त्या निर्णयाला शेतकरी कामगार पक्ष, त्यावेळचा जनसंघ, त्यावेळचे समाजवादी, कम्युनिस्ट यांनी पाठिंबा दिला आणि त्यातून ‘पुरोगामी लोकशाही आघाडी’ नावाचा गट तयार झाला. त्याचे प्रमुख शरद पवार हे झाले. त्या आगोदर घडलेली गोष्ट अशी की, शरद पवार राहत असलेल्या ‘रामटेक’ बंगल्यावर आमदारांची बैठक चालू असताना दिल्लीहून यशवंतराव चव्हाण यांचा फोन आला. त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष स्वर्णसिंग होते. यशवंतरावांचा तो फोन किसनवीरआबा यांनी उचलला. पवारसाहेब यांचे बोलणे होण्यापूर्वीच किसनवीर यांनी चव्हाणसाहेबांना त्यांच्या नेहमीच्या करड्या आवाजात सांगून टाकले की, ‘साहेब, तुम्ही आता फोन करू नका.. निर्णय झालेला आहे..’ पवारसाहेब बोलण्याच्या आत त्यांनी फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी विधानसभेत ४० आमदार विरोधी बाकावरून सत्ताधारी बाकावर आले. दादांनी यशवंतरावसाहेबांना फोन लावला होता.. परतु फोन लागला नाही. तेव्हा दादांनी विठ्ठलराव गाडगीळ यांना चव्हाणसाहेबांच्या घरी पाठवले. चव्हाणसाहेबांनी किसनवीर यांच्याशी झालेले बोलणे सांगून टाकले. नंतर सरकार पडले. त्याचा राग ठेवून शालिनीताई पाटील यांनी १९८० ची लोकसभा निवडणूक चव्हाणसाहेबांच्या विरुद्ध ‘अपक्ष’ म्हणून लढवली. पण, वसंतदादांनाच शेवटी असे जाणवले की, चव्हाणसाहेबांच्याविरुद्ध निवडणुकीचा निकाल जाता कामा नये.. म्हणून शेवटच्या चार दिवसांत दादांनीच मते फिरवली. चव्हाणसाहेब विजयी झाले. तरीही दादा आणि यशवंतरावसाहेब यांच्यात राजकीय अंतर आले. काही वादही झाला. परंतु दोघांची मने फार मोठी होती.
दादांचे सरकार पडले. शरद पवारसाहेब ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. पाच मंत्र्यांचे सरकार त्यांनी चालवले. एका दिवसात खातेवाटप झाले. हे मंत्रिमंडळ तयार करताना त्यावेळचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी दोन अटी घातल्या… जनता पक्षाचे त्यावेळचे अध्यक्ष एस. एम. जोशी यांना मोरोरजीभाईंनी स्पष्टपणे सांगितले की, ‘शरद पवार काँग्रेसच्या विचारांचेच आहेत. त्यांच्यासोबत अर्थमंत्री म्हणून काँग्रेसच्या शंकरराव चव्हाण यांचा समावेश होत असेल तरच मी हा बदल करायला परवानगी देतो. आणि श्री. राजारामबापू पाटील यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला पाहिजे. पण, ‘आमदार नसलेल्याला मंत्री करू नये.’ एस. एम. जोशी यांनी अडचण सांगितली की, ‘आपण एकीकडे सांगता, राजारामबापू यांना मंत्रिमंडळात घ्या… पण, ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत….’ त्यावर पंतप्रधानांनी सांगितले की, ‘त्यांना विधान परिषदेत निवडून आणा. आणि मग मंत्री करा…’ त्यानुसार बापूंचा सर्व मंत्र्यांबरोबर शपथविधी झाला नाही. मुंबई महानगरपािलका मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवायच्या जागेवर बापूंची उमेदवारी जाहीर झाली. शांती पटेल यांनी त्यांना विरोध केला. निवडणूक झाली. बापू विजयी झाले आणि नंतर पवारसाहेबांच्या मंत्रिमंडळात ते सामील झाले. पहिल्या पाच मंत्र्यांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला… त्यात बापूंचा समावेश झाला. या मंत्रिमंडळाने झपाट्याने कामाला सुरुवात केली. वसंतदादा मुख्यमंत्री असताना ५४ दिवस राज्य कर्मचाऱ्यांनी संप केला होता. ४ मार्च १९७८ ते १४ डिसेंबर १९७८ या काळात संप झाला. त्यांची मागणी होती, ‘केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना महागाईभत्ता’… पवारसाहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी राज्य कर्मचाऱ्यांची ही मागणी लगेच मान्य केली. तेव्हापासून ‘डी. ए. अॅज पर सेंटर गव्हरमेंट’ हे तत्त्व मान्य झाले. पहिली घोषणा हीच झाली. नंतरचा मोठा निर्णय … ‘मराठवाडा विद्यापीठाच्या नावाच्या आगोदर’, “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” असा नामविस्तार जाहिर झाला. नामविस्तार या शब्दाऐवजी ‘नामांतर’ असा विषारी प्रचार करून ‘मराठवाडा’ हे नाव हटवले जात आहे… या अपप्रचाराने दंगल भडकली… त्यामुळे तो निर्णय स्थगित ठेवला गेला… आणि तब्बल १५ वर्षांनतर म्हणजे १४ जानेवारी १९९४ रोजी पवारसाहेब चौथ्यांदा मुख्यमंत्री असताना नामविस्ताराचा निर्णय अंमलात आला.
हा सगळा इतिहास गेल्या ४५ वर्षांचा. श्री. शरद पवार यांनी सत्तेच्या बाहेर १९८० ते १९९० पर्यंत १० वर्षे विरोधी बाकावरच काम केले. मनमाेहनसिंग सरकार पराभूत झाल्यानंतर म्हणजे २०१४ पासून २०२३ पर्यंत जवळपास १० वर्षे पवारसाहेब विरोधी पक्षातच आहेत. आणि ते घायकुतीला आलेले नाहीत. सत्तेत असताना आणि नसताना, त्यांच्याभोवती सतत कार्यकर्ते आहेत आणि सामान्य लोकही आहेत. हे गेल्या काही सभांतून महाराष्ट्र पाहतो आहे… पवारसाहेबांना जे सोडून गेले ते अजितदादा १९९१ पासून आतापर्यंत या ना त्या रूपात सत्तेत राहिलेले आहेत. सत्तेशिवाय अजितदादा हा काळ फार कमी आहे. आताही सत्तेसाठीच ही बंडखोरी झालेली आहे. शिवाय १९७८ सालच्या सरकार पाडण्याच्या मागची भूमिका, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी ती बंडखोरी झाली नव्हती. आताची बंडखोरी ही अजित पवार यांची बंडखोरी नाही. तसे असते तर त्यांनी स्वतंत्रपणे पक्ष स्थापन केला असता… नाव… निशाणी स्वतंत्रपणे घेतली असती. पवारसाहेबांचा फोटो वापरल्याशिवाय अजूनही त्यांच्या तथाकथित राष्ट्रवादीचे कोणतेच पोस्टर दिसत नाही. पवारसाहेब हवेतच!. राज ठाकरे हे शिवसेनेतून बाजूला झाले. . त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला. अजितदादांना वेगळा पक्ष काढून स्वत:चे नेतृत्त्व सिद्ध करावे लागेल.अजित पवार यांचे नेतृत्त्व बारामती किंवा पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्रात लोकांनी अजून स्वीकारलेले नाही. निवडणूक झाल्यावरच त्याचा निर्णय होईल. त्यांच्यासोबत आलेला प्रत्येक नेता त्या त्या मतदारसंघापुरता आहे. शिवाय गेल्यावेळी हे जे निवडून आले, तेव्हा त्यांच्यामागे पवारसाहेब होते. आता पवारसाहेबांशिवाय निवडणूक लढवून निवडून येणे ही त्यांच्या नेतृत्त्वाची कसोटी ठरेल. या कसोटीवर कितीजण उतरतील…?