प्रचार नव्हे उन्माद आणि अकाडतांडवही !

-प्रवीण बर्दापूरकर

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराने गाठलेली पातळी बघताना २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपले नेते आणखी खाली उतरणार याबद्दल व्यक्त केलेली भीती खरी ठरली आहे . आपल्या देशात आजवर झालेल्या सर्वच निवडणुकातली ‘उन्मादी     आरोप-प्रत्यारोपाची , असभ्य व लाज आणणारी’ पातळी गाठणारी अशी २०१९च्या लोकसभा निवडणुकीची नोंद होणार याबद्दल आता कोणतीही शंका विवेकी जनांच्या मनात उरलेली नाही . निवडणुका म्हटलं की आक्षेप घेतले जाणार , विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर आरोप होणार आणि सत्ताधारी त्या आरोपांचं खंडन करणार हे ओघानं आलंच . पण , या निवडणुकीत जे कांही प्रचाराच्या नावानं घडत आहे ते , अपप्रचाराच्याही सीमा ओलांडणारं आहे ; आपल्या राजकीय नेत्यांत शिष्टाचारची किमान चाड व सुसंस्कृतपणा नावालाही शिल्लक उरलेला नाही , याची खात्री पटवून देणारं सध्याचं चित्र आहे . प्रचाराची खालची जी पातळी विरोधकांनी गाठली त्यापेक्षा दहा पट खालच्या पातळीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेते उतरले आहेत आणि म्हणे हा साधन-सुचिता जपणारा पक्ष आहे ! दोन्ही बाजूंच्या समर्थक/भक्तांकडून त्यांच्या नेते आणि पक्षाच्या या प्रचाराचं अत्यंत चुकीचे दाखले देत हिरीरिनं केलं जाणारं समर्थन तसंच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना प्रतिस्पर्धी ऐवजी एकमेकाचे हाडवैरी समजताहेत , हे कांही आपली लोकशाही दिवसेदिवस सुदृढ होत असल्याचं लक्षण मुळीच नाही .

अध:पतन ही एक मूलभूत प्रक्रिया असते हे खरं असलं तरी , जेव्हा अध:पतन व्यक्तीगत किंवा सामूहिक पातळीवर इतक्या प्रचंड वेगानं होतं तेव्हा , कुणीही विवेकी आणि संवेदनशील माणूस साहजिकच अस्वस्थ होतो पण , यापेक्षाही जास्त गंभीर असतं ते येणार्‍या/नवीन पिढीच्या मनात त्याविषयी निर्माण होणारी घृणा . मतदानाच्या न वाढणार्‍या टक्केवारीला हेही एक कारण असावं , असं किमान माझं तरी मत आहे . निवडणुकीच्या रिंगणात सुसंस्कृत , शिष्टाचारी आणि विवेकी उमेदवार अभावानंच दिसत असल्यानं संवेदनशील , विचारी माणूस आणि तरुण वर्ग जर मतदांनापासून जर दूर राहिला तर त्यांना दोष देणार तरी कसा ? याच मानसिकतेतून जर ‘नोटा’ची चळवळ जोर पकडत असेल तर ती उभारणार्‍यांवर टीका करता येणार नाही .

खुनी , तू चोर-तुझा बाप चोर , दरवडेखोर , जल्लाद , मांड्या-चड्ड्या , महिला उमेदवाराच्या अंतर्वस्त्राचे रंग , अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या पोलिसांचा आणि जवानांच्या हुतात्म्यांची खिल्ली व अक्षम्य अवमान , झालेला अतिरेकी हल्ला सरकारनेच घडवून आणल्याचे दावे…अशी किती उदाहरणे द्यायची ? सत्ताधार्‍यांनी जात आणि धर्माचा वापर प्रचार आणि उमेदवार निवडताना केला असा दावा करणार्‍या विरोधी पक्षांनी काय कमी दिवे पाजळले आहेत ? नागपूर लोकसभा मतदार संघात निवडणुकीला कुणबी व कोष्टी विरुद्ध ब्राह्मण , शिरुर मतदार संघात मराठा विरुद्ध माळी असा रंग देणारे आणि त्याआधारे मत मागणारे ‘सेक्युलर’ कसे ? यज्ञ आणि आणि धार्मिक विधी जाहीरपणे करणारे ‘वाचाळेश्वर’ दिग्विजयसिंह यांच्यामुळे अब्रू गेली ती काँग्रेसची . भाजपनं साध्वीला उमेदवारी दिली म्हणून टीका करणार्‍या काँग्रेसनं रत्नागिरीत सनातनच्या समर्थकाला उभं करण्याचं समर्थन कसं काय होऊ शकतं ? एका मोठ्या पक्षाच्या अध्यक्षाला ‘पप्पू’ म्हणणं जितकं अशोभनीय व अवमानकारक आहे त्यापेक्षा जास्त अशोभनीय व अवमानकारक देशाच्या पंतप्रधांनांना ‘फेकू’ आणि ‘चोर’ म्हणणं आहे . कमरेचं गुंडाळून ठेऊन ही अशी पातळी गाठल्यानं भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची लायकी जगाला नक्कीच समजली असेल आणि त्यांची नव्हे तर आपल्या देशाची जगभर नाचक्की झाली असणार  .

केवळ आमची टीका योग्य आणि विरोधक उठवळ हा समज तर निर्भेळ ढोंगीपणा आणि आत्मप्रतारणाही आहे . त्यांनी बोफोर्स काढलं म्हणून यांनी राफेलचे ढोल बडवायचे आणि न्यायालयानं चौकीदार चोर आहे या म्हणण्यावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा करुन मग न्यायालयाची माफी मागायची तसंच त्याच्या माजी पंतप्रधान पित्याने हवापालटासाठी कुठे आणि ‘कशी’ सहल केली होती याची उजळणी करणं , हे दोन्ही प्रकार केवळ निंदनीयच नाही तर हिडीसही आहेत ! या संदर्भात निवृत्त व्हाइस अॅडमिरल विनोद पसरिचा आणि निवृत्त नौदल प्रमुख रामदास यांनी दिलेली माहिती वाचल्यावर ते नरेंद्र मोदी किती खुजे आहेत , हे वेगळं सांगायची गरजच राहत नाही . म्हणूनच त्यांचा उल्लेख ताज्या अंकात ‘इंडिया’ज डिव्हायडर-इन-चीफ’ ( भारतात दुफळी निर्माण करणारा नेता ) असा उल्लेख जागतिक किर्तीच्या ‘टाईम’ या नियतकालिकानं केला असावा !

अनेक नामवंत विधिज्ञांची फौज दिमतीला असतांनाही न्यायालयानं चौकीदाराला चोर म्हटलेलं नाहीये , हे कुणालाच समजू नये हे जसं बौद्धिक दारिद्रय आहे तसंच कांही काँग्रेस पक्षाचेच नेतेच राहुल गांधी यांना अडचणीत आणू इच्छितात का , हे शोधण्याची गरज निर्माण करणारं आहे . त्यामुळे तोंडघशी पडले ते राहुल गांधी आणि कोलीत मिळालं भाजपच्या हाती . दिलगिरी की क्षमा की बिनशर्त क्षमा , हाही घातला गेलेला घोळ मुळीच भूषणावह नव्हता ; या प्रकरणात आततायीपणा आणि बुद्धी कुशाग्रतेचा अहं भोवला . आधीच न्यायालयाची क्षमायाचना केली गेली असती तर राहुल गांधी यांचं नेतृत्व उजळून निघालं असतं . याचा अर्थ , न्यायालयांनं ( सुमारे पंचवीस वर्षानी ) बोफोर्स प्रकरणात मुक्त केल्यावरही राजीव गांधी यांना चोर म्हणण्यात सभ्य आणि सुसंस्कृतपणाचा किंचितही अंश नाही ; तो एक बुद्धीभ्रम आहे , हे आपण समजून घ्यायला हवं . असं म्हणणारे नेते देशाची मान उंचावूच शकत नाहीत . राहुल गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाबाबतची बकवासही उन्मादाचंच प्रतीक आहे . अशा याचिका एक तर प्रसिद्धीसाठी केल्या जातात किंवा त्या ‘करायला’ कशा लावल्या जातात हे उघड गुपित आहे . अशा याचिका करणारांना न्यायालयांनं जबर दंड तर ठोठवायला तर हवाच शिवाय , जाहीर फटक्यांची शिक्षा करायला हवी त्याशिवाय अशा थिल्लर प्रकारांना आळा बसणार नाही . ( हे कडवटपणे लिहिलंय , फटके मारण्याची शिक्षा देण्याची तरतूद आपल्याकडे नाही हे प्रस्तुत पत्रकारला माहिती आहे , तरी…)

मतदान यंत्रे मॅनेज केली जाऊ शकतात या दाव्यातील राजकीय स्वार्थ एव्हाना पुरेसा स्पष्ट झालेला आहे . विजय मिळाला तर तो लोकशाहीचा , आपल्या पक्ष आणि नेत्याच्या लोकप्रियतेचा आणि पराजय  झाला तर तो मतदान यंत्रे मॅनेज केल्यामुळे , ही सर्वपक्षीय   राजकीय चिखलफेक आणि अकाडतांडव करणारे कांही ‘व्रती’ राजकारणी गेल्या कांही निवडणुकांपासून वाढले आहेत . २०१४पूर्वी त्यात भारतीय जनता पक्ष आघाडीवर होता आता काँग्रेस , राष्ट्रवादी , तेलगू देसम , नॅशनल कॉन्फरन्स आदी वीस पेक्षा जास्त पक्षांचे नेतेही त्या व्रतात सहभागी झालेले आहेत . २००४च्या निवडणुकीत पराभव झाल्यावर आता भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले बनवारीलाल पुरोहित यांनी ( तेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती !)  मतदान यंत्रे मॅनेज होत असल्याचा आरोप करुन केलेली आदळआपट आणि केलेली न्यायालयीन लढाई किमान पत्रकार तरी विसरलेले नाहीत . २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला बंपर विजय मिळाल्यावर ते सर्व दावे सोयीस्करपणे विसरुन तेच बनवारीलाल पुरोहित राज्यपालपदाच्या खुर्चीत विराजमान झाले आणि मतदान यंत्र मॅनेज होत असल्याचा आरोप त्यांनी रेशीम बागेतल्या बासनात गुंडाळून ठेवला ; हे या राजकीय अकाडतांडवाचे वर्तमान आहे , हे विसरता येणार नाही .

या मालिकेतले ‘नवे व्रतधारी’ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि तेलगू देशमचे चंद्राबाबू नायडू यांना तर मतदान यंत्रे मॅनेज होतात याची दिवसाढवळ्या स्वप्न पडू लागली असल्यासारखी स्थिती आहे . मोगलांच्या सेनेला पाण्यात तसंच स्वप्नातसुद्धा संताजी आणि धनाजी दिसत असं जे म्हटलं जातं , तसं सध्या शरद पवार यांचं मतदान यंत्राच्या बाबतीत झालेलं आहे . ज्येष्ठतम नेते शरद पवार हे जसे बहुपेडी अतुलनीय कुशल आणि दूरदृष्टीचे नेते व प्रशासक आहेत तसंच ते राजकरणी म्हणून ‘शहनशाह-ए-संभ्रम’ आहेतच म्हणा ! कवीवर्य ग्रेस आणि शरद पवार यांच्यात या बाबतीत साम्य आहे . कविता लिहून ग्रेस मोकळे होत ; त्या कवितेच्या अर्थ तसंच प्रतिमांबाबत वाचक , समीक्षक काथ्याकूट करत ( अजूनही करतात !) , त्यांच्यात घनघोर चर्चा , वाद-प्रतिवाद रंगत आणि इकडे कवीवर्य ग्रेस मात्र मौन पाळत तो सर्व गलबला मस्त एंजॉय कसे करत असत , याचा प्रस्तुत पत्रकार साक्षीदार आहे . अगदी तस्सच ज्येष्ठतम नेते शरद पवार यांचं आहे . शरद पवार सोडून त्यांच्या राजकीय वक्तव्याच्या अर्थ व पडसादांची पतंगबाजी कायमच त्यांच्या भक्तात आणि विशेषत: माध्यमांत सुरु असते ! राष्ट्रवादीचे नांदेड येथील तत्कालीन नेते डॉ. माधव किन्हाळकर यांनी या संदर्भात दिल्लीपर्यन्त जाऊन जो न्यायालयीन लढा उभारला तेव्हा त्यांना बळ पुरवण्याची किमानही तसदी शरद पवार यांनी घेतली नाही उलट , डॉ. किन्हाळकर यांची इतकी उपेक्षा केली की शेवटी ते पक्ष सोडून गेले . ही यंत्रे मॅनेज करून दाखवावीत हे देशाच्या निवडणूक आयोगानं दिलेलं आव्हानही शरद पवार यांनी स्वीकारुन निवडणूक आयोगाला तोंडघशी पाडणं टाळलं . आता मतदान यंत्रे मॅनेज होत असल्याची जाग शरद पवार यांना येण्यामागे कोणत्या भीतीचं सावट दाटून आलेलं आहे , हे उभा आणि आडवाही महाराष्ट्र चांगला जाणून आहे !

निवडणूक म्हटल्यावर कुणाचा तरी जय आणि कुणाचा तरी पराजय होणारच . २०१९ची लोकसभा निवडणूक मात्र जय-पराजयापेक्षा घसरलेल्या उन्मादी प्रचारासाठी आणि नेत्यांच्या उन्माद , असुसंस्कृतपणा आणि वाचाळपणासाठी लक्षात राहील…

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

9822055799
Previous articleमोहब्बत को समझना है तो नासेह ख़ुद मोहब्बत कर
Next articleहिंदू पाकिस्तानच्या मार्गावर काही पावले…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.