कुतूहल निर्माण करणारा कुंभमेळा

-अविनाश दुधे

जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव अशी ख्याती असलेल्या कुंभमेळ्यास हरिद्वार येथे आज महाशिवरात्रीच्या दिवशी पहिल्या शाही स्नानाने सुरुवात झाली. यावेळी कोरोनामुळे २८ एप्रिलपर्यंतच हा कुंभमेळा चालणार आहे. या कालावधीत जवळपास तीन कोटी लोक गंगेत डुबकी लावतील, असा अंदाज आहे. आज पहिल्या शाही स्नानाच्या दिवशी २२ लाखांपेक्षा अधिक लोकांनी गंगेत स्नान केले . तुम्ही धार्मिक असा वा नसा, तुमचा पुराणातील भाकडकथांवर विश्‍वास असेल-नसेल, तुम्हाला ढोंगी, दांभिक साधू व त्यांच्या निरर्थक कर्मकांडाबद्दल चीड असेल, हा संपूर्ण प्रकार म्हणजे शासकीय संपत्तीचा अपव्यय आहे, असेही तुम्हाला वाटत असले तरी कुंभमेळा नावाचा प्रकार अचंबित करणारा, कुतूहल निर्माण करणारा आहे, हे निश्‍चित. लाखो-करोडो माणसं एका अद्भुत भावनेनं प्रत्यक्षात घाणेरड्या असलेल्या पण पवित्र मानल्या जाणार्‍या नदीत स्नान करतात आणि कृतकृत्य होऊन घरी परततात, हे दृश्य जगभरातील माणसांना आकर्षित तर करतंच; पण त्यांना कुंभमेळ्यात खेचूनही आणतं. त्यामुळेच अलीकडच्या काही वर्षांत परदेशी पर्यटक मोठय़ा संख्येने कुंभमेळ्याला हजेरी लावायला लागले आहेत.

कुंभमेळा नावाचा हा प्रकार एकंदरीतच अतिशय रोचक व समजून घेण्याजोगा आहे. भारतात  हरिद्वारसोबत , अलाहाबाद,उज्जैन व महाराष्ट्रातील नाशिक या चार शहरांमध्ये १२ वर्षांतून एकदा कुंभमेळ्याचं आयोजन होते. पुराणकथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानवांमध्ये झालेलं युद्ध १२ दिवस चालले. त्यावेळी समुद्रातून अमृताचा कुंभ जेव्हा बाहेर आला तेव्हा अमरत्व देणार्‍या त्या अमृतासाठी देव आणि दानवांमध्ये चढाओढ सुरू झाली. धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन आकाशात उडू लागले. त्यावेळी देव आणि राक्षसांनी त्यांचा पाठलाग केला. या पळापळीत कुंभातील अमृताचे थेंब  हरिद्वार, अलाहाबाद , उज्जैन व नाशिक या चार ठिकाणी पडले. तेव्हापासून ही स्थानं सर्वात पवित्र तीर्थस्थळं मानली गेली आहेत.

या चारही ठिकाणी होणार्‍या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी लाखो-करोडो माणसं का धडपडतात याचं मूळसुद्धा पुराणातल्या कथांमध्येच आहे. अमृतकुंभातील अमृताचे थेंब हरिद्वार, अलाहाबादमधील गंगा, उज्जैन येथील नर्मदा तर नाशिकच्या गोदावरी नदीत पडल्याचं मानले जात असल्याने कुंभमेळ्यादरम्यान या नद्यांमध्ये स्नान केल्यास मोक्षप्राप्ती होते, अशी समजूत आहे. विष्णुपुराणामध्ये शंभर वाजपेयी, हजार अश्‍वमेध यज्ञ व एक लाख पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य एकट्या कुंभमेळ्यातील स्नानातून मिळतं, असं सांगितलं गेलं आहे. माघ महिन्यात केलेले शंभर, कार्तिक महिन्यात केलेले हजार गंगास्नान आणि वैशाखातील करोडो नर्मदास्नानापेक्षा कुंभमेळ्यातील स्नान तत्काळ मोक्ष मिळवून देते, अशी समजून भाबड्या व श्रद्धाळू हिंदू मनांमध्ये हजारो वर्षांपासून आहे. त्यामुळेच शरीर गोठवून टाकणार्‍या थंडीत, भाजून काढणाऱ्या उन्हात व  प्रचंड पाऊस कोसळत असतानाही उघड्या शरीराने गंगा, गोदावरी वा नर्मदेत डुबकी घेताना भक्तांच्या चेहर्‍यावर एक अपूर्व आनंद दिसतो.

शाही स्नान काय असतं?

हरिद्वारच्या कुंभमेळ्यात चार  शाही स्नान होणार आहेत.  आज महाशिवरात्रीला पहिले शाही स्नान झाले . १२,  १४ व वैशाख पौर्णिमेच्या दिवशी २७ एप्रिलला या तीन दिवशी उर्वरित तीन शाही स्नान होतील . या दिवशी लाखो भक्त गंगेत डुबकी लावतील. हे ‘शाही स्नान’ काय भानगड आहे, हे अनेकांना कळत नाही. प्रख्यात राजपूत योद्धा पृथ्वीराजसिंह चौहान याने मुसलमान आक्रमकांविरुद्ध लढण्यासाठी अतिशय लढाऊ मानले जाणार्‍या नागा साधूंची मदत घेतली होती. या साधूंनी अभूतपूर्व पराक्रम गाजवत मुसलमानांचा पराभव केला. त्यामुळे खूश होऊन पृथ्वीराजसिंहने आपली राजगादी, सारं वैभव व सैन्य एक दिवसासाठी साधूंना दिलं होतं. त्या दिवशी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सारे साधू ढोलताशांच्या गजरात, प्रचंड थाटामाटाने रथावर, हत्तीवर स्वार होऊन गंगास्नानासाठी गेले होते. तेव्हापासून ही शाही स्नानाची परंपरा सुरू झाली आहे.

कुंभमेळ्यात सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र हे साधूच असतात. वेगवेगळे पंथ, परंपरा व उपासना पद्धती मानणारे हे साधू वेगवेगळ्या आखाड्यांशी जोडले गेलेले असतात. (कपाळावरील गंधामुळे साधू कुठल्या पंथाचे आहेत, हे ओळखता येते.) एकूण १३ मुख्य आखाडे आहेत. यामध्ये १0 शैव पंथांचे तर ३ वैष्णव पंथांचे आहेत. जुना आखाडा, अखंड आव्हान, तपनिधी निरंजन, आनंद, आव्हान, अग्नी, महानिर्वाणी, अटल, उदासीन, निर्मल, निर्वाणी, निर्मोही, दिगंबर अशी आखाड्यांची नावे आहेत. कुंभमेळ्यात या आखाड्यांना वेगवेगळी जागा उपलब्ध करून दिली जाते.  कोणत्या आखाड्यातील साधू कोणत्या क्रमाने स्नानाला जातील हेसुद्धा आधीच निश्‍चित झाले असते. कोण आधी स्नान करायचं यावरून भूतकाळात साधूंमध्ये प्रचंड मारामारी व कत्तलही झाली आहे. २00 वर्षांपूर्वीच्या एका कुंभमेळ्यात निर्मल आखाड्याच्या साधूंना अगोदर स्नान करावयास न मिळाल्याने झालेल्या हाणामारीत जवळपास पाच हजार साधूंचा मृत्यू झाला होता.

इंग्रजांच्या राजवटीतही साधूंची स्नानासाठीची चढाओढ त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय होती. बर्‍याच प्रयत्नानंतर इंग्रजांना आखाड्यांच्या स्नानासाठीचा क्रम ठरविण्यात यश आले. मागील नाशिकच्या कुंभमेळ्यापासून साध्वींनीही आम्हाला स्नानासाठी वेगळी जागा तसेच साधूग्राममध्ये निवासासाठी स्वतंत्र जागा मिळावी, अशी मागणी लावून धरली आहे  . कुंभमेळ्यात वेगवेगळ्या प्रथा-कुप्रथा कसोशीने जपल्या जातात. कर्मकांडांना तर ऊत येतो.  श्राद्ध, पिंडदान असे अनेक वेगवेगळे विधी, पूजा, यज्ञ येथे चालतात . शेकडो वर्षांपासून हे प्रकार सुरू आहेत. मराठवाडा व दक्षिण महाराष्ट्रातील अनेक मराठी जोडपे कुंभमेळ्यात पुन्हा एकदा एकमेकांशी विवाहबद्ध होतात. अशा चित्रविचित्र प्रथा-परंपरा कुंभमेळ्यादरम्यान पाहावयास मिळतात. हे एक वेगळंच जग आहे. कुंभमेळ्यादरम्यान तुमचंही मत काहीही असलं तरी हे औत्सुक्यपूर्ण जग पाहण्यासाठी कुंभमेळ्याला एकदा अवश्य भेट द्यायला हवी.

नागा साधूंचं अद्भुत विश्‍व

साधूंमध्ये नागा साधूंबद्दल सर्वाधिक औत्सुक्य असते. जवळपास संपूर्ण नग्न राहणारे, संपूर्ण शरीराला राख चोपडणारे आणि हातात शस्त्र बाळगणार्‍या या नागा साधूंबद्दल भक्तांना आदर असण्यासोबतच भीतीही असते. नागा साधूंजवळ तलवार व चिमटा असतोच. आपल्या जटा ते झेंडूची फुलं आणि रुद्राक्षांनी सजवितात. कपाळावर टिळा लावण्याकडे नागा साधूंचे बारीक लक्ष असते. टिळा लावण्याच्या शैलीत ते कधीही फरक पडू देत नाही. यांचा शृंगार पाहण्याजोगा असतो. असं म्हटलं जाते की, स्त्रिया १६ प्रकारचा शृंगार करतात, मात्र हे १७ प्रकाराने स्वत:ला सजवितात. मात्र या नागा साधूंशी पंगा घेण्याचं सारेच टाळतात. कारण हे अतिशय शीघ्रकोपी असतात. क्षुल्लक कारणामुळे ते संतापतात. प्रसंगी शस्त्रांचा वापरही करतात.

नागा साधूंना साधू होण्याअगोदर अतिशय कठीण परीक्षा पास करावी लागते. एखाद्या व्यक्तीला साधू व्हायचं असेल, तर एकदम त्याला दीक्षा दिली जात नाही. आधी तो साधू का होऊ इच्छितो, हे तपासले जाते. त्यानंतर त्याच्या ब्रह्मचर्याची तपासणी होते. संबंधित व्यक्ती वासना आणि इच्छांपासून पूर्ण मुक्त झाला अशी आखाडयाची खात्री पटल्यानंतर त्याचं स्वत:च श्राद्ध आणि पिंडदान केलं जातं. त्यानंतर २४ तास त्याला अन्नपाणी दिलं जात नाही. त्यानंतर आखाडयाच्या ध्वजाखाली त्याचं गुप्तांग निष्क्रिय केलं जातं. हे सारं झाल्यानंतर त्याला साधू म्हणून घोषित केलं जातं.

(लेखक ‘मीडिया वॉच’ वेब पोर्टल व अनियतकालिकाचे संपादक आहेत)

8888744796

Previous articleसांख्य आणि चार्वाक
Next articleबौद्ध आणि चार्वाक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.