१९७७ पासून पत्रकारितेच्या निमित्तानं मराठवाड्याबाहेर मुशाफिरी केल्यावर मी ९८मध्ये ‘लोकसत्ता’चा विशेष प्रतिनिधी म्हणून माझी औरंगाबादला बदली झाली . दिलीप बहुधा ‘लोकसत्ता’चा वाचक असावा . मग एक दिवस तो गुलमंडीवरच्या आमच्या कार्यालयात आला . एव्हाना त्याचा संप्रदायही निर्माण झाला असावा . कारण आधी तो येणार असल्याची , मग आल्याची वर्दी आली आणि मग तो आला . औरंगाबादच्या माझ्या या छोट्या वास्तव्यात आमच्या बऱ्याच भेटी झाल्या पण , आम्ही काही कौटुंबिक पातळीवर एकत्र आलो नाही . असा काही विषय निघाला की , आम्हा दोघांतही एक अवघडलेपण येत असे . पुढे ते आम्ही नकळत स्वीकारुनही टाकलं . त्यामुळे अर्थातच आमच्या मैत्रीवर फार काही परिणाम झाला नाही . मात्र ही मैत्री गहरी झाली नाही , हे खरंच.