तरी भाजपला चिंता बाळगण्याचं कारण नाही असं जे प्रतिपादन आहे त्याचं कारण म्हणजे , सध्याच्या घटकेला हा एकमेव पक्ष संघटनात्मक पातळीवर शक्तिमान आहे , निवडणूक लढवण्यासाठी जी काही ‘साधन सामग्री’ आवश्यक असते ती भाजपकडे विपुल प्रमाणात आहे आणि नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व हे या पक्षाचं मुख्य भांडवल आहे . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पक्षांतर्गत आव्हानच नाही , इतकं हे नाणं सध्या तरी खणखणीत आहे . ( भाजपत पक्षांतर्गत कुरबुर म्हणा की असंतोष की खदखद नाही , असं मुळीच नाही पण उद्रेक व्हावा असं त्याचं स्वरुप अजून झालेलं नाही . ) शिवाय भारतात असलेला ५२ टक्के मध्यमवर्ग बहुसंख्येनं भाजप आणि विशेषत: नरेंद्र मोदी यांच्याकडे झुकलेला आहे आणि तीच भाजपची मोठ्ठी ताकद आता झालेली आहे . स्पष्टपणे सांगायचं तर नरेंद्र मोदी यांची ‘मोहिनी’च या वर्गावर पडलेली आहे ; मोदी यांनी कांही चूक केलेलीच नाही किंवा ते कांही चुका करतात किंवा समाजात संस्कृतीच्या नावाखाली धार्मिक ध्रुवीकरण करतात यावर विश्वासच ठेवायला तयार नाही , इतका हा मध्यम वर्ग नरेंद्र मोदी नावाच्या संमोहनाखाली आहे . म्हणूनच मणिपूरमधे मानवतेला काळीमा फासणारं कांही घडलं आहे आणि त्याचा विरोध केला पाहिजे असं न वाटणं हे त्याचंच निदर्शक आहे .