्यांनी मागे घेतला म्हणून तो स्वाभाविकपणे संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आलेला आहे . ही घटना २ जून १९५१ची आहे . ( माझा जन्म तरी तेव्हा झालेला होता का , मी तेव्हा संसदेत हजर होतो का , असे वायफळ आणि बालिश प्रश्न उपस्थित करु नयेत कारण , हा संदर्भ : पुस्तकाचे नाव – History of the Parliment of India , लेखक- Subhash Kashyp , असा आहे . ) संसदेचा शिष्टाचार आणि परंपरा जपण्याबाबत पंडित नेहरु किती काटेकोर होते हे समजण्यासाठी हा संदर्भ दिलेला आहे .