

माणसं सोशल होता होता, एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी धडपडताना, मन प्रसन्न राहण्यासाठी जे जे म्हणून करायला हवं, तेच करायचं माणसं विसरून जातायेत. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकून पडल्याने आईबाबा काहीतरी सांगत असले तरी ते मेंदूपर्यंत पोचत नाही. मुलांचे प्रश्न ऐकू येतात पण समजत नाहीत. त्यांना उत्तर द्यायला स्क्रीनमधून फुरसत मिळत नाही. इतरांचे प्रणय ऑनलाईन जगतात बघता बघता स्वतःच्या आयुष्यातली प्रणयाची उब माणसं विसरून जातात. त्यांचं एकमेकांवर प्रेम नसतं असं नाहीये पण स्पर्शाची गंमत विरत जाते. माणसं एकटी होतात आणि काहीशी एकाकीही! मग तो एकटेपणा घालवण्यासाठी पुन्हा सोशल मीडियाकडे वळतात. एक विचित्र कोंडी या सगळ्यामुळे तयार होते. जी अनेकदा लक्षातही येत नाही. माणसं निराशेने ग्रासली जातात. ही निराशा घालवायला मग पुन्हा सोशल मीडियाच्याच छायेत जातात. जात राहतात. आनंद मिळत नाही. नैराश्याचे फास मात्र आवळले जातात.