मला फोन आला तेव्हा हे होऊनही सहा महिने उलटून गेले होते. मी काळजी करेन म्हणून माझ्यापासून सगळं लपवण्यात आलं होतं. माझ्या आईचं आणि माझं नातं तसही इतर आई-मुलीसारखं न्हवतं. मी बाबांची लाडकी. त्यामुळे आईशी फार जुजबी बोलणं होत असे. काय खाल्लंस, बरी आहेस का – एवढंच. गेल्या काही महिन्यांपासून मी आई ला फोन द्या म्हटल्यावर बाबा टाळाटाळ करायचे, ती बाहेर गेलीये, वॉशरूम मध्ये आहे, शेजाऱ्यांशी बोलतेय अशा कारणांचा मलाही संशय येऊ लागला होता. कधी बोलणं झालंच तर आईचा आवाज खूप मंद, झोपेंतून उठल्यासारखा वाटायचा. तेच दोन जुजबी प्रश्न, पोटात एक विचित्र फिलिंग यायची पण तरीही हे मला अपेक्षित न्हवतं.
त्यांनंतर तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. यावर मी आजही लिहू शकत नाही एवढी ती आठवण ताजी आहे. माझ्या बाबांनी जर तिच्यावर घारीसारखी नजर ठेवली नसती तर आम्ही आईला खूप आधीच शरीरानेही मुकलो असतो. या सगळ्यातून जाताना घरचं वातावरण किती नॉर्मल ठेवता येईल ते आम्ही पाहिलं पण अजूनही ते मळभ आहे. आमच्या सगळ्यांच्या मनावर आहे. आणि आई हयात असे पर्यंत ते राहिलंच याच्याशी आता आम्ही तिघांनी तडजोड करून घेतलीये पण या बाबतीतलं सगळं श्रेय हे बाबांना आणि माझ्या लहान बहीणीला आहे
यातून काहीही करून बाहेर पडायचं होतं. माझं आयुष्य परफेक्ट नाही, पण ते तसंच असावं यामागचा अट्टाहास सोडायचा होता. सगळ्या जगाला, त्यांच्या एक बाई म्हणून असणाऱ्या अपेक्षांना फाट्यावर मारून मला जगायचंच होतं म्हणून मग मी पुण्यात शोधाशोध सुरु केली आणि CBT (cognitive behavioral therapy) च काउन्सेलिंग चालू केलं. सुरुवातीला खूप छोट्या डोस मध्ये चालू केलेले अँटी डिप्रेसंटस बंद केले कारण त्याचे उलटे परिणाम दिसायला लागले तर त्याची मला गरज नाही असं निदान केलं गेलं. लंडनला आल्यावर तर चिंतेची बाबच नव्हती. इथे या बाबतीत कमालीची जागरूकता आहे. इथे येऊन मी NHS तर्फे चालवल्या जाणाऱ्या IAPT (Improving Access to Psychological Therapies) मध्ये नावनोंदणी केली. मी अजूनही त्याच्या वेटिंग लिस्ट वर आहे कारण मी प्रिकौशनरी मेजर्स घेतेय, माझ्यात नैराश्याची कोणतीही ऍक्टिव्ह लक्षणं नाहीत म्हणून पण तरीही तिथल्या काउन्सिलरचा दार दोन महिन्यांनी खबरबात काढायला फोन येतोच. त्या मुलीशी अशाच मग हवा पाण्याच्या गप्पा होतात पण तेही किती गरजेचं आहे हे तो फोन कॉल झाल्यानंतर जाणवतं.
शेवटी सगळ्यात महत्वाचं – आपण दिवसाचे चोवीस तास, वर्षाचे ३६५ दिवस आनंदी असायचा हवंय या अपेक्षेपासून दूर राहा. रडा, भेका, चुप्प रहा, मरणाची बडबड करा पण ह्या भावना आहेत आणि आपण त्यांवर पुरून उरू शकतो हे लक्षात ठेवा. तुम्ही इतर कोणासाठीही महत्वाचे असण्याची गरज नाही. आई वडील, भावंडं, नवरा/बायको, मुलं, शेजारी पाजारी इन्क्लुडेड. तुम्ही स्वतः साठी महत्वाचे आहात. दुनियेत तुमचं योगदान आहे, नेहमीच राहणार आहे. ते लहान कि मोठं याची पर्वा करू नका. आयुष्य सुंदर आहे, ते त्या क्षणी नसेल तर त्यावर हळूहळू लहानमोठा मार्ग काढता येऊ शकतो, प्रत्येक लहान मोठी चूक सुधारता येऊ शकते याची जाणीव ठेवून स्वतःचं स्वतःला माफ करून टाका. तुम्हाला अगदी न आवडणारी माणसंही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात स्ट्रगल करत आहेत याचं भान असू द्या. ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे’ हे लक्षात ठेवा