ब्रिटिशांनी संस्थानिकांची सत्ता संपवली आणि देश स्वतंत्र झाल्यावर सारी संस्थांनेही भारतात विलीन झाली व केली. पण काही संस्थानांत जुन्या संस्थानिकांचा प्रभाव होता. ते त्या आधारे लोकशाहीतील लोकप्रतिनिधींना आव्हान देऊ लागले. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी संस्थानिकांचा तनखा बंद केला आणि त्या संस्थानिकांच्या विरोधात काँग्रेसने लोकांना बळ दिले. तसे करताना इंदिराजी यांनी या नेत्यांची राजकीय घराणी होऊ नयेत, असे प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाहीत, स्वतः इंदिरा गांधी यांचीही राजकीय घराणेशाही होतीच. आजोबा मोतीलाल नेहरू काँग्रेसचे नेते, वडील जवाहरलाल नेहरू पंतप्रधान, मावशी विजयालक्ष्मी पंडित या राज्यपाल आणि संयुक्त राष्ट्र प्रतिनिधी. इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी हे स्वातंत्र्यसैनिक व राज्यसभेचे सदस्य होते. नेहरू यांचे राजकारण व कार्यपद्धतीचे ते कट्टर विरोधक होते. पं. नेहरू यांनी इंदिरा गांधींना पंतप्रधान केले नाही, पण नेहरू घराण्याच्या पुण्याईचा इंदिरा गांधींना फायदा झालाच. अर्थात तेव्हाही काँग्रेसजन या कुटुंबावर अवलंबून असत. पुढे त्यांनी मुलगा संजय यांना पुढे आणले. संजयच्या अपघाती निधनानंतर त्या घराण्यात सत्तेसाठी पहिली ठिणगी पडली. संजय यांच्या पत्नी मेनका यांनी घरात बंड केले. संजयच्या पश्चात इंदिरा गांधींनी आपणास राजकीय वारस जाहीर करावे, अशी त्यांची इच्छा होती. पण इंदिराजींनी सुनेऐवजी आपले दुसरे पुत्र राजीव यांच्या पारड्यात वजन टाकले. त्याबरोबर अन्याय… अन्याय अशी आरोळी ठोकत मेनका गांधी घराबाहेर पडल्या आणि पुढे काँग्रेसला आव्हान देणाऱ्या जनता दलात जाऊन केंद्रात मंत्री झाल्या. त्याआधी मनेका १९८४ साली राजीव गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवून पराभूत झाल्या. काही काळ अपक्ष राहून नंतर त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. केंद्रात मंत्री झाल्या, पुत्र वरुणही भाजपचे खासदार झाले. पण त्यांचे बंड यशस्वी झाले नाही.
ठाकरेशाहीत व संघटनेत भूकंप घडवून आणणारे बंड शिवसेनाप्रमुखांच्या पुतण्याने म्हणजे राज ठाकरेंनी केले होते. बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी संघटनेतून बाहेर पडून नवनिर्माण सेना स्थापन केली होती. बाळासाहेबांचे खरे वारसदार आपणच, असा त्यांचा दावा होता. त्यांच्यामागे असंख्य शिवसैनिक गेले, लोकांचा पाठिंबाही मिळाला. पण त्यांनी संघटनेकडे हवे तेवढे लक्ष न दिल्याने पक्ष कमकुवत झाला. याउलट उद्धव यांनी पक्ष बळकट केल्याने फुटीनंतरही त्यांची स्थिती बरीच चांगली दिसत आहे.
सत्तासंघर्ष ग्वाल्हेरच्या संस्थानातही झाला. विजयाराजे सिंदिया या जनसंघ-भाजपमध्येच. पण पुत्र माधवराव सिंदिया काँग्रेसमध्ये होते. त्यांचे राजकारण परस्परविरोधी होते. माधवरावांच्या पश्चात वारसदार म्हणून पुत्र ज्योतीरादित्य यांनी केंद्रात व राज्यात मंत्रिपदे भूषवली आणि काँग्रेसची सत्ता जाताच भाजपमध्ये उडी मारली. वसुंधराराजे व यशोधराराजे या विजयराजेंच्या कन्या. वसुंधराराजे राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांचा मुलगा भाजपचा दुष्यन्त खासदार, तर बहीण यशोधराराजे राज्यात मंत्री. या सिंदिया संस्थानिकांनी सत्तेसाठी आपापसात न लढता वेगवेगळ्या पक्षांत जाऊन सत्ता उपभोगली, असे म्हणता येईल.
उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री होते. नंतर पुत्र अखिलेश यादव मुख्यमंत्री झाले. आता खासदार आहेत. पत्नी डिम्पल यादव याही लोकसभा सदस्य आहेत. मुलायमसिंह यांचे भाऊ राम गोपाल यादव हे राज्यसभा सदस्य तर आणि शिवपाल यादव आमदार. मुलायमसिंग जिवंत असताना सत्तासंघर्षात ते आणि बंधू शिवपाल हे एकत्र आणि अखिलेश व राम गोपाल यांचा वेगळा गट होता . सात वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकांत दोन्ही गटांनी स्वातंत्र उमेदवार जाहीर केले. पक्ष पूर्णपणे फुटणार असे दिसत असताना बापाने मुलाशी समझोता केला. अखिलेशचे सर्व उमेदवार मुलायमसिंह यांनी मान्य केले. शिवपाल व अखिलेश यांच्यात नेतृत्वावरून वाद होतेच. पण शिवपाल शांत झाले. अखिलेश लोकसभेत गेल्यावर त्यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्याला विरोधी पक्षनेता केले. शिवपाल पुन्हा वंचित आहेत. त्याच घराण्यातील धर्मेंद्र यादव भाजपचे खासदार. मुलायमसिंह यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा प्रतीक राजकारणात नसला तरी त्याच्या पत्नी अपर्णा भाजपमध्ये आहे . भाजपची उमेदवारी न मिळाल्याने त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत होत्या. ते टाळण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना राज्य महिला आयोगाचे उपाध्यक्ष केले आणि या राजकीय घराण्यात फूट कायम ठेवली. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनीही आपला भाचा आकाश आनंद यालाच आपला वारसदार म्हणून जाहीर केले आहे. पण तो खूप सक्रिय होताच मायावती यांनी त्याचे पंख कापले, महत्व कमी केले आणि मग पुन्हा वारस केले
घराणेशाही सु्रू असलेले पण फारसा संघर्ष नसलेले महत्वाचे राज्य म्हणजे अर्थातच महाराष्ट्र. महाराष्ट्रात काँग्रेसमधील घराणेशाहीही खूप मोठी आहे. त्या राजकीय घराणेशाहीचे एक कारण येथील सहकारी चळवळ आणि त्यातील पैसा हे आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेची नाडी असलेली सहकारी चळवळ प्रामुख्याने काँग्रेस नेत्यांनी सु्रू केली. विठ्ठलराव विखे पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, शरद पवार सुंदरराव सोळंकी, विलासराव देशमुख आदी अनेक नेत्यांनी ती सु्रू करण्यासाठी आणि तिच्याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारावी यासाठी प्रयत्न केले. सुमारे १५० साखर कारखाने. ३१ हजार दूध डेअऱ्या, १०७ दूध संघ, ५०० सहकारी बँका, १६ हजार पतपेढ्या नोकरदारांच्या, ७५५० संस्था आणि ३०० सूत गिरण्यांचे यांचे जाळेच विणले. पण त्यातून आर्थिक हितसंबंध निर्माण झाले, अनेकांना भ्रष्टाचाराचे कुरणच सापडले. त्या संस्था हातात राहाव्यात यासाठी राजकारणात आपले व घराण्याचे स्थान भक्कम करण्याकडे कल खूपच वाढला. या चळवळीने नेत्यांना राजकीय बळ दिले, पण काहींच्या गैरकारभारामुळे आता साखर कारखाने व दूध संघ अडचणीत तर गिरण्या बंद पडल्यात जमा आहेत. राज्यात २० वर्षांपूर्वी सुमारे ५० राजकीय घराणी होती. तो आकडा आता ७५ च्या वर गेला असेल. वसंतदादांचे घराणे होते. त्यात शालिनीताई, त्यांचे बंधू मनोहर फाळके होते. शालिनीताई पाटील यांनी राजकीय महत्वाकांक्षेपोटी वसंतदादांना खूप त्रास दिला होता. प्रकाशबापू खासदार झाले, पण त्यांना घराण्याची सत्ता टिकवता आली नाही. प्रतीक प्रकाश पाटीलही खासदार झाले, पण दादांचे कुटुंब राजकारणातून फेकले जाईल असे दिसत होते. मात्र यंदा बंडखोरी करून विशाल पाटील लोकसभेवर गेले आणि आपण काँग्रेससोबत राहू, असे सांगून त्यांनी सांगलीत कुटुंबाची सत्ता मजबूत केली. शंकरराव मोहिते पाटील, त्यांचे पुत्र विजयसिंह, त्यांचे पुत्र राणा जगजीतसिंह, विजयसिंह यांचे बंधू यांचे अकलूजमधील साम्राज्य मोठे आहे. त्यातील काही राष्ट्रवादीसोबत, तर काही भाजपचे मित्र.म्हणजे तिथे सत्तेसाठी स्पर्धा आहेच.