लातूरची येळवस…महाराष्ट्रासाठी नवलाई!

-युवराज पाटील

लातूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सोमवारी ३० डिसेंबर रोजी समुद्राला जशी पाण्याची भरती येते… तशी शेताशेतात माणसाची, भरती आली होती. कोणत्याही पुराणात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला एक सण म्हणजे येळवस अर्थात वेळाआमावस्या…हा हिरवाईचा अपूर्व सोहळा सोमवारी अख्ख्या लातूर जिल्ह्यातील शेत शिवारात रंगला होता.

वेळाअमावस्येच्या चार दिवस अगोदर साधनांची जमवाजमव सुरु होते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी,भुईमूग हा सगळा रानमेवा जमा होतो. वेळाअमावस्येला पहाटे घराघरात चूल पेटते. बेसन पिठात कालवून चिंच आणि अंबिवलेल्या ताकाच्या पाण्यात वर उल्लेखलेल्या पदार्थासह शिजवलेली भाजी, म्हणजे भज्जी। ही भज्जी म्हणजे अफलातून भाजी. मी आजपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरलोत. पण भज्जीसारखी अफलातून चव कशाला म्हणजे कशाला नाही …या बरोबर दिले जाणारे अंबील म्हणजे तर राज दरबारी असलेले सगळे पेय फिके पडावेत असे…चार दिवसाचे ताक ज्वारीच्या पिठात अंबवून जिरा फोडणी दिलेलं हे पेय कितीही  रिचवले तरी प्यायची इच्छा होते ते अंबिल ( काही जणांचे तोंड जादा डोस झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी सुजते ) सोबत भल्या थोरल्या भाकरी.  एका शेतात २० ते २५ लोक जेवतील एवढी गव्हाची खीर व संपूर्ण स्वयंपाक वाजत गाजत घरातून डोक्यावरुन शेतावर निघतो.

काय आहे परंपरा?

अमावस्येला हा उत्सव साजरा केला जातो. रब्बी पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमवास्येला हा उत्सव होतो.भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्त्व असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो.

भारतीय व्दिपकल्पात सिंधू संस्कृतीपासून नदीचे जलपूजन  करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा ,यमुना , गोदावरी , सरस्वती ,नर्मदा ,सिंधु आणि कावेरी या त्या सात नद्या ( सप्त सिंधु ) भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता होती. त्याच सप्तसिंधू मातृका म्हणून पुजण्याची परंपरा सुरु झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्तसिंधूचे प्रतीक म्हणून पुजल्या जाऊ लागले.विहिरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगड पुजण्याची परंपरा आहे तिला लातूर जिल्ह्यात आसरा म्हणून ओळखले जाते. आसरा म्हणजे तूच आमची राखण करणारी, सहारा देणारी ,पाणी पाजणारी. याच आसराची पूजा  वेळा अमावस्येच्या दिवशी प्रत्येक शेतात ज्वारीच्या कडब्याच्या पेड्यांची कोप करुन मनोभावे पूजा करून लक्ष्मीला ओटी भरून नैवेद्य दाखवला जातो. परंपरा म्हणून खोपेला ५ फेऱ्या मारतात आणि “वलग्या वलग्या सालन पलग्या” असे म्हटले जाते. हे कन्नड वाक्य आहे. कन्नडात “वलगे वलगे सालम पलगे” असा उच्चार होतो. त्याचा अचूक अर्थ “वांग्याची भाजी आणि भाकर ( रोडगा ) तुम्हाला(लक्ष्मीला) अर्पण करतो. तुम्ही आमच्यावर वर अनुग्रह करा.” असा होतो.

सकाळी पूजा करुन आणि हा सगळा सुग्रास भोजनाचा भोज चढवून मोठी पंगत बसते. जेवण करताना आपण किती खातोय याचे भान राहत नाही. प्रत्येकाच्या कोपीला जावून भज्जीचा अस्वाद घेण्याचा आग्रह होतो, तो टाळता येत नाही. पोटाला तड लागते.एका शेतात खाल्लेली येळवस दुसऱ्या शेतात जाऊन खाण्यासाठी ते जिरावं म्हणून प्रत्येक कोपीच्या पुढे झोका बांधला जातो.जेवणाच्या पात्रावरुन उठून झोक्यावर जावून झोका खेळायचे खाल्लेले अन्न पचवण्यासाठीचा प्रयत्न करायचा आणि पुन्हा दुसऱ्या कोपीवर जाऊन जेवायचे। एकेकाळी १२ बलुतेदार, १८ अलुतेदार यांनाही आग्रहाने जेवायला बोलवून हे सगळे खाऊ घातलं जात असे .

संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करुन रब्बीचा गहू, हरभरा याच्या वावरात तो पेटवून रान ओवाळून काढायचे, आणि तोच टेंबा मिरवत जावून गावातील मंदिराच्या समोर टाकायचा. मोठी आग करुन ती शमली की तिच्या राखेत विस्तव असतानाच ती ठोकरुन घरी जायचे. असा हा मनमोहक सण आहे. त्यानंतर घरातले कर्ते पुरुष माळेगावच्या खंडोबाच्या जत्रेला निघून जायचे….. ही जत्रा देशभरात वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. मोठा घोड्याचा बाजार  गाढवांचा बाजार , सगळ्या भटक्या जमातींची पंचायत यावेळी इथे भरते. देशभरातले तृतीयपंथी दर्शनाला येतात (तृतीयपंथांचे माळेगाव अशीही ओळख ) ,तमाशाचे मोठ मोठे फड….. यामुळे पूर्वी या जत्रेला पुरुष मंडळींना खऱ्या अर्थाने चांगभलं असे. असा हा सण आणि त्याची परंपरा आजही मोठ्या हौसेने  सांभाळली जाते.

(लेखक लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी आहेत) 

8888164834

Previous articleभारतीय राजकारणातील कौटुंबिक सत्तासंघर्ष
Next articleआता स्वागत नाताळ अंकांचे…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here