गोवेकर व दमण -दीव, दादरा आणि नगर हवेलीकरांना पोर्तुगाल नागरिकत्वाची संधी

-कामिल पारखे

गोव्यातल्या, तसेच दमण आणि दीव, दादरा, नगर हवेली इथल्या `काही’ नागरिकांना (सर्वांना नव्हे) पोर्तुगालचे नागरिकत्व आणि पासपोर्ट आजसुद्धा मिळू शकतो. मी वर नमूद केलेले प्रदेश एकेकाळी पोर्तुगालच्या वसाहती होत्या. हा परिसर पोर्तुगाल इंडियाचा भाग होता. .दिनांक १९ डिसेंबर १९६१ ला पोर्तुगालची भारतातली सत्ता संपृष्टात आली. मात्र १९६१ पूर्वी या पोर्तुगीज इंडियात जन्मलेल्या लोकांना आणि त्यांच्या पुढच्या तीन पिढींतील लोकांना आजही पोर्तुगीज नागरिकत्व आणि पासपोर्ट मिळू शकतो . पोर्तुगालच्या कायद्यानुसार तो त्यांचा एक हक्क आहे. खूप काळापूर्वी म्हणजे सतराव्या शतकात पोर्तुगीजांचे राज्य असलेल्या वसईतील किंवा पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या आणि ब्रिटिशांना लग्नात आंदण म्हणून मिळालेल्या सात बेटांच्या मुंबईतील लोकांना अर्थात ही सुविधा मिळणार नाही.

पोर्तुगीजांची जुन्या वसाहती असलेल्या गोवा आणि भारतातील इतर प्रदेशांतील अनेक लोकांनां माहित नसलेला हा विषय आता चर्चेला आला आहे. तसे गोव्याबाबत इतर भारतीयांना अनेक गोष्टी माहित नसतात, जसे कि २०२४ च्या निवडणुकीसाठी धार्मिक ध्रुवीकरणाच्या उद्दिष्टाने भाजपतर्फे चर्चेला आणला गेलेला युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा इथे गेल्या एक शतकापासून विनातक्रार अंमलात आहे. पोर्तुगालने आपल्या जुन्या वसाहतीतील लोकांना किंवा त्यांच्या वंशजांना पोर्तुगालचे नागरिकत्व बहाल करण्याचा हा विषय आता चर्चेला येण्यासाठी एक निमित्त घडले आहे. आयरिश रॉड्रिग्स या गोव्यातील कार्यकर्ता आणि वकील असणाऱ्या व्यक्तीने लिस्बन येथील आपल्या भेटीत पोर्तुगालचा पासपोर्ट आणि नागरिकत्व स्वीकारले आणि गोव्यात आणि भारतात या चर्चेला नव्याने तोंड फुटले.इंडियन एक्सप्रेसने अलीकडेच म्हणजे २७ जून २०२३ ला पान एकवर या विषयाला धरुन बातमी छापली होती. बातमीचा मथळा होता- Of 70,000 surrendered passports in India in a decade, 40% were in Goa .

हे आयरिश रॉड्रिक्स नक्की आहेत तरी कोण? त्यांच्या नागरिकत्व बदलाच्या निमित्ताने या मुद्द्यावर राष्ट्रपातळीवर चर्चा का व्हावी? पणजीतल्या मिरामार समुद्रकिनारी असलेल्या धेम्पे कॉलेजात सत्तरच्या दशकात मी बीए च्या पहिल्या वर्षाला होतो, तेव्हा एक चष्माधारी,कुरळ्या केसांचा आयरीश बारावीला होता. मी कॉलेजच्या आर्ट सर्कल या भित्तिपत्रकाचा संपादक होतो, कॉलेजच्या स्टुडंट्स कौन्सिलमध्ये सक्रिय होतो आणि त्यामुळे कॉलेजच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये आणि अख्ख्या स्टाफमध्ये पूर्ण परिचित होतो. कॉलेजच्या वेगवेगळ्या शाखांतील आणि वर्गातील विद्यार्थ्यांशी/ विद्यार्थिनींशी माझा संपर्क असायचा. तेव्हा हा बंडखोर स्वभावाचा हा मुलगा लक्षात राहिला. नंतरच्या काळात गोवा आणि ‘द नवहिंद टाइम्स’ सोडून मी पुण्याला आलो. येथील इंग्रजी दैनिकांत कामाला लागलो तरी आयरीशचे नाव गोव्यातल्या बातम्यांतून वाचत राहिलो. मागे काही महिन्यांपूर्वी समाजमाध्यमांवर मी त्याच्यावर लिहिले होते. विषय राष्ट्रपातळीवरचा होता. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीच्या संदर्भात गोव्यातल्या एका हॉटेलच्या परमिटबाबत वाद होता आणि सामाजिक कार्यकर्ता तसेच वकील या नात्याने आयरीश रॉड्रीक्सने हा मुद्दा लावून धरला होता.

गोव्यात सुपरिचित असलेल्या सामाजिक/ माहिती अधिकार कार्यकर्ता आयरीश रॉड्रीक्सने पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारावे, हा अनेकांना धक्का आहे. या घटनेला साहजिकच बातमीचे मूल्य आहे . वेगवेगळ्या माध्यमांतून, दैनिकांच्या सदरांतून आयरिश रॉड्रीक्स यांच्या या बदललेल्या नागरिकत्वावर आणि भारतातील (आणि इतर जुन्या वसाहतींतीलही) लोकांना पोर्तुगालचे नागरिकत्व देण्याबाबत लिहिले जात आहे.. गोव्यात मी ‘द नवहिंद टाईम्सला’ असताना `गोमंतक’ दैनिकात असलेल्या वामन प्रभू यांनी “पोर्तुगीज पासपोर्टचे मायाजाल याविषयी लिहिले आहे. ॲड आयरिश रॉड्रिग्ज यांच्यासारखा फायरब्रॅन्ड सामाजिक कार्यकर्ताही या मायाजालात अडकल्यानंतर नजीकच्या काळात अजून किती गोमंतकीय नागरिक भारतीय नागरिकत्व आणि मताधिकार डावलून हा मार्ग स्वीकारतील याचा आताच अंदाज बांधता येणार नाही.

पोर्तुगीज पासपोर्टच्या मायाजालात सापडलेल्या अनेकांनी या संधीचे सोने करून आपली आणि कुटुंबियांची आर्थिक स्थिती सुधारली आहे . आज सहा दशकानंतरही गोमंतकीयांचे पोर्तुगीज पासपोर्टचे आकर्षण अजिबात कमी झालेले नाही वा होणारही नाही हेच स्पष्ट चित्र पुढे येत आहे, हे .परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०११ ते २०२२ दरम्यानच्या अकरा वर्षांच्या काळात सत्तर हजारांहून अधिक भारतीय नागरिकानी आपले पासपोर्ट देशातील वेगवेगळ्या विभागीय पासपोर्ट कार्यालयात ‘सरेंडर ‘ केल्याचे ही आकडेवारी सांगते. यामध्ये गोवा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू , दिल्ली आणि चंदीगढ या आठ प्रदेशातील नागरिकांची संख्या ९० टक्क्याहून अधिक भरते आणि त्यातही विशेष असे की भारतीय नागरिकत्व सोडून देऊन पोर्तुगीज पासपोर्ट धारण करणाऱ्यांमध्ये गोमंतकीय नागरिकांची संख्या तब्बल ४0 टक्क्याहून अधिक आहे. जगातील जवळपास १८८ देशांचा व्हिसा पोर्तुगीज नागरिकत्व मिळवल्यानंतर आपसूकच विनासाये उपलब्ध होतो याच कारणावरून जर भारतीय नागरिकत्व झिडकारून पोर्तुगीज पासपोर्ट त्यानी घेतला असेल तर या पासपोर्टमुळे युरोप वा अन्य काही देशातील मिळणाऱ्या रोजगाराच्या वा अन्य संधी साध्य करून घेण्यासाठी युवा पिढीने पोर्तुगीज पासपोर्ट मिळवला तर त्यांचे चुकतेय असे म्हणता येणार नाही

वंश प्रस्थापित करण्यासाठी पोर्तुगीज नागरिक म्हणून आवश्यक प्रमाणपत्रांसह पोर्तुगालमध्ये जन्माची नोंदणी केल्यास लिस्बनमध्ये एक दोन दिवसातच पोर्तुगीज पासपोर्ट कसा उपलब्ध होऊ शकतो यावरही आयरिश रॉड्रिग्ज यांनी आपण स्वीकारलेल्या पोर्तुगीज नागरिकत्वाचे समर्थन करताना स्पष्ट केल्याने अनेकांचा ऊत्साह बळावलाही असेल, पोर्तुगीज पासपोर्ट हा कोणालाही अनेक युरोपियन आणि अन्य ब-याच देशात व्हिसामुक्त प्रवेश देणारा आधार तर आहेच पण त्याचबरोबर पात्रतेच्या वा अफाट गुणवत्तेच्या आधारे कोणीही आपले करिअर करायची महत्वाकांक्षा बाळगून योग्य ती संधी साधण्याचा प्रयत्न करत असेल तर पोर्तुगालचे महाद्वार त्यासाठी खूपच ऊपयुक्त ठरू शकते .‘पोर्तुगालची भारतातली राजवट संपून दहाबारा वर्षे लोटल्यानंतर गोव्यात मी शिकत असताना माझ्या हॉस्टेलमधली काही मुले पोर्तुगीज होती, म्हणजे त्यांचे आईवडील पोर्तुगाल किंवा युरोपात होते आणि या मुलांचे पासपोर्ट्स पोर्तुगीज होते. सज्ञान झाल्यानंतर त्यांना भारतात राहायचे असल्यास पोर्तुगीज पासपोर्टचा त्याग करावा लागणार होता. मात्र वयाची २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच ही मुले भुर्रकन उडून परदेशात गेली. त्यानंतरही माझ्या बरोबर शिकणारी अनेक मुले-मुली अशाचप्रकारे भारत सोडून पोर्तुगालला आणि नंतर इतरत्र स्थायिक झाली आहेत. अनेक नातेवाईकांनी पोर्तुगालने दिलेल्या या सुविधेचा वापर करुन युरोपात नागरिकत्व मिळवले आहे. चारपाच वर्षांनंतर ते गोव्यात, भारतात भेटीगाठीसाठी येत असतात.

कॉमनवेल्थचे सभासद म्हणून किंवा एकेकाळी इंग्लंडची वसाहत असलेल्या भारतातील नागरिकांना युनायटेड किंगडमचे नागरिक म्हणून हक्क बहाल करण्यात आले तर काय होईल? आपल्या देशातील किती नागरिकांना ब्रिटिश पासपोर्ट म्हणजेच ब्रिटिश नागरीकत्व घेणे आवडेल? आमच्या कॉलनीत वीसेक इमारती आहेत आणि प्रत्येक इमारतींमध्ये किमान एका घरातली एक व्यक्ती युरोपात, अमेरिकेत किंवा इतर राष्ट्रांत आहे. यापैकी कुणाचाही कायमस्वरुपी मायदेशी परतण्याचा इरादा नाही. मुंबईत छोट्या घरात राहणारी व्यक्ती ग्रामीण महाराष्ट्रात जेथे पिण्याचे पाणी आठवडातून एकदोनदा येते वीजपुरवठ्याबाबत सतत बोंबाबोंब असते त्या आपल्या गावी परतण्याचा विचारही करत नसतात.सुटीत किंवा इतर वेळी ही मंडळी जेव्हा भारतात येतात तेव्हा ते ज्या देशात राहतात तेथील सार्वजनिक वर्तन, शिष्टाचार, सरकारी कामकाज, वगैरेंबाबत कौतुक करत भारतातल्या भ्रष्टाचारावर, सरकारी कामकाजावर आगपाखड करत असतात. अशा परिस्थितीत इंग्लंडने भारतीयांसमोर नागरिकत्वाचा प्रस्ताव ठेवला तर काय होईल, असे मी विचारले आहे. मला वाटते हे नागरिकत्व मिळवण्यासाठी रांगच रांगा लागतील. आयरिश रॉड्रीग्स प्रकरणानंतर हा विषय चर्चेला आला आहे. आता पुढच्या गोवा दौऱ्यात आयरिशला मुद्दाम भेटावे असे वाटू लागलेय.

(लेखक नामवंत पत्रकार व ब्लॉगर आहेत)
९९२२४१९२७४

[email protected]

Previous articleइतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच्या पुस्तकाचे कव्हर घालू नका…
Next articleहिंदू आणि सर्व धर्म समभाव
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.